स्वच्छतागृहांचे राजदूत

Posted नोव्हेंबर 9, 2009 by chandrashekhara
Categories: Health- आरोग्य

Tags: , , , , , , , , , , ,

सुलभ इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेचे नाव बहुतेक सगळ्यांनी ऐकलेले असेल. शहरांच्या गरीब वस्त्यांत व ग्रामीण भागात, स्वच्छतागृहांचा प्रसार व प्रचार कसा वाढेल याचा प्रयत्न ही संस्था करत असते. या संस्थेचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक यांना, अतिशय कमी खर्चाचे व पर्यावरणास हानी न पोचवणारे स्वच्छतागृह तयार केल्याबद्दल, या वर्षीचे स्टॉकहोम वॉटरबक्षिस नुकतेच मिळाले. श्री. पाठक यांनी हे कार्य जेंव्हा सुरू केले तेंव्हा स्वच्छतागृहांबद्दल साधे बोलणे सुद्धा हीनपणाचे लक्षण मानले जात असे. असे असताना सुद्धा श्री. पाठक यांनी आपले काम नेटानेच चालू ठेवले व ग्रामीण व गरीब शहरी स्त्रियांना मोठाच दिलासा मिळवून दिला. श्री पाठक यांना या कार्याबद्दल आदराने स्वच्छतागृहांचे राजदूतम्हणून संबोधले तरी चालण्यासारखे आहे इतकी त्यांची या कार्यामागे निष्ठा व तळमळ आहे.

भारतासारख्या देशात या प्रकारचे कार्य, एक सामाजिक चळवळ म्हणूनच चालवणे आवश्यक असले तरी ज्या देशाच्या नसानसातून फक्त व्यापारी रक्त वाहत आहे अशा अमेरिकेसारख्या देशात, जेंव्हा अशा प्रकारच्या कार्याची गरज भासू लागते तेंव्हा अशा स्वच्छतागृह राजदूतांची पगारी नेमणूकच करण्याशिवाय इलाज नाही हे लक्षात येते.

स्वच्छतागृहात वापर करण्याचे टॉयलेट पेपर बनवणार्‍या चारमिनया कंपनीने, नुकतीच न्यूयॉर्क शहराच्या मधवर्ती भागात असलेल्या टाईम्स स्क्वेअरया चौकाजवळ, नवीन स्वच्छतागृहे चालू केली आहेत. न्यूयॉर्कच्या या भागात, प्रवाशांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते व सोईस्कर पडतील अशी स्वच्छतागृहे जवळपास नसल्याने त्यांची नेहमीच अडचण होते. ही गोष्ट लक्षात घेऊन ही स्वच्छतागृहे चालू करण्यात आली आहेत. सहा आठवड्यांपूर्वी चालू केलेल्या या स्वच्छतागृहांना किमान 5 लाख लोक तरी एका वर्षभरात भेट देतील अशी या कंपनीची अपेक्षा आहे.

toilettes

या स्वच्छतागृहांची पुरेशी माहिती लोकांना नसल्याने या स्वच्छतागृहांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये असे वाटल्याने, या कंपनीने आता 5 जणांची भरभक्कम पगारावर, स्वच्छतागृह राजदूत म्हणून नेमणूक करावयाची ठरवले आहे. या राजदूतांचे कॉन्ट्रॅक्ट फक्त 6 आठवड्यांचे असणार असून व त्या साठी त्यांना 10000 यू.एस. डॉलर्स एवढा मोबदला ही कंपनी देणार आहे.

अमेरिकेत नोकर्‍यांची सध्या प्रचंड वानवा असल्याने शेकडो तरूणतरूणींनी या कामासाठी अर्ज केले आहेत. या राजदूतांचे काम, टाईम्स स्क्वेअरमधल्या गर्दीत मिसळून, लोकांना या टॉयलेट्सचे महत्व समजवून सांगणे हे रहाणार आहे. या शिवाय फेसबूक किंवा ट्विटर सारख्या वेब साइट्स वर जाऊन या राजदूतांनी स्वच्छतागृहांचे महत्व लोकांना पटवावे अशीही कंपनीची अपेक्षा आहे. कंपनीने संभाव्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते तेंव्हा काही उमेदवार पहाटे 4 वाजताच हजर झाले. एवढ्या लवकर का आलात म्हणून विचारणा केली असता माझे स्वच्छतागृहांशी किती जवळचे संबंध आहेत हे परिक्षकांना कळावे म्हणूम मी पहाटे आलोअसे मासलेवाईक उत्तर एका उमेदवाराने दिले. नोकरीसाठी आलेल्या उमेदवारात सध्या काम नसलेले नट-नट्या, विद्यार्थी व धंदेवाईकही होते. शिक्षणासाठी फीची व धंद्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी आपण हे काम करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतीसाठी काही उमेदवार टॉयलेट पेपरचे ड्रेसेस घालून आले होते. “मी निवडला गेलो तर मी माझ्या टॉयलेटला चिकटून व त्याच्याशी एकनिष्ठ राहीनअसेही एका उमेदवाराने सांगितले.

ही नोकरी सहा आठवड्यांपुरती मर्यादित आहे. ‘चारमिन‘  या  कंपनीने या स्वच्छतागृहांसाठी 150 लोकांना, सहाय्यक म्हणून नोकरीवर ठेवलेलेच आहे. हे राजदूत या व्यतिरिक्त काम करणार आहेत. अमेरिकेत सध्या 10 टक्के लोक बेकारच आहेत. सहा आठवड्यांनंतर हे राजदूत परत बेकारच होणार आहेत. त्यांच्या या अभिनव अनुभवामुळे त्यांना भारतात सुलभ इंटरनॅशनलसारख्या कंपनीत कायम नोकरी नक्कीच मिळू शकेल यात शंकाच नाही.

9 नोव्हेंबर 2009

विस्थापित गाढवे

Posted नोव्हेंबर 6, 2009 by chandrashekhara
Categories: ताज्या घडामोडी Current Affairs

Tags: , , , , , , ,

तीस चाळीस वर्षांपूर्वी, पुण्याच्या रस्त्यांवरून जाताना एक दृष्य अगदी नेहमी दिसे. रस्त्यावरून जाताना , पुढे खूप धुरळा उडलेला अचानक दिसायला लागायचा. सायकलवरून खाली उतरून बाजूला गप्प उभे रहाण्याशिवाय गत्यंतरच नसायचे. हळूहळू, पाठीवर माती किंवा मुरुम लादलेली चाळीस पन्नास गाढवे व त्यंच्या मागून है हैयो चा पुकारा करत येणारे वडार दिसू लागत. अर्ध्या एक मिनिटात ही वरात पुढे गेली की कपड्यांवरची धूळ झटकत झटकत मार्गक्रमण करता येई. आता माती किंवा वाळूची वाहतुक करण्यासाठी ट्रक किंवा टेंम्पो आले आणि गाढवे रस्त्यावरून दिसेनाशीच झाली.

India_11_04_09_Donkeys

पुण्याच्या रस्त्यांवरून ती गाढवे जरी अदृष्य झालेली असली तरी त्यांचे भाऊबंद अजूनही भारताच्या राजधानीच्या म्हणजे दिल्लीच्या रस्त्यांवरून विटा, वाळू यासारखे बांधकाम साहित्य इकडून तिकडे नेताना बर्‍याच वेळा दिसतात. दिल्लीमधे पाडलेल्या जुन्या इमारतीचे बांधकाम साहित्य, नवीन बांधकामात पुष्कळ ठिकाणी, म्हणजे मुख्यत्वे करून गरीब वस्तींच्यामधे वापरले जाते. या साहित्याची ने आण करण्यासाठी गाढवे हे वाहतुक माध्यम, सर्वात स्वस्त असल्याने बरेच लोकप्रिय आहे. जुन्या दिल्लीच्या बाहेरच्या भागात, जवाहरलाल नेहरू मार्गाच्या आसपास कधीही फेरफटका मारला तरी भिंतीच्या सावलीला उभी असलेली गाढवे व वर्दीची वाट बघत असलेले त्यांचे कुडता-पायजमा व डोक्याला घट्ट टोपी घातलेले त्यांचे मालक हे हमखास दिसतातच. हे लोक व त्यांचे आजे पणजे याच भागात हा धंदा गेली चारशे वर्षे तरी करत असावेत. अजूनही दीड दोनशे गाढवांचे तबेले या भागात आहेतच.

नवी दिल्लीमधे पुढच्या ऑक्टोबर महिन्यात एकोणिसाव्या आंर्तराष्ट्रीय कॉमनवेल्थ खेळांचे आयोजन केले जाणार आहे. त्या निमित्त, दिल्लीचा काया पालट करण्याचा मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावित बदलांमुळे दिल्लीच्या गाढववाल्यांच्यावर मात्र संक्रांत येऊ घातली आहे. या भागात काही नवीन रस्ते बांधण्यात येणार असल्याने या गाढववाल्यांना येथून हुसकावून देण्यात येणार आहे व हा परिसर एकदम स्वच्छ करण्यात येणार आहे. हे गाढववाले व त्यांची गाढवे यांना यमुना नदीच्या पार घालवण्यात येणार असल्याने त्यांच्यात अतिशय अस्वस्थता आहे. गाढवांचा वापर मुख्यत्वे गरीब भागातल्या बांधकामांच्यात केला जातो. हे गाढववाले यमुनापार झाले तर त्यांचा कामधंदा बसणार आहे व दुसरे कोणतेच काम त्यांनी कधीच केलेले नसल्याने दिल्लीच्या बेकार गरीबांच्या संख्येत फक्त भर पडणार आहे.

सध्या दिल्लीच्या सरकारपुढे ऑलिंपिक खेळांसाठी तयार झालेल्या बिजिंग शहराचा आदर्श आहे. बिजिंगमधे केल्या गेलेल्या शहर सुधारणांमधे, मानवी हाल अपेष्टा यांना काही किंमत असते असा विचार सुद्धा तिथल्या कम्युनिस्ट सरकारने कधीच केलेला नाही. लेखणीच्या एका फटकार्‍याने, हजारो लोक तिथे विस्थापित होतात व देशोधडीला लागतात. त्यांना कुठेतरी जागा देण्यात येते व जीवन कसबसे जगावे लागते. या विस्थापितांच्या हाल अपेष्टांचे सोयर-सुतकही तिथल्या सरकारला नसावे असे वाटते.

भारतातली परिस्थिती खूपच निराळी आहे. स्थानिक लोकांना नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादणे हे येथे इतक्या सहजा सहजी शक्य होत नाही. अशा परिस्थितीत जर या गाढववाल्यांवरच्या संकटाचा फायदा जर कोणत्या दुसर्‍या राजकीय पक्षाने करून घेतला तर त्यात नवल वाटू नये. शहरात सुधारणा करायच्या म्हणजे त्या शहराच्या सर्व परंपरा नष्ट करावयाच्या असे ठरवले तर ते योग्य होणार नाही. त्यामुळे दिल्लीच्या गाढववाल्यांना पर्यायी रोजगाराचे साधन उपलब्ध करून न देता त्यांचे विस्थापन करणे कितपत जमेल याची शंकाच वाटते.

6 नोव्हेंबर 2008

सर्वसाधारण माणूस व आर्थिक मंदी

Posted नोव्हेंबर 2, 2009 by chandrashekhara
Categories: अनुभव Experiences

Tags: , , , , ,

गेले वर्षभर, सर्व प्रसार माध्यमांच्यातून, आपण जागतिक मंदीबद्दल सतत ऐकत आलो आहोत. या मंदीचा सर्व राष्ट्रांच्यावर कसा दुष्परिणाम झाला आहे, याबद्दल, मोठमोठे उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी आपल्याला वारंवार सांगताना दिसतात. विशेषत: प्रगत राष्ट्रांच्यात काम करणार्‍या अनेकांच्या या मंदीमुळे नोकर्‍या गेल्या आहेत. अनेक कंपन्यांची विक्री कमी झाली आहे. अमेरिकेतील काही बॅन्का बुडल्या आहेत. हे सगळे जरी माहिती असले तरी ही अर्थिक मंदी सगळ्यांसाठीच खरोखरच इतकी वाईट आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. कोणत्याही नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या घटनेलाही असल्या पाहिजेत असे मला तरी वाटते.

CB022158

आता वैयक्तिक माझ्यापुरते बोलायचे झाले तर मला तरी या जागतिक मंदीमुळे काहीही तोटा न होता फायदाच झाला आहे. मागच्या वर्षी पेट्रोलच्या किंमती चांगल्याच घसरल्या. आता आता पर्यंत वस्तूंच्या किंमती बर्‍यापैकी स्थिर होत्या. शेअरच्या किंमती खूप पडल्यामुळे काही चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात खरेदी करण्याची सुसंधी चालून आली. मार्च एप्रिल महिन्यपर्यंत बॅन्कांनी ठेवीवरचे व्याज दर बरेच वाढवले होते. एकूणच कोणत्याही गोष्टीचा बाजारात साठा नाही असे न घडता सर्व गोष्टी हव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत्या.

मलेशियामधल्या सिनोव्हेट(Synovate) या पाहणी करणार्‍या कंपनीने, नुकतीच एक जागतिक पाहणी याच बाबतीत केली. या कंपनीने 16 निरनिराळ्या मार्केट्स मधल्या तब्बल 11400 लोकांची मते लक्षात घेऊन ही पाहणी केली. या सर्वांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला 1000 अमेरिकन डॉलर्स दिले तर तुम्ही ते कसे खर्च कराल? या पाहणीच्या निष्कर्षांप्रमाणे, असे लक्षात आले आहे की जगातल्या सर्व देशातल्या लोकांच्या पैशांच्या वापराबद्दलच्या प्रवृत्तीत, मोठा क्रांतीकारक बदल मागच्या एका वर्षात घडून आला आहे. 25% लोक या आर्थिक मंदीला एक इष्टापतीच मानतात. त्यांच्या मते या आर्थिक मंदीमुळे त्यांना पैशाचे व त्याची बचत करण्याचे महत्व आधिक चांगल्या रितीने कळू लागले आहे. मलेशियामधले तर 80 % लोक याच मताचे आहेत.

अमेरिकन लोक पैसे खर्च करण्याच्या बाबतीत अत्यंत उधळे म्हणून स्मजले जातात. पण आता 35% अमेरिकन आपण हे 1000 डॉलर कर्जफेडीसाठी वापरू असे म्हणतात तर 23% हे पैसे सरळ बॅन्केत ठेवू असे म्हणतात. 21% टक्के लोक आवश्यक गरजांसाठी हे पैसे खर्च करतील तर फक्त 7% अमेरिकन पैसे उधळण्यास तयार आहेत. जागतिक पातळीवर पैसे बॅन्केत ठेवणार्‍यांची टक्केवारी 28% आहे तर कर्ज फेडून टाकू असे म्हणणार्‍यांची टक्केवारी 17%

या पाहणीतले 58% लोक आपण पैसे पूर्वीसारखे कधीच खर्च करणार नाही असे म्हणतात तर 42% लोकांना आपली बचत वाढवण्याची इच्छा आहे. स्थावर मालमत्तेच्या किंमती जरी मागच्या वर्षी कोसळल्या असल्या तरी त्यातली गुंतवणूक कमी करण्याची फारशी कोणाची इच्छा दिसत नाही.

stock-markets

या पाहणीमधे भारतामधल्या तब्बल 1024 लोकांचा समावेश केलेला होता. या संस्थेचे भारतातले मुख्य मिस्टर मिक गार्डन यांच्या मते भारतातले लोक त्यांना न परवडणार्‍या गोष्टी कधीच खरेदी करत नाहीत. भारतीय कोणत्याही अनावश्यक गोष्टीची खरेदी त्यांच्या बचतीमधून सहसा करत नाहीत. अडचणीसाठी भारतीयांकडे नेहमीच बचत रक्कम असते. त्याला ते कधीच हात लावत नाहीत. या कारणामुळेच, बहुदा या पहाणीत, बहुतेक (62%) भारतीयांनी आपल्याकडे अतिरिक्त रोख रक्कम नसल्याने, आपण हे पैसे अडीअडचणीसाठी ठेवून देऊ म्हणून सांगितले असावे.

वाईटातून चांगले निघते ते असे.

2 नोव्हेंबर 2009

आमटी – भात

Posted ऑक्टोबर 30, 2009 by chandrashekhara
Categories: Health- आरोग्य

Tags: , , , ,

कुठल्याही सच्च्या मराठी माणसाला, जेवणातला कोणता पदार्थ खरा खुरा मनापासून आवडत असेल तर तो म्हणजे तुरीच्या डाळीची खमंग फोडणी घालून केलेली आमटी. अशी आमटी मस्त भुरके मारून भाकरी बरोबर खावी किंवा आंबे मोहर तांदुळाच्या भातावर ओतून, आमटी-भात खावा. या आमटी भाताची सर सुद्धा कोणत्याही पक्वान्नाला येणार नाही. प्रत्येक सुगरण सुगृहिणीच्या हाताच्या आमटीला निराळीच सर असते. कोणी मसाला सढळ हाताने घालतात तर कोणाच्या आमटीला आंबट-गोड चव असते. आमटीत प्रकार सुद्धा किती असावेत? पातळ आमटी, घट्ट फोडणीचे वरण, मुळ्याचे काप किंवा पालक घातलेली आमटी. प्रत्येक आमटीची चव निराळी, ढंग निराळा.

tti

असे जरी असले तरी सगळ्या प्रकारच्या आमट्यांच्यात एक मसाल्याचा पदार्थ हा असतोच असतो. मसाला, लाल तिखट, जिरे, हिंग सगळे वैकल्पिक असते पण हळदीची चिमूटभर तरी पूड ही प्रत्येक प्रकारच्या आमटीत असतेच असते. हळदीचे अनेक गुण आयुर्वेदात सांगितलेले आहेत. हळद जंतूनाशक असते. हळद सांधेदुखी (arthritis) किंवा स्मृतीभ्रंश (dementia.) सारख्या रोगांवर उपयोगी असते असे म्हणतात. इंग्लंडमधले डॉक्टर शॅरन मॅककेना (Dr Sharon McKenna)व कॉर्क़ कॅ न्सर संशोधन केंन्द्रातले (Cork Cancer Research Centre ) त्यांचे सहकारी, यांनी हळदीचा एक नवाच गुणधर्म शोधून काढला आहे.

हळदीमधे असलेला कर्क्युमिन (curcumin) या मूल पदार्थचा एक नवीनच गुणधर्म शोधून काढण्यात या संशोधकांना यश मिळाले आहे. प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात या डॉक्टरांना असे आढळून आले की कर्क्युमिन हा पदार्थ अन्ननलिकेच्या कर्करोगी पेशींना 24 तासात नष्ट करतो. या पदार्थाच्या तावडीत सापडलेल्या कर्क पेशी स्वत:च स्वत:ला नष्ट करणे सुरू करतात.

गेल्या तीस वर्षात अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण जवळ जवळ दुप्पट झाले आहे. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की समाजातील वाढता लठ्ठपणा, मद्यपींची वाढती संख्या या सारख्या गोष्टी या कर्करोगाच्या प्रसाराला कारणीभूत आहेत. मृत्युला कारणीभूत होणार्‍या कर्करोगांच्यामधे, हा कर्करोग सहाव्या क्रमांकावर आहे असे मानतात. त्यामुळेच या संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे.

recipes-dals-n-curries-rajma-roti

आमटी भात भुरकताना त्या आमटीतली हळद किती औषधी आहे हे समजल्यामुळे डावभर आमटी आधिक वाढून घ्यायला काहीच हरकत दिसत नाहीये.

30 ऑक्टोबर 2009

उलटी गंगा

Posted ऑक्टोबर 26, 2009 by chandrashekhara
Categories: ताज्या घडामोडी Current Affairs

Tags: , , , , , , , , ,

भारतातील राजस्थान हे राज्य, तिथल्या वाळवंटी हवामानाबद्दल प्रसिद्धच आहे. ग्रेट इंडियन डेझर्ट किंवा थरचे वाळवंट हे या राज्याचाच भाग असल्याने राज्याच्या इतर भागात सुद्धा अतिशय कमी पाउस, खुरटी झुडपे, उन्हाळ्यात धुळीची वादळे व अति उष्ण हवा तर हिवाळ्यात कडाक्याची थंडी यासारखी वाळवंटी प्रदेशाची वैशिष्ट्ये अनुभवता येतात.

उपग्रहाद्वारा केलेल्या सर्वेक्षणामधे असे आढळले आहे की राजस्थानमधली भूगर्भ जल पातळी वर्षाला एक फूट या प्रमाणात खाली खाली जात चालली आहे. याचा परिणाम साहजिकच हवामानावर होतो आहे. त्यातच या वर्षी पडलेल्या मॉन्सूनच्या पावसाने सरासरीची तीन चतुर्थांश पातळी जेमतेम गाठली आहे व तो अवेळी पडला आहे. याचा परिणाम साहजिकच पिकांच्यावर झाला आहे. बहुतेक ठिकाणी फक्त 5 ते 10 टक्के पीक हातात येईल असे शेतकर्‍यांना वाटते आहे.

जोधपूर हे राजस्थानमधले एक शहर. थरच्या वाळवंटाला लागूनच जोधपूर जिल्हा आहे. या शहराची सूर्य नगर (Sun City) म्हणून प्रसिद्धी आहे. अतिशय सुंदर महाल, किल्ला वगैरे वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणांमुळे, येथे प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. जोधपूरच्या भौगोलिक स्थानामुळे येथे वाळवंटी हवामान व पाण्याचे दुर्भिक्ष असणार अशी कोणाचीही अपेक्षा असणार.

Jodhpur-map

प्रत्यक्षात जोधपूरमधली भूगर्भजल पातळी, वर्षाला साडेचार ते पाच फूट या प्रमाणात, सतत वाढतच चालली आहे. जोधपूरमधल्या कुंजबिहारी मंदिरात सर्वत्र संगमवरी फरशा बसवलेल्या आहेत. या फरश्यांच्या दोन ते तीन इंच वरपर्यंत सतत पाणी असते. फरश्यांच्या मधल्या भेगांच्यातून सतत पाण्याची छोटी कारंजी उडत असतात. ज्या घरांना तळघरे आहेत तेथे रोज इतके पाणी साठते की ते पंप लावूनच काढून टाकावे लागते.

05jodhpur

जोधपूरमधे पाण्याची एवढी सुबत्ता पूर्वी कधीच नव्हती. शहरवासीय अशी एक दंतकथा सांगतात की इ.स. 1459 मधे तिथल्या महाराजाने, जेंव्हा मेहेरनगड किल्याचे भूमीपूजन केले होते तेंव्हा त्या ठिकाणी वस्तीला असलेल्या एका गोसाव्याला हुसकवून लावले होते. संतप्त होऊन या गोसाव्याने “ तुझ्या राज्यात नेहमीच दुष्काळ राहील” असा शाप राजाला दिला होता. शापवाणीने म्हणा किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे म्हणा जोधपूरमधे पाण्याचे नेहमीच दुर्भिक्ष राहलेले आहे. आजूबाजूच्या प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असताना जोधपूरमधे मात्र आज पाण्याची सुबत्ता कशी? हा एक संशोधनाचा विषय झाला आहे.

jjlmkeaghei_thumb

जोधपूरच्या जय नारायण व्यास विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. भवानीशंकर पालीवाल यांच्या मताप्रमाणे, पाण्याच्या या सुबत्तेची दोन प्रमुख कारणे आहेत. प्रथम कारण म्हणजे इ.स. 1997 साली, भारत सरकारने बांधलेल्या राजस्थान कालव्याचे, जोधपूरपर्यंत पोचलेले पाणी. या कालव्यामुळे, पंजाब मधील नद्यांचे पाणी, राजस्थानकडे वळवण्यात आलेले आहे. या कालव्याच्या जवळ शेती असणारे शेतकरी, हे पाणी आपल्या शेतीसाठी वापरतात. त्यामुळे त्यांचा भूगर्भजलाचा उपसाच बंदच झाला आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जोधपूर हे शहर एखाद्या बशीसारख्या खोलगट भूप्रदेशावर वसलेले आहे. त्यामुळे आजूबाजूचे भूगर्भजल जोधपूरच्या शहरी भागाकडे भूगर्भाखालून वहात येते. हे पाणी दुसरा मार्ग नसल्याने जमिनीच्या वर येते आहे.

jjow4fejbjb_thumb

आता या पाण्याचे करायचे तरी काय असा प्रश्न येथील शासनापुढे आहे. शहरांतील बागांना जास्त पाणी पुरवठा केला जात आहे तर नळ टाकून शहरातील जादा पाणी पंप करून आजूबाजूच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या शेतीकडे पाठवावे असाही विचार आहे. या योजना जेंव्हा कार्यवाहीत येतील तेंव्हा येतील, सध्या मात्र वाळवंटाच्या मधे गंगा असा अनुभव जोधपूरवासीयाना येतो आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करणारे हेच लोक आता पाण्याचा मुबलक वापर करताना दिसतात.

26 ऑक्टोबर 2009

पुण्याची वेताळटेकडी-एक फोटोब्लॉग

Posted ऑक्टोबर 25, 2009 by chandrashekhara
Categories: फोटोब्लॉग PhotoBlog

Tags: , , , , , , ,

पुणे शहराचे एक वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या पश्चिम भागामधे असलेली सह्याद्रीच्या टेकड्यांची रांग. वेताळ टेकडी ही या टेकड्यांच्या रांगेतील सर्वात उंच टेकडी. या टेकडीवर  आठशे मीटर उंचीचे एक छोटेखानी शिखर सुद्धा आहे. या शिखरावर, वेताळबाबाचे एक मंदिर आहे. त्या मंदिरामुळेच या टेकड्यांच्या रांगेला वेताळ टेकड्या असे नाव पडले आहे. या शिखरावरच अग्नीशामक दलाने एक निरिक्षण मनोरा बांधला आहे.

on the hill1

मी अगदी लहानपणापासून या टेकड्यांवर मनमुराद फिरलो आहे. आम्ही मित्र, मित्र सूर्य पश्चिमेकडे कलला की या टेकड्या चढण्यास सुरवात करत असू व हनुमान टेकडीवरून सूर्यास्त बघूनच घरी परत येत असू.

sunset

आता मी ठराविक मार्गाने, ठराविक वेळ, टेकडीवर फिरतो. टेकडी, पायी न चढता गाडी घेऊन वर जातो. असे जरी असले तरी तरी हा फेर- फटका केल्यावर मिळणारा आनंद व सुख, लहान वयाएवढेच आहे. पुण्याची हवा नेहमीच आल्हादकारक असते. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे या टेकड्याच आहेत. या टेकड्यांवरची वृक्षराई शहरातली प्रदुषणयुक्त हवा शोषून घेते व स्वच्छ हवा बाहेर टाकते. काही लोक या टेकड्यांना पुण्याची श्वसनसंस्थाच मानतात.

onthehill3

वेताळबाबाचे मंदिर मध्य धरला तर या टेकड्या सगळ्या दिशांना निदान 10 वर्ग किलोमीटर तरी पसरलेल्या आहेतच. या टेकड्यांच्या मधे मधे उथळ दर्‍या आहेत. या दर्‍यांच्यात खुरट्या झाडांचे दाट जंगल आहे. टेकड्यांच्यावर मधे मधे झाडे झुडपे व गवत यामधून छोट्याछोट्या पायवाटा जातात. उत्तरेच्या बाजूला एक वापरात नसलेली दगणखाण आहे.

dagadakhan3

couplein love

यात वर्षाचे सात आठ महिने तरी पाणी साचते. पूर्वेच्या डोंगरउतारावर एक खाजगी न्यास जंगल तयार करतो आहे. त्याची वाढ झाल्यावर हा भाग अतिशय नयनमनोहर होईल यात शंकाच नाही. या टेकड्यांच्या दक्षिणेस सर्व पुणेकरांचा विरोध असताना मध्यवर्ती सरकारने एक प्रयोगशाला उभारलेली आहे. लोकांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी या संस्थेने परिसर फुलझाडे वगैरे लावून सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे.

cosmos

road

वेताळ टेकडी हे पुण्यातले खरे खुरे, अगदी जागतिक दर्जाचे प्रेक्षणिय स्थळ आहे. आता तुम्ही गाडी घेउन वरपर्यंत जाऊ शकता आणि मनमुराद भटकू शकता. फक्त वर जाताना रस्ता एका झोपडपट्टीच्या वस्तीतून जातो तेंव्हा डोळे, कान आणि नाक बंद ठेवूनच वर जा.

vahantal

ते नको असेल तर वॉकिंग शूज घाला व हनुमान टेकडी चढण्यास सुरवात करा.

24 ऑक्टोबर 2009

अस्थिभंग

Posted ऑक्टोबर 23, 2009 by chandrashekhara
Categories: Health- आरोग्य

Tags: , , , , , , , , ,

सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी सकाळी माझ्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे फिरून येत होतो. आमची सदनिका ज्या संकुलात आहे त्या संकुलात जाण्याचा रस्ता चांगला सिमेंट कॉंक्रीटने बांधून काढलेला आहे. या रस्त्याला, संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच एका ठिकाणी जरा जास्त उतार आहे. या ठिकाणी कसा कोणास ठाऊक पण मी पाय घसरून पडलो. पडताना बहुदा सर्व भार माझ्या मनगटावर आला व डाव्या मनगटाचे एक हाड मोडले. अर्थातच मग पुढचे सगळे सोपस्कार करणे भाग पडले. काही आठवडे कोपरापर्यंतचा हात प्लास्टर मधे घालावा लागला. हे सगळे झाल्यावर डॉक्टसाहेबांनी एक निराळेच फर्मान काढले. मी पडलो, ते पाय घसरून की माझी हाडे, वयोमानाने ठिसूळ झाल्यामुळे? हे शोधून काढण्यासाठी ‘अस्थि घनता चाचणी’(Bone Density Test) करणे आवश्यक आहे. मग ही चाचणी करून घेण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. अर्थात ही चाचणी तशी सोपी असते. एका मशिनच्या टेबलावर उताणे पडून रहायचे. यंत्राचाच एक भाग तुमच्या शरीरावरून दीड फूट अंतरावरून कंबरेपासून पावलांपर्यंत सरकत जातो. संगणक पडद्यावर या यंत्राचा चालक ‘अस्थि घनता’ बघत रहातो. शेवटी या घनतेची सरासरी, तुम्हाला संगणक काढून देतो.

bone density test

माझी ही ‘अस्थि घनता’ माझ्या वयाच्या एशियन लोकांची, सरासरीने असते, तेवढीच आहे असे संगणकाने सांगितल्यामुळे, मी पाय घसरूनच पडलो असे निदान झाले. म्हणजे पुढे विशेष काळजी घेण्याची काही गरज नाही असे ठरले. पण या निमित्ताने ह्या हाडे ठिसूळ होण्याच्या व्याधीबद्दल मी थोडेफार वाचन केले व माहिती मिळवली. एखाद्या चोराने तुमच्या घरात अलगद प्रवेश करावा तशी आधी कोणतीही भयसूचक घंटा न वाजवता ही व्याधी तुमच्या शरीरात प्रवेश करते. जेंव्हा आपण व्याधीग्रस्त आहोत असे समजते तेंव्हा शरीरातील एक दोन अस्थिंचा भंग झालेलाही असतो व तसा उशिरच झालेला असतो. त्यामुळेच या व्याधीला मौनधारी मारेकरी म्हणतात ते उगीच नाही. बहुतेक वृद्ध माणसांत हा अस्थिभंग, पाठीच्या मणक्याच्या किंवा ढुंगणाच्या हाडांचा होतो व तो सर्वात गंभीर असतो. असा अस्थिभंग झालेल्या व्यक्तींपैकी 25 टक्के लोकांना उर्वरीत आयुष्य चाकाच्या खुर्चीवर काढावे लागते तर 25 टक्क्यांना अंथरूणनिवासी व्हावे लागते. एक चतुर्थांश लोक परलोकवासी होतात म्हणजे बरे होण्याची शक्यता फक्त 25 टक्केच उरते. मागच्या 30 वर्षात या व्याधीचे बळी ठरणार्‍या व पन्नाशीच्या पुढे वय असणार्‍या स्त्रियांची संख्या पाचपटीने वाढली आहे तर पुरुषांची दीडपटीने.

डॉक्टरांच्या मते कोणत्याही व्यक्तीच्या हाडांची घनता सर्वात जास्त, 20 ते 30 या वयोगटातच असते. त्यानंतर या घनतेचा प्रवास खालच्या दिशेनेच सुरू रहातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या वयोगटापासूनच आपल्या हाडांचा दणकटपणा कसा टिकून राहिल याची काळजी घेणे आवश्यक बनते. आपण तरूण वयापासून निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जसा धनसंचय करतो तसाच म्हातारपणासाठी हाडांच्या बळकटपणाचा संचय करणे आवश्यक असते. या साठी शरीराला पुरेसे कॅल्शियम आणि त्याच्या शरीरात शोषणासाठी जीवनसत्व ड मिळाले पाहिजे व हाडांच्या मजबूतीसाठी वजने उचलण्याचा काहीतरी व्यायाम केला पाहिजे. आहारात दूध, दही, मासे, पालक व ब्रोकोली सारख्या भाज्या असल्या पाहिजेत. आपले शरीर सूर्यप्रकाशात ड जीवनसत्व तयार करते त्यामुळे रोज थोडा वेळ तरी सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडणे आवश्यक असते.

कॅफिन, तंबाखू व मद्यार्क यांचे प्रमाणाबाहेर सेवन हाडांसाठी हानीकारक असते. स्त्रियांच्या शरीरात असलेल्या ऑस्ट्रेजेन या हार्मोनचे प्रमाण मेनोपॉजच्या कालानंतर झपाट्याने कमी होऊ लागते. याचाही विपरित परिणाम अस्थि घनतेवर होतो.

शिर सलामत तर पगडी पचास अशी एक म्हण आपल्याकडे आहे त्या धर्तीवर, हाडे दणकट तर आयुष्य बळकट अशी एखादी म्हण रूढ केली पाहिजे. हाडांचा दणकटपणा इतका महत्वाचा आहे.

23 ऑक्टोबर 2009

शास्त्रज्ञांचे वाड़्मयचौर्य

Posted ऑक्टोबर 21, 2009 by chandrashekhara
Categories: Science

Tags: , , , , , , ,

भारताच्या एकूण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या(GDP) अंदाजे 2 % रक्कम, भारत सरकार शास्त्रीय संशोधनकार्यासाठी दरवर्षी खर्च करते. अनेक प्रयोगशाळा, विद्यापीठे यात या अनुदानातूनच अनेक संशोधन प्रकल्प चालू असतात. या प्रकल्पांसाठी लागणारी उपकरणे व मनुष्यबळ यांच्यावरील खर्च या अनुदानातूनच भागवला जातो. या संशोधन प्रकल्पातून उच्च दर्जाचे, मूलभूत व अप्लाईड संशोधन कार्य व्हावे अशी अपेक्षा सरकारची आणि लोकांची असणे हे स्वाभाविकच आहे.

संपूर्ण देशातील शास्त्रज्ञांनी एकूण किती संशोधन प्रबंध, वर्षभरात प्रसिद्ध केले हे माहिती झाले की देशभरातील एकूण संशोधन कार्याची व्याप्ती व दर्जा काय आहे हे समजण्यास मदत होते. दुखा:ची गोष्ट अशी आहे की एवढे पैसे सरकारने खर्च केल्यावरसुद्धा, भारतात प्रसिद्ध होणार्‍या शास्त्रीय संशोधनपर प्रबंधांची संख्या अतिशय किरकोळ आहे व त्यात फारशी वाढ झाल्याचेही दिसत नाही. इ.स. 1997 मधे प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखांची संख्या फक्त 11000 होती व दहा वर्षांनंतर ती फक्त 22000 झाली आहे. चीनशी तुलना केली तर त्या देशातून प्रसिद्ध झालेल्या लेखांची संख्या 1997 साली 12600 होती ती मागच्या वर्षी 67400 पर्यंत वाढली आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर चीनमधून जगभरच्या एकूण शोधनिबंधांपैकी 8.6% शोधनिबंध प्रसिद्ध होतात तर भारतातून फक्त 2.4% होतात.

अर्थात भारताला भेडसावणारा सर्वव्यापी भ्रष्टाचार, या ठिकाणी आहेच. सरकारने दिलेल्या पैशांपैकी, प्रत्यक्षात किती पैसा संशोधनकार्यासाठी खर्च होतो हा वादाचा मुद्दा आहे. परंतु या लेखाचा विषय निराळा असल्याने तो मुद्दा आपण सोडून देऊ. मागच्या वर्षी शासनाच्या जेंव्हा हे लक्षात आले की आपण खर्च करत असलेल्या पैशांचा मानाने शोधनिबंधांची संख्या अतिशय अल्प आहे व चीन व दक्षिण कोरिया आपल्या प्रचंड पुढे गेलेले आहेत तेंव्हा सरकारी पातळीवरच याचा विचार केला गेला व मनुष्यबळावर होणार्‍या खर्चावर कडक निर्बंध लावले गेले. सर्व पातळीवरच्या शास्त्रज्ञांची पगारवाढ व बढत्या यासाठी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधांचा दर्जा व संख्या हे मानदंड ठरवले गेले व जे शास्त्रज्ञ पुरेसे व उच्च दर्जाचे शोधनिबंध प्रसिद्ध करतील त्यांनाच आर्थिक भरपाई किंवा वाढ मिळेल असे ठरवले गेले. या सरकारी निर्णयामुळे शास्त्रज्ञ मंडळी मोठ्या तणावाखाली आली आहेत. आतापर्यंत, नुसता आराम करत राहून, संशोधनकार्याचा काहीतरी आभास निर्माण करावयाचा ही त्यांची सवय! त्यात बदल करणे आता क्रमप्राप्त झाले आहे.

नवीन शोधनिबंध तर प्रसिद्ध झालेच पाहिजेत पण त्यासाठी आवश्यक संशोधनकार्य कधी केलेलेच नाही अशा धर्मसंकटात ही मंडळी सध्या सापडली आहेत. यातल्या काही शास्त्रज्ञमंडळींनी या अडचणीवर एक सोपा उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे वाड़्मयचौर्याचा. जगभर इतके संशोधन प्रबंध प्रसिद्ध होतात त्यातले थोडे फार इकडे तिकडे करून आपल्या प्रबंधात घातले की काम झाले. असा सोपा उपाय आपल्या शास्त्रज्ञांनी केला. National Centre for Cell Science या पुण्यात असलेल्या संस्थेतील एक शास्त्रज्ञ, श्री गोपाल कुंडु यांनी The Journal of Biological Chemistry या मासिकात एक शोध निबंध 2005 साली प्रसिद्ध केला होता. या लेखाबद्दल श्री कुंडु यांना सरकारी पारितोषिकही मिळाले होते. 2006-2007 मधे या संस्थेला, श्री कुंडु यांचे संशोधन बोगस व फसवे असल्याची माहिती मिळाली. या वरून केलेल्या तपासात श्री कुंडु यांनी खोटेनाटे आकडे घालून आपला शोधनिबंध तयार केल्याचे आढळले. ही तपासणी झाल्यावर श्री. कुंडु यांना आपला गुन्हा मान्य करावाच लागला. संस्थेने 2007मधे हा शोधनिबंध मागे घेतला.

Indian Institute of Science या भारतातील प्रथमश्रेणीच्या संस्थेतर्फे, ‘करंट सायन्स’ नावाचे एक मासिक प्रसिद्ध होते. या मासिकातील माहितीप्रमाणे, 2006 ते 2008 या दोन वर्षात, 80 वाड़्मयचौर्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या शिवाय शोधनिबंधात संदर्भ योग्य रित्या न देणे वगैरेसारखे किरकोळ प्रकार अनेक आहेत.

दोन वर्षांपूर्वी भारतातील एक अग्रगण्य शास्त्रज्ञ श्री रघुनाथ मशेलकर यांनी आपल्या 2004 सालच्या एका पुस्तकात वाड़्मयचौर्याचा प्रकार सापडला आहे असे सांगून सर्वांना एक मोठाच धक्का दिला होता. हे पुस्तक श्री मशेलकर यांनी इतर काही शास्त्रज्ञांच्या बरोबर लिहिले होते. या इतर लेखकांनी, श्री मशेलकरांच्या लिखाणाबरोबरचा, त्या लिखाणाला पाठिंबा देणारा काही इतर मजकूर, दुसर्‍या एका पुस्तकातून शब्द शब्द कॉपी करून घातला होता. व ही गोष्ट त्या वेळी श्री. मशेलकर यांच्या लक्षातच आली नव्हती.

हे असे का घडत असावे? या बाबतीतला माझा एक अनुभव उदबोधक आहे. त्या वेळी मी भारतातल्या एका मोठ्या वाहन उद्योगाच्या संशोधन विभागात काम करत होतो. आमच्या विभागात एक नवीन अभियंता त्या वेळी दाखल झाले. कोणत्यातरी सरकारी संशोधन शाळेत उप संचालक या पदावर ते आधी नोकरीस होते. खाजगी क्षेत्रातील जास्त पगाराच्या लालचीने ते आमच्या कंपनीत आले होते. थोड्याच दिवसांत आम्हा सर्वांच्या हे लक्षात आले की या सदगृहस्थांना अभियांत्रिकीचे शून्य ज्ञान आहे. अर्थातच आपला उमेदवारी काल कसाबसा पार पाडून हे गृहस्थ त्यांच्या संशोधनशालेकडे परत गेले. अशा दर्जाचे शास्त्रज्ञ जर आपल्या प्रयोगशालांत संशोधन करत असले तर ते संशोधन तरी काय दर्जाचे करणार? व शोधनिबंध तरी कसे लिहिणार?  वाड़्मयचोर्याचे प्रकार अशा मंडळींकडूनच मुख्यत्वे घडत असावेत असे मला वाटते.

पण या परिस्थितीवर उपाय तरी काय? असा प्रश्न साहजिकच मनात येतो. एकतर तरूण व नवीन शिष्यवृत्याधारक संशोधकांकडे जास्त जास्त संशोधन कार्य स्वतंत्रपणे सोपवले गेले पाहिजे व दुसरे म्हणजे कडक चाळणी लावून ज्येष्ठ संशोधकांपैकी जे खरोखरच चांगले व खरेखुरे संशोधक असतील तेवढ्यांनाच पदावर ठेवून बाकीच्या सर्वांना रजा दिली पाहिजे. भारतातील संशोधनशालांतील संशोधनांचा दर्जा व प्रमाण यात सुधारणा हवी असेल तर मला तरी दुसरा मार्ग दिसत नाही.

21 ऑक्टोबर 2009

नॉर्वेमधील ‘दो आंखे बारह हाथ’

Posted ऑक्टोबर 20, 2009 by chandrashekhara
Categories: अनुभव Experiences

Tags: , , , , , , ,

कारावास किंवा तुरुंगवास हे शब्द जरी उच्चारले तरी प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यासमोर उभे रहातात स्वातंत्र्यवीर सावरकर व काळे पाणी. अंदमानच्या सेल्युलर जेल मधली त्यांची ती अंधारमय कोठडी, केलेले कष्ट व जन्मठेपेची शिक्षा भोगताना त्यांचे झालेले हाल, हे सर्व डोळ्यासमोर उभे रहाते. आता कारावासांची परिस्थिती त्या मानाने सुधारली असली तरी एकंदरीत तुरुंगवास हा शब्द सुद्धा आपल्या अंगावर शहारे उमटवतो यात शंकाच नाही.

या पार्श्वभूमीवर, नॉर्वे या देशातल्या ‘बॅस्टोई’(Bastoey) या बेटावरच्या तुरुंगाची माहिती वाचली आणि फोटो बघितले तेंव्हा प्रथम डोळ्यावर विश्वासच बसला नाही. हा तुरुंग बनवताना कै. व्ही. शांताराम यांचा ‘दो आंखे बारह हाथ ’ हा चित्रपट डोळ्यासमोर ठेवला होता की काय? असेही वाटले. नॉर्वेची राजधानी ऑस्लोपासून 45 किलोमीटर अंतरावर असणार्‍या या मुक्त तुरुंगात 115 कैदी आजमितीला आहेत. हे कैदी सर्व प्रकारच्या गुन्ह्यांबद्दल शिक्षा भोगणारे असून त्यात, खून, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांबद्दल शिक्षा झालेले सुद्धा आहेत.

norwegian-prison1.preview

हा तुरुंग म्हणजे एक शेतमळा असल्याने येथील कैद्यांना, शेतावर करावी लागणारी, गाईंची निगा, लाकूडतोड व सेंद्रीय अन्नधान्याची पिके घेणे यासारखी सर्व कामे करावी लागतात. तोडलेल्या लाकडांपासून फर्निचर बनवण्यासाठी येथे एक सुसज्ज वर्कशॉप आहे. त्यात करवती, कुर्‍हाडी, सॉ मिल सारखी हत्यारे या कैद्यांना हाताळण्याचे शिक्षण देण्यात येते. तसेच हे लाकूड वापरून घरे कशी बांधावीत हे ही शिकवण्यात येते. कैद्यांच्या कामाची वेळ सकाळी 8.15 ते दुपारी 2.30 एवढीच असते. या नंतर हे कैदी, टेनिस खेळणे, घोड्यांवरून जंगलात फिरणे किंवा समुद्र किनार्‍यावर पोहणे या सारख्या गोष्टी उन्हाळ्यात करू शकतात. थंडीमधे, स्केटिंग, स्की जंपिंग या सारख्या सुविधा त्यांना उपलब्ध असतात. इमारतीच्या आत खेळण्याचे खेळ, सुसज्ज ग्रंथालय या सारख्या सुविधाही आहेत.

Norway_10_17_09_Prisons

संध्याकाळी सर्व कैदी त्यांच्यासाठी असणार्‍या सुसज्ज घरात परत जातात. प्रत्येक घरात 4 ते 6 कैदी वास्तव्य करतात. टी.व्ही., फोन सारख्या सुविधाही कैद्यांना दिल्या जातात. या तुरुंगाचे जेल सुपरिंटेंडंट मिस्टर बॉर्नर डाल यांच्या मते पारंपारिक पद्धतीचे तुरुंग या गुन्हेगारांच्या शाळा आहेत. या ठिकाणी कैद्यांना हेटाळणीने व तिरस्काराने वागवले जात असल्याने हे कैदी कधी सुधारूच शकत नाहीत. बॅस्टोई तुरुंगात कैद्यांना, परत चांगले नागरिक कसे बनायचे याचे शिक्षण दिले जाते. इतर तुरुंगात असलेले ड्रग्स सारखे असलेले प्रश्न येथे नाहीत. बहुतेक कैदी norwegian-prison10तीन चतुर्थांश शिक्षा भोगून झाल्यावर चांगल्या वागणूकीबद्दल तुरुंगातून सोडले जातात.

norwegian-prison4

अर्थात या तुरुंगात येण्याआधी सर्व कैद्यांना पारंपारिक तुरुंगातच आपली शिक्षा चालू करावी लागते. नॉर्वेच्या कायद्यांप्रमाणे फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा कोणालाच दिली जात नाही. जास्तीत जास्त 21 वर्षांची शिक्षा दिली जाते. नॉर्वेमधील प्रोग्रेस पार्टीला हे मान्य नसून गंभीर गुन्ह्यांना जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे असे त्यांचे मत आहे. परंतु सर्वसाधारणपणे तुरुंग असेच मुक्त स्वरूपाचे असावेत असेच सर्वसाधारण मत दिसते.

norwegian-prison6

हा तुरुंग कै. व्ही. शांताराम यांच्या कल्पनेतल्या तुरुंगासारखाच असला तरी येथे ताशा बडवणारी खेळातली गाडी व ती ओढणारी संध्या मात्र दिसत नाही. एवढाच काय तो फरक!

20 ऑक्टोबर 2009

सुदृढ बालकाचा विमा? शक्य नाही!

Posted ऑक्टोबर 16, 2009 by chandrashekhara
Categories: Health- आरोग्य

Tags: , , , , , , , , , ,

जगामधले सर्वात जास्त लठ्ठ लोक बहुदा अमेरिकेत असावेत. सर्वसाधारण अमेरिकन हा इतर देशांतील लोकांच्या मानाने चांगलाच धष्टपुष्ट वाटतो. या धष्टपुष्टपणाचे लठ्ठपणात रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नसावा. सर्वदूर पसरलेल्या या लठ्ठपणामुळे, अमेरिकेतील विमा व्यवसाय, कोणताही व्यक्तीचा विमा उतरताना, तो अतीलठ्ठ तर नाही ना! याची बरीच काळजी घेतात. अमेरिकेत वैद्यकीय सेवा प्रचंड महाग आहे व वैद्यकीय विमा नसला तर रोग्याची तब्येत जसजशी सुधारत जाते तसतशी त्याची आर्थिक परिस्थिती मात्र खालावत जाते. यामुळे वैद्यकीय विमा हा अतिशय आवश्यक मानला जातो. लहान बाळांच्या बाबतीत तर हा विमा अत्यावश्यकच ठरतो.

कोणतीही गोष्ट, अचरटासारखी अगदी टोकाला नेण्यात, अमेरिकन लोकांसारख्याच त्यांच्या कंपन्या व व्यवसाय प्रसिद्धच आहेत. विमा कंपन्यासुद्धा या नियमाला अपवाद नाहीत हे त्यांनी नुकतेच दाखवून दिले आहे.

जगभर, नवजात अर्भकांची पहिली तीन चार वर्षे, सर्व बाबतीतील प्रगती व्यवस्थित होते आहे की नाही हे पडताळून बघण्यासाठी काही मानदंड वैद्यकीय व्यवसायाने स्वीकारले आहेत. या मानदंडात बालकाचे वजन, उंची, डोक्याचा घेर वगैरे सारखी मोजमापे पण लक्षात घेतली जातात. असंख्य बालकांच्या घेतलेल्या अशा मोजमापांच्यावरून तौलनिक तक्ते तयार केलेले असतात. या तौलनिक तक्त्यांमधे साधारण (Average)बालकाची ऊंची, डोक्याचा घेर व त्याचे वजन यांचे आलेख दिलेले असतात. या साधारण

बालकाच्या तुलनेत आपल्या बालकाचे मोजमाप किती कमी किंवा जास्त आहे हे टक्केवारी क्रमांकाने (Percentile Rank) सांगितले जाते. साधारण बालकाची ही टक्केवारी 50 % असते. आपल्या बालकाची टक्केवारी 25 % टक्क्यापेक्षा खाली असली तर आपले बालक कमी वजनाचे, उंचीचे किंवा कमी डोक्याच्या घेराचे समजतात. त्याचप्रमाणे 75% पेक्षा जास्त टक्केवारी असली तर ते बालक जास्त उंच किंवा वजनाचे समजतात.

BABYALEX

अमेरिकेतील ग्रॅन्ड जंक्शन या गावात रहाणारे बर्नी व केली लांग हे असेच सर्व साधारण अमेरिकन जोडपे आहे. 4 महिन्यापूर्वी त्यांच्या अलेक्स या मुलाचा जन्म झाला तेंव्हा त्याचे वजन सर्वसाधारण बालकांप्रमाणेच सव्वा आठ पौंड एवढे होते. चार महिन्यानंतर फक्त आईच्या दुधावर वाढत असलेल्या अलेक्सचे वजन 17 पौंड झाले आहे व त्याची ऊंची 25 इंच झाली आहे. बघणार्‍याला, अलेक्स हा अतिशय निरोगी, गुटगुटीत व गालाला खळ्या पडणारा एक मुलगा दिसतो.

या मुलाचा विमा उतरवण्यास विमा कंपनीने साफ नकार दिला आहे. त्यांच्या मते या मुलाचा तौलनिक क्रमांक 99% येतो आहे. म्हणजे तो अतीलठ्ठ आहे. अलेक्सचे आई-वडील व मोठा भाऊ अगदी किडकिडीत आहेत. विमा कंपन्यांच्या या अचरटामुळे लांग जोडपे वैतागून गेले आहे. “मी काय अलेक्सला ट्रेड मिल वर पळायला सांगू का?” त्याचे वडील विचारतात. तर आई म्हणते की “चार महिन्याच्या मुलाला मी काही ऍट्किन्स डाएट वर ठेवू शकत नाही.  तो रडला की मी त्याला पाहिजे तेवढे दूध हे देणारच”

अलेक्सचे डॉक्टर त्याला अगदी उत्तम आरोग्य असलेले बालक मानतात. वैतागून गेलेल्या लांग जोडप्याने आता विमा कंपन्याच्या नियंत्रकाकडे आपली तक्रार नोंदवली आहे.

16 ऑक्टोबर 2009