अक्षरधूळ(Akshardhool)

विस्कटलेला दिवस

Posted by: chandrashekhara on: फेब्रुवारी 9, 2010

काल सकाळी थोडी उशीराच जाग आली. गेले तीन चार दिवस चाललेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमामुळे, सगळे रूटीन बिघडलेलेच होते. कधीही आणि काहीही जेवणे व खाणी, जागरणे ही चाललेलीच होती. त्यामुळे कदाचित असे झाले असावे नाहीतर अलीकडे पहाटे झोप ही उडतेच. डोळे उघडल्या बरोबर पलीकडच्या बाजूला नजर टाकली व गेल्या दीड दोन महिन्याच्या सवईप्रमाणे धाकट्या नातीला गाढ झोपलेली बघितली आणि एखादा काटा रुतावा तसे एकदम लक्षात आले की अरे उद्या आपल्याला ही अशी झोपलेली दिसणार नाहीये. तिची आई म्हणजे माझी मुलगी व या दोन्ही नाती आज संध्याकाळीच त्यांच्या घरी जायला निघणार आहेत. मुलगी माहेरपणाला आली की तिचा परत जाण्याचा दिवस कधी उगवूच नये असे आई-वडीलांना वाटत रहाते, त्यात ती मुलगी जर परदेशात रहात असली तर विचारूच नका, पण तो दिवस शेवटी उगवतोच.

ती रूखरूख मनात ठेवूनच उठलो. का कोण जाणे पण आज काही करण्यात उल्हासच वाटत नव्हता. धाकटीला जवळ घेउनच बसावे असे सारखे वाटत होते. पण नाती उठल्या व त्यांचा रोजचा दंगा, दूध पिण्यासाठी नकार मग त्यांच्या आईचे रागावणे वगैरे सुरू झाले. रोज करतो तसा सकाळी संगणकही चालू करावा असे आज का कोण जाणे वाटलेच नाही.धाकटीला कडेवर घेऊन अंगणात खूप वेळ उभा राहिलो. असे सारखे वाटत होते की आता उद्यापासून हिला कडेवर घेणे शक्य नाही. मन आणखीनच खिन्न झाले. प्रवासाला निघण्याचे असल्याने घरात गडबड चालू होती. साहजिकच बेबी सिटींगचे काम माझ्या डोक्यावर येऊन पडले होते. त्यामुळे नातीबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवणे शक्य होत होते पण त्याच बरोबर मनाची घालमेलही होत होती. अर्थात हे सर्व नातीला समजणे शक्यच नव्हते. ती आनंदात होती.

असाच दिवस पार पडला. संध्याकाळ उगवली आणि विमानतळावर मंडळींना घेउन जाण्यासाठी गाडी पण आली. त्यात एवढे थोरले सामान भरणे, आयत्या वेळचे गोंधळ आणि घाई यात माझ्या नाती आणि मुलगी गाडीत बसले कधी आणि गाडी निघाली कधी हे कळलेच नाही. पण गाडी वळणावरून दिसेनासी झाली आणि मन एका अंधार्‍या रिकामपणाने भरून गेले. काही करावेसेच वाटेना. शेजारच्या आजींचे शब्द कानात गुंजत राहिले. “बाकी काही चालते पण हा विरहाचा क्षण सोसणे फार कठिण असते.” संध्याकाळ रात्र तशीच वाट पहाण्यात गेली. गाडीतून, विमानतळावरून मुलीच्या फोनची व त्यावरून नातींचे हसणे कधी ऐकता येईल याची वाट बघण्यात गेली.मध्यरात्र उलटून गेल्यावर कधीतरी मुलीचा विमानात बसल्याचा एस.एम.एसआला व त्यानंतर कधीतरी डोळ्याला डोळा लागला.

सकाळी उठल्यावर घर अगदी रिकामे वाटते आहे हे प्रकर्षाने जाणवले. गेले दीड दोन महिने घरात सतत चाललेली गडबड आणि गोंधळ मुळी आता विझूनच गेला होता. काही केलेच पाहिजे असे काहीच नव्हते. शेवटी मुलीचा परदेशातून आलेला फोन वाजला. आतुरतेने फोन उचलला. नाती त्यांच्या घरी पोचल्यामुळे, त्यांचे खेळ पुस्तके सगळे त्यांना परत मिळाल्यामुळे प्रचंड खुष होत्या. आमच्याशी बोलण्यात त्यांना आता काही फारसे स्वारस्यच नव्हते. फोनवर ऐकू येणारे त्यांचे खिदळणे ऐकले आणि मनाला खूप बरे वाटले. सगळे जण आपापल्या जगात परत पोचले होते.

आजी-आजोबा मात्र अजून कालच्याच आठवणीत, मनाचा खिन्नपणा कसा घालवायचा याच्याच प्रयत्नात होते. कालचा विस्कटलेला दिवस अजून तसाच विस्कळितच होता त्याची घडी अजून बसलेलीच नव्हती.

9 फेब्रुवारी 2010

पर्यटक आणि गोव्याचे समुद्र किनारे

Posted by: chandrashekhara on: फेब्रुवारी 3, 2010

मागच्याच आठवड्यात, म्हणजे 28 जानेवारीला, गोव्यामधे, एका 9 वर्षाच्या रशियन मुलीशी एका भारतीय तरूणाने जो ओंगळ प्रकार केला त्याबद्दल कोणत्याही सुजाण भारतीयाच्या मनात अतिशय संताप दाटून येईल याबद्दल माझ्या तरी मनात शंका नाही. या तरूणाच्या साथीदाराने त्या मुलीच्या आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिचे मुलीकडचे लक्ष दुसरीकडे विचलित केले व या तरूणाला हे दुष्कर्म करण्यास मदत केली. हे दोन्ही तरूण गोव्यामधे एका औषध कंपनीत कामाला होते. पोलिसांनी 2 दिवसातच दोघांनाही पकडले आहे. आपल्या विकृत मनोवृत्तीमुळे या दोन तरूणांनी या निरागस आणि निष्पाप मुलीला जी पीडा दिली आहे त्याबद्दल त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळावी अशीच आपल्या सर्वांची इच्छा असणार हे नक्की.

या प्रसंगानंतर गोव्यातले मंत्री, पर्यटन विभागाचे अधिकारी यांना काहीतरी बोलणे आवश्यकच होते. त्यामुळे बरीच मुक्ताफळे उधळण्यात आली. एक जण म्हणाले की दोन भागात विभागलेले पोहण्याचे कपडे परिधान केल्याने असे घडले असावे. तर दुसर्‍या एका स्त्री अधिकार्‍याने, बीचवर अर्धनग्न अवस्थेत पर्यटक फिरत राहिले तर स्थानिक लोकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही असे मत व्यक्त केले. काही स्थानिक लोकांनी तर त्या मुलीलाही दोष देण्यास मागे पुढे पाहिले नाही.

वाचकांपैकी जे लोक गेल्या पाच दहा वर्षात गोव्याला जाऊन आले असतील त्यांच्या लक्षात हे आलेच असेल की गोव्यामधे प्रत्यक्षात दोन स्वतंत्र पर्यटन ठिकाणे आहेत. यापैकी पहिले भारतीय पर्यटकांसाठी आहे. यात गोव्यातली मंगेशी सारखी प्रसिद्ध देवळे, जुन्या गोव्यामधली ऐतिहासिक चर्च, पणजीमधले मिरामार किंवा दोना पावला सारखे बीच वगैरे सारखी ठिकाणे येतात. कलंगुटचा बीचही थोडाफार यातच मोडतो. ही सर्व ठिकाणे मुलाबाळांसह कुटुंबाना मौज-मजा करता येईल अशीच आहेत. याउलट बाघा, वेगातर यासारखे बीच, भारतीय पर्यटकांसाठी नाहीतच. या बीचवर गेले तर आपण भारतात आहोत की एखाद्या पाश्चिमात्य देशात, असा संभ्रम निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. ज्या बीचवर ही दुर्दैवी घटना घडली तो अरंबोल बीच या प्रकारचाच बीच आहे. या किनार्‍यांवर भारतीय कुटुंबे अतिशय कमी प्रमाणात दिसतात. मात्र अनेक आंबटशौकिन भारतीय तरूण येथे हमखास असतात. या दुर्दैवी प्रकरणात गुंतलेले विकृत प्रवृत्तीचे भारतीय तरूण याच वर्गातले असावेत.


गोवा सरकारचे, पर्यटन हे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन असल्याने, पाश्चिमात्य पर्यटक ज्या बीचेसवर जास्त करून असतात त्या समुद्र किनार्‍यांच्या बाबत थोडे, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्या सारखे या सरकारचे धोरण असावे. हे पर्यटक बीचवर काय कपडे परिधान करतात?, कोणत्या अवस्थेत बीचवर पडलेले असतात?, त्यांनी कोणत्या मादक पदार्थांचे सेवन केलेले असते? याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जाते व या पर्यटकांना संपूर्णपणे मनासारखे वागण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. असे स्वातंत्र्य दिल्याने हळूहळू त्या पर्यटक केंद्रांचे काय होते हे पहायचे असेल तर थायलंडमधल्या समुद्र किनार्‍यांवर जाऊन बघावे. थायलंड हा देश इतका सुंदर आहे पण परदेशी पर्यटकांना कसेही वागण्याचे स्वातंत्र्य दिल्याने या देशातले पर्यटन स्थळे म्हणजे वेश्याव्यवसाय करण्याची केंद्रे होत चालली आहेत. गोव्याचे थायलंड होऊ नये अशी जर भारतीयांची इच्छा असली तर या समुद्र किनार्‍यावर पर्यटनाचा आनंद लुटू पहाणार्‍या पर्यटकांसाठी , कोणता वेश परिधान करावा? कोणते वर्तन अशोभनीय असून चालणार नाही. हे स्पष्ट करणे जरूरीचे आहे.

गोवा हे Family Resort म्हणून ठेवायचे आहे की थायलंडच्या काही बीचेस सारखे Sex Resort करायचे आहे हे नक्की ठरवले पाहिजे. मध्यपूर्वेमधल्या देशात जेंव्हा परदेशी प्रवासी जातात तेंव्हा त्यांना, विशेषत: स्त्रियांना अनेक बंधने पाळावी लागतात. भारतीयांनाही ती जाचक वाटतात. तरीही ती पाळली जातात. पाश्चिमात्य देशांतील काही हॉटेल्समधे डायनिंग हॉलमधे जेवायचे असेल तर ठराविक फॉर्मल वेष परिधान करावाच लागतो. त्याचप्रमाणे जगातील सर्वोत्कृष्ट अशा गोव्याच्या बीचवर जर पर्यटकाला आनंद लुटायचा असला तर वेषाचे आणि वर्तनाचे काही निर्बंध सर्व पर्यट्कांना पाळणे आवश्यक केलेच पाहिजे.कोणतेही भारतीय कुटुंब आपल्या मुलंबाळासमवेत अशा बीचवर जाणार नाही जिथे पलीकडच्याच बाजूला अर्धनग्न तरूणी पहुडलेल्या असतील. गोव्याच्या बीचेसचे भारतीयांसाठी व परदेशी पर्यटकांसाठी असे जे आपोआप विभाजन झालेले आहे त्याचे हे मुख्य कारण आहे.


गोवा हे जगातले एक सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थान आहे हे कोणीच अमान्य करणार नाही. बीचवर जाणार्‍या पर्यटकांवर थोडे निर्बंध आले म्हणून गोव्याला येणे पर्यटक कधीच सोडून देणार नाहीत. उलट हिडीसपणा कमी झाल्याने या पर्यटनस्थळाचे सौंदर्य व शान आणखी वाढेल आणि एक अतिशय सुरक्षित व आल्हाददायक सुट्टी घालवण्याचे स्थान म्हणून त्याचा लौकिक वाढेल असे मला वाटते.

3 फेब्रुवारी 2010

गुटगुटीत रहा खूप जगा!

Posted by: chandrashekhara on: फेब्रुवारी 1, 2010

विश्वास नाही ना बसत! परंतु हा सल्ला आहे फक्त सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या वरिष्ठ नागरिकांसाठी. दुर्दैवाने, बाकीच्या वयोगटांसाठी मात्र, वजन कमी ठेवा हाच सल्ला डॉक्टर तुम्हाला देतील. कोणालाही असे वाटणे स्वाभाविकच आहे नाही का? की सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांच्यात असे काय विशेष आहे की त्यांनी मात्र थोडेसे लठ्ठ राहिलेलेच चांगले आहे. ऑस्ट्रेलिया मधे झालेल्या एका संशोधनामधून हे अनुमान काढले गेले आहे.


युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधल्या संशोधक डॉक्टरांनी नुकताच एक अभ्यास पूर्ण केला. या अभ्यासाचा विषय असा होता की वरिष्ठ नागरिकांसाठी असा कोणता बॉडी मास इंडेक्स (BMI) आदर्श ठरवता येईल ? की जो राखल्यास या लोकांची आर्युमर्यादा वाढू शकेल. या अभ्यासार्तंगत, या संशोधक गटाने गेल्या दहा वर्षात, मृत्युसमयी सत्तर ते पंचाहत्तर वय असलेले जे वरिष्ठ नागरिक कालवश झाले, त्यांचा BMI मृत्युसमयी काय होता याचा डेटा संग्रहित केला. या शिवाय या संशोधक गटाने 9200 वरिष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांचा BMI आणि या लोकांना ह्रदयविकार, मधूमेह किंवा कॅन्सरसारखे विकार आहेत का? याचीही तपासणी केली. या संशोधनातून या डॉक्टर्सनी खालील अनुमाने काढली.


सत्तरीच्या आसपास असलेले जे नागरिक, थोडेसे लठ्ठच आहेत त्यांची आर्युमर्यादा सर्वात जास्त असण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचा BMI नॉर्मल रेंजमधे आहे, जे लोक लठ्ठंभारती (Obese) आहेत किंवा ज्यांचा BMI नॉर्मलपेक्षा कमी आहे अशा सर्व लोकांची आर्युमर्यादा, थोड्या लठ्ठ लोकांच्या मानाने, कमी असण्याची शक्यता आहे. या थोड्याशा लठ्ठ लोकांना, ह्रदयविकार, मधुमेह किंवा श्वसन विकार होण्याची शक्यता बरीच कमी आहे.


अर्थातच जे लोक लठ्ठंभारती आहेत त्यांना मृत्युचा धोका सर्वात आधिक असतो. त्याच्या खालोखाल नॉर्मलपेक्षा कमी BMI असलेल्या लोकांनाही हा धोका जास्त संभवतो. या शिवाय महत्वाची गोष्ट अशी की बैठे काम करणार्‍या लोकांना, मग वजन काहीही असो, हा धोका सर्वात जास्त संभवतो. अशा लोकांना, विशेषत: स्त्रियांना, हा धोका 25% तरी अधिक असतो. या संशोधन गटाचे प्रमुख Lead researcher, Professor Leon Flicker यांच्या मताप्रमाणे जे लोक निरोगी अवस्थेत सत्तरीच्या उंबरठ्यावर पोचतात, अशा लोकांच्या शरीरावर असलेल्या चरबीचे, धोके आणि फायदे यांचे गणित थोडे निराळेच असते. त्यामुळे या वयोगटाला आदर्श BMI कोणता याचे असलेले सध्याचे मानक बदलण्याची गरज आहे.

केंम्ब्रिज विद्यापीठाचे Professor Kay-Tee Khaw हे सुद्धा याच मताचे आहेत की या वयोगटात कुपोषण ही मोठी समस्या असल्याने ज्या लोकांच्या पोटाचा घेर थोडा मोठा असतो असे लोक जास्त आरोग्यमय जीवन जगतात. सत्तरीमधे जास्त वजन का फायदेशीर असते याचा खुलासा करताना ऑस्ट्रेलियामधल्या वरील संशोधक गटापैकी एका संशोधकाने सांगितले की म्हातारपणी चरबीच्या स्वरूपात शरीरावर असलेले पोषक द्रव्यांचे साठे, जर त्या व्यक्तीला आजारपण आले तर खूपच उपयुक्त ठरतात व ती व्यक्ती त्या आजारातून पूर्णपणे बाहेर येण्याची शक्यता बरीच वाढते.

तेंव्हा तुम्हा जर सत्तरीच्या उंबरठ्यावर असलात आणि तुमचे पोट जरा जास्तच मोठे दिसते आहे असे तुम्हाला वाटत असले तर काळजी करू नका हे वाढलेले पोट तुमच्या बॅन्क बॅलन्स सारखेच महत्वाचे आहे.

1 फेब्रुवारी 2010

एन्टर द ड्रॅगन

Posted by: chandrashekhara on: जानेवारी 30, 2010

नेपाळमधल्या त्रिशूली नदीचे नाव मी आतापर्यंत तरी कधी ऐकलेले नव्हते. नेपाळला भेट देणार्‍या पाश्चिमात्य प्रवाशांमधे ही नदी म्हणे बरीच लोकप्रिय आहे. या नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी अतिशय वेगवान असे प्रवाह (River Rapids) असल्यामुळे रॅफ्टिंग (White water Rafting) या खेळासाठी ही नदी प्रसिद्ध आहे. ही नदी नेपाळची राजधानी खाटमांडूच्या उत्तरेला उत्तर-दक्षिण अशी वहात जाते व नंतर काली किंवा बूढी गंडकी या नदीला जाऊन मिळते.


भारतीय उपखंडातल्या अनेक नद्यांप्रमाणे ही नदी सुद्धा तिबेटमधे उगम पावते. तिबेटमधे या नदीला कायरोंग किंवा जायरोंग (Kyirong or Gyirong) असे नाव आहे. तिबेटमधून ही नदी, रेसुओ या तिबेट-नेपाळ सीमेवरील चेक-पोस्टजवळ, नेपाळमधे प्रवेश करते. या ठिकाणी एका लोखंडी दोरखंडांनी बनवलेल्या पुलावरून आता चीनमधे प्रवेश करता येतो. नेपाळमधे प्रवेश केल्यावर सीमेपासून साधारण सतरा किलोमीटरवर स्याब्रुबेसी (Syabrubesi) हे पहिले खेडेगाव लागते.


पूर्वीच्या काली तिबेट आणि नेपाळ यांच्यात बरेच युद्धप्रसंग आले आहेत. या युद्धात त्रिशूली नदीच्या अरूंद खोर्‍यातून तिबेटी आक्रमकांना नेपाळमधे येण्यासाठी सुलभ मार्ग होता. यामुळे ही सीमा नेहमीच संरक्षित होती. रेसुओ चेक-पोस्टच्या जवळ रसुआ गढी म्हणून एक जुना किल्ला आहे. नेपाळी नागरिक सोडून बाकी कोणालाच या सीमेजवळ प्रवास करू दिला जात नाही.


त्रिशूली नदीच्या खोर्‍याची, परदेशी प्रवाशांचे आवडते पर्यटणस्थळ अशी ख्याती आता टिकणे कठिणच दिसते आहे. सीमेवरील रेसुओ चेक-पोस्ट पासून स्याब्रुबेसी गावापर्यंत एक मोठ्या राजरस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. चीन व नेपाळ मधे हा रस्ता बांधण्याचा करार झाल्यावर चिनी सरकारने नेपाळी हद्दीत हा सतरा किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचे काम सुरू केले आहे. हा रस्ता अतिशय दुर्गम अशा प्रदेशातून जात असल्याने फक्त सतरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला तब्बल 20 मिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित आहे व तो चिनी सरकार करणार आहे. चिनी रस्ता बांधणी मजूर व अभियंते यांना हा रस्ता, सुरूंग लावून व खडक फोडूनच करावा लागणार आहे. तिबेटमधे हा रस्ता जायरोंग या गावापर्यंत जाणार आहे. या गावापासून ल्हासाला जाणारा या आधीच तयार आहे. त्याच प्रमाणे स्याब्रुबेसी पासून खाटमांडू हा रस्ताही तयार आहे. त्यामुळे जायरोंग ते स्याब्रुबेसी रस्ता तयार झाला की ल्हासा व खाटमांडू हे या रस्त्याने सरळ जोडले जातील.


या रस्त्यामुळे या दुर्गम प्रदेशाची प्रगती होईल व्यापार उद्यम वाढेल वगैरे अनेक गोष्टी सांगण्यात येत आहेत व त्या बहुतांशी खर्‍याही आहेत. परंतु या रस्त्याचे खरे महत्व निराळेच आहे. चीनमधील चिंघाई प्रांतापासून ल्हासापर्यंतचा रस्ता आता वापरात आला आहे. त्यामुळे या नव्या रस्त्याने, चिनी व्यापारी माल नेपाळमधे तर पोचेलच पण तो भारतातही सुलभ रित्या येऊ शकेल. चीन व भारत यांच्यामधला व्यापार खूपच मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या व्यापाराला या नव्या रस्त्यामुळे चांगलेच पाठबळ मिळणार आहे.


कोणत्याही रस्त्याने जसा व्यापारी माल सुलभपणे येऊ जाऊ शकतो तसेच सैनिक किंवा चिलखती वाहनेही येऊ जाऊ शकतात. शतकानुशतके मध्य एशियामधील आक्रमकांपासून, भारतीय उपखंडाचे संरक्षण, हिमालयाची पर्वतराजी करत आलेला आहे. हे संरक्षक कवच आता भेदले जाणार आहे हे नक्की. या बाबत भारताला योग्य ती पूर्व-तयारी करावीच लागेल.

या नवीन रस्त्याचा भारताला फायदा होणार आहे की यामुळे अनेक नव्या समस्या व कटकटी निर्माण होणार आहेत हे आता सांगणे तरी कठिण दिसते.

30 जानेवारी 2010

हलती -फिरती क्रांती

Posted by: chandrashekhara on: जानेवारी 28, 2010

मध्यंतरी, अमेरिकेला स्थायिक असलेले माझे एक स्नेही, भारत भेटीसाठी आले होते. मागच्या वेळेस ते भारतात आले होते त्याला जवळ जवळ दहा वर्षे तरी उलटून गेली असावीत. ते आल्यामुळे, आम्ही काही जुने मित्र त्यांच्याबरोबर गप्पा-गोष्टी करत बसलो होतो. त्यांना सहज कोणीतरी विचारले की मागच्या दहा वर्षात त्यांना भारतात सर्वात मोठा असा कोणता फरक जाणवला? मला वाटले होते की ते बराच विचार करून उत्तर देतील. पण त्यांना क्षणाचाही वेळ उत्तर द्यायला लागला नाही कारण त्यांना अगदी विमानतळावर उतरल्यापासूनच हा फरक जाणवला होता. हा फरक होता मोबाईल फोन्सचा भारतात आता दिसणारा सुळसुळाट.

मागच्या महिन्यात मी माझ्या घरामधे काही बदल करून घेतले. त्यावेळी बांधकाम करणार्‍या मिस्त्रीला मदत करणार्‍या बिगार्‍यापासून ते प्लंबर, रंगारी, सुतार किंवा वायरमन कोणाकडेही बघितला तरी त्याच्याकडे मोबाईल फोन हा दिसेच. या लोकांच्याकडे जे मोबाईल फोन दिसत त्यात एक खास सुविधा होती. एक बटन दाबले की हा फोन टॉर्च किंवा फ्लॅशलाईट सारखा वापरता येत होता. त्यामुळे कोणत्याही अंधार्‍या कानाकोपर्‍यात बघणे या लोकांना सुलभ जात होते. ही सुविधा ज्या मोबाईल फोनमधे असते ते सर्वात कमी किंमतीचे मोबाईल असतात म्हणे! अशीही माहिती मला कळली. यातली काही मंडळी फोनवरून सतत गाणी ऐकत असत. मी त्यांना सहज विचारल्यावर मला अशी नवीन ज्ञानप्राप्ती झाली की त्यांच्या फोनमधे एफ. एम. रेडिओ सेवा पण ऐकू येते. आता घरातले काम संपल्यामुळे या मंडळींचे फोन व गाणी हे सर्वच बंद झाले आहे.


मागच्या आठवड्यात, एका वर्तमानपत्रात आलेली मुंबईतल्या एका मासे विक्रेत्याची मुलाखत मी वाचली. हे विक्रेते आता सर्रास मोबाईल फोनचा वापर करत असल्याने डॉकवर कोणते ताजे मासे येणार आहेत ते गलबते बंदराला लागण्याच्या आधीच त्यांना एक फोन केला की कळते. हे मासे निर्यात करणार्‍या कंपन्या, आता या विक्रेत्याला त्याच्या या माहितीमुळे लगेच ऑर्डर देतात. ती मिळाली की हा विक्रेता तीच ऑर्डर डॉकवरच्या कोळ्य़ांना देतो. पूर्वी हेच सव्यापसव्य करण्यासाठी त्याला स्वत: डॉकवर जावे लागे व बस आणि ट्रेनच्या प्रवासात चार ते पाच तास खर्च करावा लागे.

भारतातल्या जनसामान्यांच्या विश्वात रेडिओ किंवा टी.व्ही. नंतर आलेले, मोबाईल हे दुसरे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. या मोबाईलने याच जनसामान्यांना, आधुनिक तंत्रज्ञानाच्या एकदम शिखरावर नेउन ठेवले आहे. याला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच भारतीय मोबाईल फोन कंपन्यांची दूर दृष्टीही आहे यात शंका नाही. एका सेकंदाला एक पैसा या सारखा जगातील सर्वात कमी दर, येणारा कोणताही फोन फुकट, अशासारख्या सुविधांनी ही मोबाईल सेवा अतिशय लोकप्रिय झाली आहे. आज भारतात 55 कोटी मोबाईल कनेक्शन्स तरी असावीत म्हणजे प्रत्येक दुसर्‍या माणसाजवळ मोबाईल आहेच.


भारतात मिळणारे मोबाईल फोन, ऍपलच्या आय-फोन सारखे उच्चतंत्रज्ञानविभूषित नाहीत पण 2G सारख्या जुन्या सेवेचे स्टॅन्डर्ड वापरून सुद्धा भारतीय मोबाईल कंपन्या ग्राहकांना गाणी व व्हिडियो डाउनलोड्स, रिंगटोन्स, बॅन्केची सुविधा, मार्केटमधले व शेअर्सचे भाव अशा अनेक सेवा पुरवत आहेत. टाटा मोटर्सने उत्पादन सुरू केलेल्या नॅनो मोटरगाडीचा खूप उदोउदो झाला पण भारतीय मोबाईल कंपन्या ग्राहकांना या सेवा ज्या स्वस्त दरात पुरवत आहोत ते बघता ही सेवा म्हणजे सुद्धा एक त्याच पद्धतीची क्रांतीच आहे हे लक्षात येईल. अनेक परदेशी कंपन्या या क्षेत्रात उतरण्यास उत्सुक आहेत. त्यांना यश मिळवायचे असले तर भारती किंवा रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांशी टक्कर देऊनच या क्षेत्रात उतरावे लागणार आहे.


भारतातला इंटरनेटचा वापर आणि प्रसार हा इतर देशांच्या मानाने अजून कमी आहे. याचे एक प्रमुख कारण सर्वसामान्यांना न परवडणार्‍या संगणकांच्या व ब्रॉडबॅन्ड सेवेच्या किंमती हेच आहे. भारतात तिसर्‍या पिढीची किंवा 3G मोबाईल सेवा आता येऊ घातली आहे. ती आली व त्यावर आधारित स्वस्त ब्लॅकबेरी सारखे मोबाईल फोन भारतात कंपन्यांनी उपलब्ध करून दिले तर इंटरेनेट ग्राहकांची संख्याही कोटी कोटी होईल याबद्दल माझी तरी खात्री आहे. ही मोबाईल सेवा जर स्वस्तात उपलब्ध झाली तर काही व्यवहार अगदी सुलभपणे होऊ शकतील. या प्रकारच्या व्यवहारांचे अगदी सहज लक्षात येऊ शकणारे उदाहरण म्हणजे बॅंक व्यवहार किंवा शेतमालाचे व्यवहार.

वर उल्लेख केलेल्या मासे विक्रेत्याला, मोबाईल फोनचे फक्त फायदेच झाले आहेत असे मात्र नाही. त्याच्याप्रमाणेच त्याची गिर्‍हाईके सुद्धा आता कोणते मासे डॉकवर येत आहेत हे फोन करून माहिती करून घेऊ लागले आहेत. त्यामुळे गिर्‍हाईक टिकवून ठेवण्यासाठी त्याला आता बरेच जास्त प्रयत्न करावे लागत आहेत.

मोबाईल काय किंवा इंटरनेट काय? त्यांच्या उपयोगाने व्यवहारात जी पारदर्शकता येते तीच खरे म्हणजे सर्वात महत्वाची आहे आणि त्यांचा वापर लोकप्रिय होण्याचे तेच खरे कारण आहे.

28 जानेवारी 2010

न्यू गेम इन द ईस्ट

Posted by: chandrashekhara on: जानेवारी 26, 2010

मियानमारच्या (ब्रम्हदेश) घनदाट जंगलात आश्रय घेऊन तेथून आपल्या राष्ट्रविरोधी कारवाया चालू ठेवणार्‍या अतिरेक्यांच्या विरूद्ध संयुक्त कारवाई करण्याबाबत भारत आणि मियानमार यांच्यात झालेल्या मतैक्याबद्दलची बातमी कालच्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. या बातमीप्रमाणे, पुढच्या दोन तीन महिन्यात, भारत आणि मियानमारची सैन्यदले आपआपल्या प्रदेशात अशा रितीने एकसंध कारवाई करतील की अतिरेक्यांच्या मागे सैन्याचा ससेमिरा लागल्यानंतर, सरहद्द ओलांडून पलीकडे पळून जाण्यास त्यांना वावच मिळू नये. या शिवाय ही सैन्यदले, सीमेवर होणारा, अंमली पदार्थ, हत्यारे व इतर गोष्टी यांच्या चालू असलेल्या अवैध व्यापाराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतील.

भारताच्या मध्यवर्ती गृह सचिवांनी या बातमीबरोबरच त्यावर केलेली एक टिप्पणी मोठी लक्षवेधी आहे. या टिप्पणीप्रमाणे, मियानमारने भारताच्या सुरक्षाविषयक सर्व काळज्या व चिंता दूर करण्यासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे मान्य केले असून या दोन्ही देशातील संबंध भविष्यकाळातही पूर्णपणे सलोख्याचे रहावे यासाठी आवश्यक ती पाउले उचलण्याचे मान्य केले आहे.

तसे पहायला गेले तर या बातमीत विशेष असे काहीच नाही. मैत्री असलेल्या दोन शेजारी राष्ट्रांनी सुरक्षा विषयक बाबीत एकमेकाबरोबर सहकार्य करण्याचे ठरवले आहे एवढाच खरा त्याचा अर्थ निघतो. परंतु मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बातमी वाचली की काही निराळाच अर्थ त्यातून सूचित होत आहे असे दिसू लागते. ऑगस्ट 2009 मधे सर्व आंतर्राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी, मियानमारच्या सैन्यदलाने त्या देशाच्या पूर्व सीमेला लागून असलेल्या कोकान्ग या स्वायत्त राज्यामधील बंडखोरांच्या बरोबर झालेल्या युद्धात, या बंडखोरांवर संपूर्ण विजय मिळवून त्यांना निशस्त्र केल्याचे वृत्त दिले होते. या युद्धामुळे, कोकान्गचे हजारो नागरिक, सीमा पार करून चीनमधे निर्वासित म्हणून पळाले होते. या निर्वासितांची संख्या 37000 पेक्षाही जास्त होती व चीनला त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्वासित छावण्या उभारून त्यांची सोय करणे आवश्यक बनले होते. या घटनेबाबत चिनी सरकारने अतिशय क्रोधपूर्ण प्रतिसाद दिला होता. मियानमार बरोबरच्या संबंधात असा प्रतिसाद चीनकडून येणे हे खूपच अनपेक्षित होते. त्यामुळेच या बातमीचा संदर्भ व महत्व जाणून घ्यायचे असले तर मियानमारमधे प्रत्यक्ष भौगोलिक व राजकीय परिस्थिती काय आहे याचे आकलन करून घेणे गरजेचे आहे.

नकाशात बघितले तर भारताच्या ईशान्येला असलेली राज्ये व चीनचा युनान प्रांत यांच्यामधे एखादी पाचर घुसवावी तसा मियानमार देशाचा नकाशा दिसतो. मियानमार मधले कोकान्ग हे स्वायत्त राज्य चीनच्या सीमेला अगदी लागून आहे. या राज्याचा विस्तार अंदाजे 10000 वर्ग किलोमीटर एवढा असून लोकसंख्या 140000 पर्यंत आहे. ही लोकसंख्या बहुतांशी चिनी वंशाची असून त्यात चीनचे स्थलांतरीत नागरिकही बर्‍याच प्रमाणात आहेत. कोकान्ग राज्याचे स्वत:चे असे प्रादेशिक सैन्यदल आहे. या सैन्यदलाने मियानमारच्या सीमावर्ती भागात असलेल्या इतर अशाच प्रादेशिक सैन्यदलांबरोबर (Kachin State, Wa State) सहकार्याचा करार केलेला आहे. 1989 मधे, कोकान्गच्या प्रादेशिक सैन्य दलाने मियानमारच्या सैन्यदलाबरोबर एक शस्त्रसंधी करार केला होता.

इतिहासात डोकावून बघितले तर मियानमार व चीन यांच्यात गाढ मैत्रीचे संबंध कधीच नव्हते. 1962मधे सैन्यदलाने बंड करून राज्यकारभार हाती घेतल्यानंतर चित्र हळूहळू बदलू लागले. 1988 मधे मियानमारमधे झालेले व लोकशाहीला पाठिंबा देणारे आंदोलन, तिथल्या सैन्यदलाने निर्घृणपणे दडपले. आंतर्राष्ट्रीय समुदायाने या नंतर मियानमारवर प्रचंड निर्बंध टाकले. या सगळ्या घटनांत चीन मात्र मियानमारच्या सैन्याधिकार्‍यांच्या बाजूने उभा राहिला व संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचा कायम सभासद असल्याने, त्याने मियानमार विरुद्ध कोणतीही फारशी गंभीर कारवाई होऊ दिली नाही. भरीत भर म्हणून स्वत:कडून मियानमारला होत असलेला शस्त्रास्त्रांचा पुरवठा त्याने चालूच ठेवला. या दोन देशातील संबंध खरे म्हणजे साटेलोट्याचे आहेत. चीन मियानमारला आर्थिक मदत व शस्त्रात्रे पुरवतो व आंतर्राष्ट्रीय समुदाय कोणतेही निर्बंध घालणार नाही याची काळजी घेतो. याच्या बदलात मियानमार खनिज तेलासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा चीनला पुरवठा करतो. दक्षिण-पूर्व एशियामधील एसिआनया संघटनेमधे चीनची बाजू भरभक्कम राहील याची काळजी मियानमारकडून घेतली जाते.

या दोन देशांमधील संबंध जसजसे दृढ होत गेले तसतसे, चिनी वंशाचे लोक 90 टक्के असलेले कोकान्ग स्वायत्त राज्य, या दोन देशांमधले महत्वाचे व्यापारी केन्द्र बनत गेले व त्याची आर्थिक सुबत्ता वाढत गेली. चीनमधील युनान प्रांताच्या सीमेवर असलेल्या लाओगाई (Laogai) या गावापासून मियानमारच्या शान या राज्याची राजधानी असलेल्या लाशलो(Lashlo) या शहरापर्यंतचा राजरस्ता या व्यापाराचा मुख्य मार्ग बनला. कधीही बघितले तरी या रस्त्याने ग्राहकोपयोगी व इतर सामानाने लादलेली अवजड चिनी मालवाहू वाहने सतत ये-जा करताना दिसतातच. हान या चिनी वंशाचे लोक व चिनी स्थलांतरीत यांच्या संपूर्ण ताब्यात असलेला हा व्यापार-उदिम, 2008 साली 2.63 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा वाढला होता. मागच्या वर्षी चीनने खनिज तेलाची वाहतुक सुरळीतपणे चालावी म्हणून एक खास बंदर मियानमारमधे उभारण्यास सुरवात केली आहे. कोणत्याही प्रकारे विचार केला तरी मियानमार देश अपल्याला एवढी मदत करणार्‍या आपल्या या खास मित्राच्या म्हणजे चीनच्या बाजूने नेहमीच उभा राहील याबद्दल कोणाच्याच मनात शंका उरली नाही.

अर्थातच मियानमार व चीन या देशातील हे गाढ मैत्रीचे संबंध, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक वाटले असणे अत्यंत स्वाभाविक आहे. भारतातील काही राजकीय तज्ञांच्या मताने तर चीन मियानमारच्या माध्यमातून भारताचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत असल्याचे भाकित केले गेले. आपल्या पूर्व सीमेवर एक अतिशय महत्वपूर्ण व्ह्यूहात्मक डावपेच आखला जातो आहे आणि त्यात चीनने वरचष्मा मिळवला आहे असे भारताला जाणवू लागले.

कोकान्ग राज्याचा हा सीमावर्ती प्रदेश, मादक पदार्थांच्या अवेध तस्करीचे सुद्धा महत्वाचे केंद्र बनला आहे. मादक पदार्थ, वापरलेल्या सुया व वेश्याव्यवसाय यांच्या वाढत्या प्रमाणामुळे लगतच्या युनान प्रांतामधल्या एड्स रोग्यांची संख्या ही सतत वाढत चालली आहे. कोकान्ग मधील एका शस्त्रास्त्रांच्या जुळणी कारखान्यातून मादक पदार्थांचा व्यापार चालतो आहे असे समजल्याने मियानमारच्या 20 पोलिसांची एक तुकडी तिथे चौकशीसाठी गेली. कोकान्गच्या बंडखोर सैन्याला हे आपल्यावर झालेले आक्रमण वाटले व त्यांचा मियानमार सैन्यदलाबरोबर युद्धाचा भडका उडाला. या युद्धाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. कोकान्गचे बंडखोर सैन्य तिथल्या चिनी वंशाच्या व स्थलांतरितांच्या बाजूचे असल्याने साहजिकच हे लोक या युद्धात होरपळून निघू लागले व त्यांनी चीनच्या भूमीकडे पळ काढला. 37000 पेक्षा जास्त चिनी वंशाच्या लोकांनी कोकान्ग सोडून युनान प्रांतातील नानसेन जिल्ह्यात आश्रय घेतला. चिनी वंशाच्या लोकांची ही होरपळ साहजिकच चीनला मान्य होण्यासारखी नसल्याने त्यांच्याकडून अतिशय क्रोधपूर्ण प्रतिसाद आला.

चीनचा गेली वीस वर्षे सततचा पाठिंबा असूनही, 1948 मधे ब्रिटिशांपासून स्वतंत्रता मिळाल्यापासून, मियानमार सरकारच्या मनात सतत असलेला चीनबद्दलचा संशय, चीनच्या या उद्रेकामुळे परत जागृत झाला असल्यास नवल नाही. मियानमार मधले सैन्याधिकारी अतिशय कम्युनिस्टविरोधी मानले जातात. मियानमारमधे कम्युनिस्ट पक्षावर पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. याच सैन्याधिकार्‍यांनी 1950 1960 च्या शतकात मियानमार कम्युनिस्ट पक्षाच्या सैनिकांविरुद्ध मोहिमा चालवल्या होत्या. या मोहिमांमधे चिनी सैनिक कम्युनिस्ट पक्षाचा गणवेश घालून मियानमार सैन्याशी लढले होते ही गोष्ट हे सेनाधिकारी विसरणे शक्य नसल्याने वरवर काहीही चित्र दिसत असले तरी मनातला मूळचा संशय गेला असणे कठिण आहे.

भारत व मियानमार यांच्यातील नवा करार या प्रकाशात बघितला पाहिजे असे वाटते. बर्‍याच काळानंतर भारताची बाजू वरचढ झाल्यासारखी वाटते आहे. एक गोष्ट मात्र स्वच्छ आहे. मियानमारचे सेनाधिकारी या प्रकारच्या आंतर्राष्ट्रीय व्ह्यूहात्मक डावपेचात काही कच्चे खेळाडू नाहीत. दोन राष्ट्रांच्या परस्पर संशयाचा आपला कसा फायदा करून घ्यायचा या बाबतीत ते तरबेज आहेत. त्यांचे धोरण साधे असले तरी त्यांना हवे ते या डावपेचाने सहजपणे प्राप्त करू शकतात.

मियानमारचे धोरण काहीही असो, दक्षिण-पूर्व एशियामधल्या या व्ह्यूहात्मक खेळात भारताला भाग घेण्यापासून गत्यंतरच नाही.

26 जानेवारी 2010

मद्यधुंद रशियन्स

Posted by: chandrashekhara on: जानेवारी 23, 2010

औद्योगीकरण झालेल्या देशांमधे, सर्वात जास्त मद्य सेवन कोण करत असेल तर रशियन लोक! विश्वास बसणार नाही पण सरासरीने प्रत्येक रशियन माणसाच्या पोटात दर वर्षी 32 पिंट्स किंवा अंदाजे 16 लिटर शुद्ध मद्यार्क कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जातो. गेल्या काही शतकात मद्य हे प्रत्येक सर्वसाधारण रशियन माणसाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. रशियन माणून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घटना व्होडका या मद्याच्या साक्षीनेच साजरी होते. मग तो लग्न समारंभ असो! नवीन ओळख असो किंवा जुन्या मित्रांची परत झालेली भेट असो! नवीन खरेदी असो किंवा विक्री असो! फायदा झालेला असो किंवा तोटा झालेला असो! कोणाशी भांडण झालेले असो किंवा मनोमिलन असो!

एक हजार वर्षांपूर्वी रशियाच्या राजघराण्याचा ग्रॅंड प्रिन्स व्लाडिमिर याने तर सांगूनच टाकले होते की मद्यप्राशन हा रशियाच्या जीवनातला खरा आनंद आहे. रशियन राजघराण्याने ख्रिश्चन धर्म अधिकृत म्हणून स्वीकारण्यामागे बहुदा हेच कारण असावे की हा धर्म मद्यप्राशन निषिद्ध मानत नाही. रशियन लोक मद्यप्राशन घरी, पबमधे तर करतातच पण कामावरही करतात. 1991 साली केल्या गेलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की घरच्यापेक्षा, कामावर मद्यप्राशन करणारे लोक प्रत्यक्षात जास्तच आहेत.

16व्या शतकात रशियामधे प्रथम दारूचे गुत्ते ओघडले गेले. राज्यकर्त्यांच्या हे लगेच लक्षात आले की करवसुलीचा हा एक सुलभ मार्ग आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रशियन राज्यकर्त्यांच्या उत्पन्नपैकी 40 % उत्पन्न मद्यावरील करापासून मिळू लागले होते. हळू हळू मद्याचे उत्पादन व विक्री ही संपूर्णपणे राष्ट्रीयकृत उद्योग म्हणूनच घोषित करण्यात आली.

रशियामधला मद्यप्राशनाचा इतिहास जितका जुना आहे तितकाच तिथल्या राज्यकर्त्यांनी लोकांचे मद्यप्राशन कमी व्हावे म्हणून केलेल्या प्रयत्नांचा. 1914 मधे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस निकोलस 2 या झारने संपूर्ण दारूबंदी घोषित केली होती. (ही घटना अमेरिकेमधे दारूबंदी कायदा होण्याच्याही आधीची आहे.) या दारूबंदीचा परिणाम अर्थातच अवैध दारूचे उत्पादन प्रमाणाबाहेर वाढण्यात झाला. या नंतरचा प्रयत्न दुसर्‍या महायुद्धानंतर जोसेफ स्टालिनने करून बघितला. त्याने मद्यार्काचे उत्पादन, विक्री यावर बंधने आणली व कर वाढवून किंमती वाढवल्या. परंतु याचाही परिणाम अवैध दारू व इतर मादक पदार्थांच्या वाढत्या सेवनात झाला. यानंतर क्रुश्चेव्ह, ब्रेझ्नेव्ह यांनीही मद्यपान विरोधी मोहिमा राबवल्या. या प्रत्येक मोहिमेचा परिणाम मद्याचा खप वाढण्यात फक्त झाला. 1982 साली मिखाईल गॉर्बॉचेव्हने मद्यार्काचे उत्पादन 50% कमी केले याचा परिणाम हातभट्टीचे उत्पादन बेसुमार प्रमाणात वाढण्यात फक्त झाला. या अवैध दारूचे उत्पादन एवढे वाढले की या उत्पादनाला आवश्यक असलेली साखर बाजारातून गायब झाली व फक्त काळ्या बाजारात मिळू लागली. लोक कोणतीही विषारी रसायने पिऊ लागले व सरकारी अबकारी कर वसूली 2 बिलियन रूबलने कमी झाली.

बोरिस येल्स्टीन मद्यपान विरोधी मोहिमा राबवणे शक्यच नव्हते कारण तेच भरपूर प्रमाणात मद्य सेवन करत असत. त्यांच्याबद्दलच्या, मॉस्को नदीत मद्यसेवन करून गाडी घालणे किंवा वॉशिंग्टनच्या रस्त्यांवर फक्त आतील कपडे घालून फिरणे अशासारख्या दंतकथा परिचित आहेतच.

रशियाचे सध्याचे अध्यक्ष ड्मित्री मेडव्हडेव्ह यांनीही रशियन लोकांची मद्यसेवनाची सवय कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच्या आधी त्यांनी लोकांनी व्होडका ऐवजी बीअर प्यावी अशी सूचना केली होती. याचा परिणाम फक्त व्होडका बरोबर बीअरचा खप वाढण्यात फक्त झाला. यामुळे नाऊमेद न होता श्री. मेडव्हडेव्ह यांनी आता परत प्रयत्न चालू केला आहे. व्होडकाची कमीत कमी किंमत आता 89 रुबल (अंदाजे 3 अमेरिकन डॉलर) एवढी करण्यात आली आहे. या किंमतवाढीमुळे व्होडकाचा खप कमी होईल अशी श्री. मेडव्हडेव्ह यांना आशा वाटते.

रशियन लोकांच्या जीवन रहाणीत मद्यप्राशन एवढे अंतर्भूत झालेले आहे की व्होडकाची नुसती किंमत वाढवून काय साधेल असा प्रश्न बर्‍याच रशियनांना पडला आहे. मद्यप्राशनाला असलेले सामाजिक स्थान लोकांच्या मनातून कमी करण्याची आवश्यकता आहे असे त्यांना वाटते.

23 जानेवारी 2010

फ्रुगल इंजिनीयरिंग

Posted by: chandrashekhara on: जानेवारी 21, 2010

फ्रुगल इंजिनीयरिंग हे शब्द मागच्या वर्षी मी प्रथम वाचले. एका मोठ्या बहुराष्ट्रीय मोटरगाड्या बनवणार्‍या कंपनीचे एक अतिवरिष्ठ अधिकारी त्या वेळी भारताच्या भेटीवर आले असताना त्यांनी इथल्या फ्रुगल इंजिनीयरिंगची बरीच स्तुती केली होती. तेंव्हापासून माझ्या मनात हा प्रश्न होता की इंजिनीयरिंगचा हा काय प्रकार आहे? मी चाळीस एक वर्षांपूर्वी इंजिनीयरिंग मधली पदवी प्राप्त केली होती. तेंव्हा तर आम्हाला असा काही विषय कोणी शिकवला नव्हता. नंतर स्वत:च्या उत्पादनाच्या व्यवसायातही हा प्रकार कुठे ऐकला नव्हता. त्यामुळे आताच एकदम हा नवा प्राणी कोठून उत्पन्न झाला? असा प्रश्न माझ्या मनाला साहजिकच पडला.

भारतातल्या उद्योगांमधे जे संशोधन कार्य (R&D) चालते ते फक्त बहुराष्ट्रीय कंपन्याच करतात अशी एक भ्रामक समजूत पाश्चात्य जगतात आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीने मागच्या वर्षी या विषयी एक शोधनिबंध सादर केला होता. या निबंधाचा रोख, बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील संशोधन केंन्द्रे, आपल्या मूळ कंपनीच्या शोधांना सहाय्यक असेच कार्य फक्त करतात की स्वतंत्रपणे सृजननिर्मिती (Innovation) दर्शवणारे संशोधन करतात याची पाहणी करण्याचा होता. या निबंधाच्या लेखकांनी भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अमेरिकेत किती पेटंट्स मिळवण्याचे अर्ज केले आहेत याचा शोध घेतला. त्यावरून त्यांना असे आढळून आले की इ..2000 मधे असे फक्त 50 अर्ज आले होते तर 2007 मधे अशा अर्जांची संख्या 500 च्या वर पोचली होती. टेक्सास इंस्टूमेंट्स, IBM, जनरल इलेक्ट्रिक या सारख्या कंपन्या असे पेटंट अर्ज सादर करण्यात आघाडीवर होत्या. भारतात या बहुराष्ट्रीय कंपन्या जे सृजननिर्मित संशोधन (Innovative Research)करतात ते भारतातील परिस्थिती, उर्जा व कच्च्या मालाची उपलब्धता आणि इथली आर्थिक व सामाजिक परिस्थिती यांच्या अनुषंगानेच केले जाते असे या शोधनिबंधाच्या लेखकांना आढळून आले.

या शोधनिबंधांच्या लेखकांनी, संशोधन करण्याच्या या पद्धतीला काटकसरीची किंवा फ्रुगल पद्धत असे नाव दिले आहे. आणि या पद्धतीने केलेले हे संशोधन जगातील इतर देशातील संशोधनापेक्षा, बदललेल्या जागतिक परिस्थितीत, अतिशय महत्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या शोधनिबंधाची माहिती वाचल्यावर माझ्या हे लक्षात आले की सिंगापूरच्या या अभ्यासकांना हे फ्रुगल इंजिनीअरिंग अगदी नवा कनसेप्ट कदाचित वाटत असेल आणि भारतातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना ही पद्धत नवी वाटत असेल पण भारतातले बहुतेक उत्पादक आणि मुख्यत्वे लघु उद्योजक वर्षानुवर्षे हेच तर करत आलेले आहेत.

आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारण्याच्या आधी भारत सरकारने उद्योग धंद्यांच्यावर एवढी कडक बंधने घातली होती की कोणत्याही उद्योगाला फ्रुगल पद्धत न वापरता काही उत्पादन करणे शक्यच झाले नसते. कच्च्या मालाच्या उपलब्धतेची कोणतीही खात्री नाही. आज एखादी गोष्ट मिळते म्हणजे उद्या ती मिळेलच असे नाही. वीज जोडणी मिळण्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता. कामगार कामावर ठेवण्यासंबंधीचे जाचक नियम आणि अनेक खात्यांच्या इन्स्पेक्टर्सच्या तुमच्या कारखान्याला होणार्‍या भेटी, नियम आणि कायदे कानू. या सगळ्या चक्रव्ह्युहातून भारतातले उत्पादक मार्ग काढतच होते.

या सगळ्यातून मार्ग काढत असताना भारतीय उत्पादकांनी आपली फ्रुगल पद्धत विकसित केली. सिंगापूरचे हे अभ्यासक काही उदाहरणे देतात. कलकत्याला लोकांना चहा 1 रुपयातच देता यावा म्हणून खास तयार केले गेलेले छोटे चिनी मातीचे कप किंवा वीजेच्या भारनियमनाला तोंड देता यावे म्हणून बॅटरीवर चालणारे छोटे रेफ्रिजरेटर अशी उदाहरणे त्यानी दिली आहेत. मला तर वाटते की भारतात तयार होणार्‍या जवळ जवळ सर्व गोष्टी या ग्राहकाची क्रयशक्ती विचारात घेऊनच बनवलेल्या असतात. धातू किंवा लाकूड या ऐवजी प्लास्टिकचा वापर यामुळेच वाढला आहे.

फ्रुगल इंजिनीयरिंग आता फक्त उत्पादनांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. मोबाईल फोन वापर जनसामान्यांना परवडावा म्हणून प्रती सेकंदाला 1 पैसा इतका कमी दर जगात दुसरीकडे कुठेही नाही. मोबाईल फोन जरी स्वस्त झाले तरी त्यावरून कॉल करणे लोकांना परवडले पाहिजे या साठी हा दर ठरवणे व त्यासाठी आवश्यक अशा संगणक प्रणाली विकसित करणे हे फ्रुगल इंजिनीअरिंगच आहे यात शंकाच नाही.

भारतातल्या बहुसंख्य कंपन्या आता फ्रुगल इंजिनीअरिंगचे हे मॉडेल दत्तक घेऊ लागल्या आहेत. बाजारात येणारी सर्व नवी उत्पादने कमीत कमी उत्पादन खर्च, प्रचंड प्रमाणात उत्पादन व कमीत कमी फायद्याचे प्रमाण ही त्रिसूत्री आपली मानत आहेत. या पद्धतीत कंपनीकडे येणार्‍या कॅश फ्लो मधे प्रचंड वाढ होते व असे उत्पादन कंपनीला परवडते. ग्राहकाला उत्पादन स्वस्तात मिळाल्यामुळे त्याची काहीच तक्रार नसते.

फ्रुगल् इंजिनीअरिंग वापरून बाजारात येणार्‍या टाटांच्या नॅनो गाडीसारख्या उत्पादनांची मालिकाच आता बाजारात येऊ लागली आहे. भारतात विकसित होणारे हे तंत्रज्ञान बाकीच्या देशात थोड्याच कालात लोकप्रिय होईल यात शंका वाटत नाही.

21 जानेवारी 2010

नादस्वरम

Posted by: chandrashekhara on: जानेवारी 19, 2010

सिंगापूरमधे माझा मुक्काम असला की रोज सकाळी, घराच्या समोरूनच वहात जाणार्‍या एका कॅनॉलच्या बांधावर असलेल्या रस्त्याने, फिरायला जाण्याचा माझा परिपाठ आहे. माझे पाऊल घराच्या बाहेर पडते त्या सुमारास सूर्य नुकताच उगवलेला असतो. या कॅनॉलच्या बाजूलाच एक दक्षिण भारतीय मंदिर आहे. सकाळच्या वेळी या मंदिरात हमखास, कोणी ना कोणी वाद्यवादक, नादस्वरमवर एखादा राग आळवत असतो. नादस्वरमचे स्वर आसमंत नुसते भरून टाकतात. त्यात भैरव, शंकरा किंवा शिवरंजनी सारखा राग असला तर त्या स्वरांनी अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय रहात नाही.

नादस्वरम हे खरे म्हणजे मोकळ्या आवारात वाजवण्याचे वाद्य आहे. त्याचा मूळ व्हॉईसच एवढा मोठा आहे की ते बैठकीचे वाद्यच नाही. सनई सारखेच दिसणारे हे वाद्य आकाराने बरेच मोठे असते. दक्षिण भारतात मिळणार्‍या व शिसवीसारख्याच दिसणार्‍या एका वृक्षाच्या लाकडापासून नादस्वरमची निर्मिती केली जाते. नादस्वरमचा अंर्तभाग बासरीसारखा लंबगोल नसून तो शंकूच्या आकाराचा (Conical) असतो. त्यामुळे हे वाद्य तोंडात धरण्याच्या बाजूला निमुळते तर दुसर्‍या बाजूला हॉर्नसारखे पसरलेले असते. बासरीप्रमाणेच नादस्वरमला सात छिद्रे असली तरी बासरीमधे या छिद्रांवरचा बोटांचा दाब कमी जास्ती करून जसे तीव्र किंवा कोमल स्वर वाजवता येतात तसे नादस्वरममधे वाजवता येत नाहीत. हे वाजवण्यासाठी नादस्वरममधे तळाला आणखी पाच छिद्रे असतात. बासरीप्रमाणेच नादस्वरममधून अडीच सप्तके (मंद्र ते तीव्र) वाजवता येतात. स्वरनिर्मितीसाठी, नादस्वरमच्या निमुळत्या तोंडाला एक धातूची नळी बसवलेली असते व त्यात एक बांबू किंवा वेताची पट्टी बसवलेली असते. या पट्टीत हवा फुंकून स्वर निर्मिती होते.

तामिळनाडू मधले एक मूर्तीकार श्री. चिन्नकान्नू यांनी काळ्या ग्रॅनाईट दगडातून नुकतीच नादस्वरमची यशस्वीपणे निर्मिती केली आहे. 2 फूटाहून जास्त लांब असलेले हे वाद्य श्री. चिन्नकान्नू यांनी एकाच अखंड दगडातून कोरून काढले आहे. हे वाद्य बनवण्यासाठी योग्य असा दगड ते अनेक वर्षे शोधत होते. हा दगड त्यांच्या घराजवळच्या शेतजमिनीतच त्यांना मिळाला. श्री. चिन्नकान्नू म्हणतात की त्यांनी जेंव्हा आपल्या छिन्नीने या दगडावर ठोकून बघितले होते तेंव्हा एखाद्या ब्रॉन्झच्या मोठ्या खंडावर ठोकल्यासारखा आवाज आला होता. हे वाद्य कोरताना त्यात कोणतीही बारिकशी सुद्धा चीर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. श्री. चिन्नकान्नूंना सर्वात भिती याचीच वाटत असल्यामुळे हे वाद्य बनवत असताना जवळजवळ प्रत्येक पायरीला या भितीनेच त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे रहात होते. या भितीमुळेच या वाद्यातील सर्व छिद्रे सुतार वापरतात तशा हाताने फिरवण्याच्या गिरमिटाने पाडावी लागली आहेत. या गिरमिटामुळे श्री. चिन्नकान्नूंच्या तळहातावर संपूर्ण फोड येऊन ते सोलून निघाले होते.

तीन महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर हे नादस्वरम तयार झाले. तोंडाने हवा फुंकून वाजवण्याची जी वाद्ये आहेत त्यात तांबे किंवा पितळी नळ्यांचा उपयोग न करता बनवलेले हे नादस्वरम सर्वात मोठे वाद्य आहे.

श्री. चिन्नकान्नू म्हणतात की निरनिराळ्या मंदिरांमधल्या दगडी कोरीवकाम केलेल्या मूर्ती ते बघत असत. यात नादस्वरम वाजवणार्‍या मूर्ती बघूनच त्यांना हे वाद्य दगडातून कोरून काढण्याची स्फूर्ती मिळाली. अनेक वादकांनी हे नादस्वरम वाजवून त्यातून निघणारे स्वर अतिशय सुंदर असल्याचे सांगितले आहे

एका शिल्पकाराने बनवलेले हे शिल्प नुसते नयनमनोहर शिल्प न राहता सुंदर स्वरही निर्माण करू शकते हे एक आश्चर्यच आहे.

19 जानेवारी 2010

फर्निचर उद्योग आणि वर्षाअरण्ये

Posted by: chandrashekhara on: जानेवारी 18, 2010

जर आज आपण कोणत्याही प्रगत देशातल्या एखाद्या मोठ्या दुकानाला भेट दिली, तर अतिशय सुंदर दिसणार्‍या लाकडांच्या वस्तूंची एक विशाल अशी श्रेणीच बघायला मिळते. यात स्वयंपाकघरातील कागदी रुमालांची गुंडाळी अडकविण्याचा स्टॅंडपासून, घरातले मोठे फर्निचर दिसते. या शिवाय बांधकामात वापरण्यात येणारे जमिनीवरची लाकडी टाइल्स, भिंतीसाठी मोठे तक्ते व दरवाजे हे असतातच. ही सर्व उत्पादने दिसण्यास अतिशय उत्कृष्ट, घरी अगदी जुजबी हत्यारे वापरून जुळणी करता येतील अशा किट स्वरूपात व अतिशय कमी किंमतीला उपलब्ध असतात.

या सुंदर वस्तू उपलब्ध होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या वस्तू बनवण्यासाठी जे लाकूड वापरले जाते त्याच्या फॉर्ममधे झालेला बदल. पूर्वी सर्व फर्निचर झाडाच्या कापलेल्या ओंडक्यांपासून बनवले जात असे. आता या ओंडक्यांचे बारीक तुकडे किंवा भुगा करून ते तुकडे किंवा तो भुगा, ग्ल्यू च्या सहाय्याने एकत्र दाबला जातो व त्या भुग्याचे पाहिजे त्या आकाराचे तुकडे किंवा ताव बनवले जातात.या लाकूड वापरण्याच्या पद्धतीत झालेल्या छोट्याश्या क्रांतीमुळे या लाकडी रॉ मटेरियलची किंमत एकदमच कमी झाली आहे. पर्यायाने ग्राहकांची ही उत्पादने वापरण्याची पद्धतच बदलत चालली आहे. पूर्वीचे आपल्या घरांच्यातले फर्निचर जर आपण स्मरले तर एकतर ते अतिशय महाग असे आणि त्या कुटुंबाला त्या फर्निचरविषयी एक आत्मियता असे. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ते सुपुर्त करण्यात येई. आताचे नवीन फर्निचर एक नवीन मंत्र घेऊनच येते. तो मंत्र म्हणजे, जोडा- वापरा- फेकून द्या. हे फर्निचर खूप दिवस टिकत नाही व फेकूनच द्यावे लागते. या आधुनिक फर्निचरची जगभरची मागणी सतत वाढत आहे. ., 2006 मध्ये जगभरातले लाकडी फर्निचरचे उत्पादन US$ 270 बिलियन पर्यंत वाढले. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे मागची 10 वर्षे हे उत्पादन दरसाल 30% या गतीने वाढत आहे. ग्राहकाच्या दृष्टीने तर ही एक पर्वणीच आहे. काळ आणि फॅशन यांच्यानुसार बदलणारे फर्निचर आणखी आणखी स्वस्त मिळते आहे. ते वापरायचे आणि नको असले की सरळ फेकून द्यायचे. मग यात तक्रार करण्याजोगे तरी काय आहे?


फक्त एक छोटीशी अडचण आहे. जगभरच्या जंगलांच्या दृष्टीने ही फारच धोकादायक बाब आहे. या शिवाय पंधरा वीस वर्षांपूर्वी फर्निचर बनविण्यास उपयुक्त अशा साग, पाइन, अक्रोड आणि शिसम या प्रकारच्याच लाकडांना मागणी असे. आता MDF सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व प्रकारच्या लाकडाला मागणी आहे.

आता आपण चीन मधील यांगझी नदीच्या दक्षिण किनार्‍यावर असलेल्या ‘झांगजियागांग’ ( Zhangjiagang City) शहराचा एक फेरफटका करू. हे शहर ‘जिआंगसू’ ( Jiangsu Province) प्रांतात आहे व चीनमधल्या शांघाय, नानजिंग, सुझॉअ आणि वुशी सारख्या प्रमुख शहरांच्या जवळ आहे. या शहारात असलेल्या प्रक्रिया उद्योगाने मागच्या वर्षी US$12 बिलियन उलाढाल केली. यापैकी एक मोठा वाटा लाकडी वस्तू बनविणार्‍या कारखान्यांचा आहे कारण या शहराच्या आसपास लाकडी वस्तू बनविणारे असंख्य कारखाने आहेत. .2005 मधेच चिनी लाकडी वस्तू उद्योगाने US$51 बिलियन उलाढाल व US$13 बिलियन निर्यात हे पल्ले गाठले होते. त्यामुळे ‘झांगजियागांग’ मधील लाकूडवस्तू उद्योग हा एकूण चिनी लाकूड वस्तू उद्योगाचा मोठा भाग असल्याने आपल्या अभ्यासासाठी पुरेसा होईल.


झांगजियागांग शहराजवळ एक आधुनिक बंदर विकसित झाले आहे. या बंदरावरच्या सीमाशुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या आंकड्यांनुसार 2008 सालच्या पहिल्या सहा महिन्यात US$ 410 मिलियन किंमतीचे व 1.642 मिलियन घन मीटर एवढ्या संख्येचे लाकडी ओंडके चीनमधे फक्त या बंदरातून आयात केले गेले. ही सगळी आयात वैध स्वरूपाची असली पाहिजे हे स्पष्ट आहे. दुसर्‍या एका अहवालानुसार संपूर्ण चीनमधली लाकडी ओंडक्यांची आयात आता प्रतिवर्ष, 45 मिलियन घन मीटर्स या आंकड्यापर्यंत पोचली आहे. यातील बहुतेक सर्व आयात, गरीब विकसनशील देशांकडून, तोडलेले वृक्ष या स्वरूपातीलच आहे. या शिवाय लाकडी भुस्सा व लाकडाचे लहान तुकडेही (चिप्स) चीन मोठ्या प्रमाणात आयात करतो.


सर्वात खेदाची गोष्ट ही आहे की यापैकी बहुतेम ओंडके हे निर्यात करणार्‍या देशांच्या नकळत व कोणत्याही प्रकारचे सीमा शुल्क न भरता, किंबहुना चोरी केलेलेच, चीनमधे येतात. अर्थातच पर्यावरण टिकविण्याची कोणतीही काळजी या वृक्षतोडीमध्ये घेतली जात नाही. ब्राझिल, कंबोडिया, कॅमरून, कॉंगो-ब्राझव्हील, विषुववृत्तीय गिनी, गॅबन, इंडोनेशिया, ब्रम्हदेश, पापुआ न्यू गिनी आणि सॉलोमन बेटे या गरीब व विकसनशील देशांकडून चीनला होणारी ओंडक्यांची निर्यात कमीत कमी 80% ही चोरलेली व अवैध प्रकारची असते. मलेशिया व रशिया या देशांच्या निर्यातीत हे प्रमाण थोडे कमी म्हणजे 50% ते 60% आहे.


या आयातीची व्याप्ती आणि श्रेणी मी जेंव्हा बघितली तेंव्हा माझ्या मनात साहजिकच हा विचार आला की पृथ्वीच्या पाठीवरची हिरवी जंगले हा फर्निचर उद्योग किती दिवसात गिळंकृत करणार? या गतीने जर जंगले नष्ट होत असली तर ती काही फार दिवस टिकणार नाहीत हे एखादे लहान मूलही सांगू शकेल.

दुर्दैवाने, सर्वच प्रगत राष्ट्रे जंगलांच्या या विध्वंसात महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वस्त लाकडी फर्निचरला या राष्ट्रांच्यात असलेली मागणी वाढतच आहे व ही मागणी चिनी फर्निचर उद्योगाला संजीवनीच बनत आहे. ही मागणी जोपर्यंत वाढत रहाणार तोपर्यंत चिनी फर्निचर उद्योगाची वाढ व विकास हा होतच रहाणार.

नॅशनल जिओग्राफिक मासिकातील एका अभ्यासाप्रमाणे ‘बोर्निओ’ या बेटावरचे निम्मे जंगल आतापर्यंत नष्ट झाले आहे आणि लाकडी ओंडक्यांचे उत्पादन करणारी ‘लो लॅन्ड’ जंगले 2010 पर्यंत नष्ट होतील. ब्राझिल, कंबोडिया, कॅमरून, कॉंगो-ब्राझव्हील, विषुववृत्तीय गिनी, गॅबन, इंडोनेशिया, ब्रम्हदेश, पापुआ न्यू गिनी आणि सॉलोमन बेटे या देशातील जंगलांची हीच अवस्था होण्यासाठी आडकाठी कसली आहे? असा प्रश्न जर कोणी विचारला? तर कोणतीच नाही हेच उत्तर असू शकते. पण हे केंव्हा घडेल? असे जर मला कोणी विचारले तर उत्तर देणे खरोखरच कठीण आहे कारण मला असे प्रामाणिकपणे वाटते की जर जंगलांचा विध्वंस याच गतीने होत राहिला तर ही गोष्ट आपल्याला वाटते आहे त्यापेक्षाही लवकर होईल.

कदाचित आपल्या सर्वांच्या आयुष्यकालात सुद्धा !

18 जानेवारी 2010

blogarama - the blog directory
Blog Directory
MyFreeCopyright.com Registered & Protected

Blog Stats

  • 24,059 hits

आर्चिव्ह्ज

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.