एक आगळी वेगळी युनिव्हर्सिटी

Posted डिसेंबर 20, 2009 by chandrashekhara
Categories: Environment-पर्यावरण

Tags: , , , , , , , , , , ,

2007 सालचा नोबल शांतता पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या, पृथ्वीवरील हवामान बदलाच्या संबंधित, एका आंतर्राष्ट्रीय पॅनेलला दिला गेला होता. हा पुरस्कार, या पॅनेलच्या वतीने, अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती अल-गोअर आणि एक प्रसिद्ध भारतीय संशोधक श्री. राजेंद्र के. पचौरी या दोघांनी स्वीकारला होता . श्री. पचौरी हे हवामान बदल, भू ताप वृद्धी, पर्यावरण, प्रदूषण आणि उर्जा बचत या विषयांमधले जागतिक स्तराचे तज्ञ आहेत.

या राजेंद्र पचौरींनी, दहा वर्षापूर्वी, ‘आपले नैसर्गिक स्त्रोत नष्ट होऊ न देता विकासकसा करता येईल? (Sustainable Development)’ या मूलभूत बैठकीवर आधारलेले, एक नवीन विद्यापीठ आपण स्थापन करणार आहोत अशी घोषणा केली होती. साहजिकच जगातील या विषयांसंबंधीच्या तज्ञांचे लक्ष, त्यांच्या या प्रकल्पाकडे लागले होते. आज हे विद्यापीठ नावारूपाला येऊ लागले आहे. अनेक औद्योगिक प्रकल्पांमधले कार्यकारी अधिकारी व शिक्षणतज्ञ यांनी ज्या पद्धतीने हे विद्यापीठ, पर्यावरण, प्रदुषण, गरिबी निर्मूलन या संबंधीच्या विषयांचे शिक्षण देत आहे आणि हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने संशोधन करत आहे त्या बद्दल वाखाणणी केली आहे.


राजेन्द्र पचौरींची ही संस्था, तेरी विद्यापीठ (TERI University) या नावाने ओळखली जाते. नवी दिल्ली मधल्या वसंत कुंज या विभागात या विद्यापीठाची वास्तू उभी राहिली आहे.ही वास्तू, आधुनिक स्थापत्यशास्त्राच्या मदतीने, कमीत कमी उर्जा वापरली जाईल अशी बांधलेली किंवा हरित इमारत (Green Building) म्हणता येईल अशी आहे. असे जरी असले तरी शिक्षण व संशोधन यासाठी लागणार्‍या सर्व आधुनिक सुविधांची सोय येथे केलेली आहे. ज्ञानार्जन व संशोधन यासाठी आवश्यक असे वातावरण निर्माण होईल याची या वास्तूमधे खास काळजी घेण्यात आली आहे. सूर्य उर्जेचा वापर, जमिनीखाली असलेल्या व ज्यातून हवा खेळती राहील अशा एका भुयाराचा, इमारतीमधले तपमान योग्य राखण्यासाठीचा उपयोग, या सारख्या अगदी नवीन तंत्रज्ञानांचा उपयोग या वास्तूच्या आराखड्यात करण्यात आलेला आहे. या वास्तूमधे सर्वसाधारण इमारतींपेक्षा 40% तरी कमी उर्जा व 25% कमी पिण्याचे पाणी वापरले जाते. सांडपाण्याचा उपयोग सिंचनासाठी केला जातो. पावसाचे पाणी सुद्धा वापरले जाते.


तेरी विद्यापीठाला, श्री पचौरी यांनी 1974 मधे स्थापन केलेल्या Energy and Resources Institute, या पर्यावरण विचार कोषाचे (environmental think tank) सहकार्य मिळते. या मदतीमुळे हे विद्यापीठ, पर्यावरण, प्रदुषण व गरिबी निर्मूलन सारख्या विषयातले प्रश्न सोडवण्यासाठीचे प्रकल्प हातात घेऊ शकते व त्यासाठी आवश्यक बौद्धिक पात्रता असलेले संशोधकही विद्यापीठाला उपलब्ध होतात.

नैसर्गिक स्त्रोत प्रबंधन, स्त्रोत नष्ट न होऊ देता विकासकार्य, जल स्त्रोत प्रबंधन आणि सार्वजनिक धोरणे अशा प्रकारच्या सात शाखांमधल्या पद्व्युत्तर पदव्यांसाठी (Master’s) हे विद्यापीठ शिक्षणक्रम उपलब्ध करून देते. याशिवाय हे विद्यापीठ या सर्व विषयांमधे डॉक्टरेट करण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रवेश देते.सर्वसाधारणपणे दर चार विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते. सर्व शिक्षणक्रम हे सामाजिक शास्त्र व प्रत्यक्ष शास्त्र विषय यांचे मिश्रण असते. एक वर्षाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रातील प्रकल्प घेऊन तो पूर्ण करणे आवश्यक असते. हे प्रकल्प, हरित वायु उत्सर्जन कमी करणे, गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रणाली निर्माण करणे व गावे किंवा खेडेगावे निर्माण करत असलेल्या कचर्‍याचे व्यवस्थापन यासारख्या प्रश्नांमधले असतात. व यावर काम करताना पर्यावरणाला हानी न पोचणार नाही अशा प्रणाली निर्माण करणे आवश्यक असते. या संस्थेचे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी नेहमीच तयार असल्याने औद्योगिक कंपन्या त्यांना नोकरीवर ठेवण्यास लगेच तयार असतात.


विद्यापीठाच्या या कार्यामुळे प्रभावित होऊन, अमेरिकेतील प्रसिद्ध येल‘(Yale) युनिव्हर्सिटीने जेंव्हा या वर्षीच्या मार्च महिन्यात, Climate and Energy Institute प्रस्थापित करावयाचे ठरवले तेंव्हा या इन्स्टिट्यूटसाठी प्रमुख म्हणून राजेंद्र पचौरीना पाचारण केले. येलमधले शंभराहून जास्त संशोधक, अभियंते ही नवीन संस्था सुरू करण्याच्या मागे आहेत. ही संस्था पर्यावरण ते सार्वजनिक धोरणे या सारख्या विषयात संशोधन करण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम, तसेच कॉंफरन्सेस, वर्कशॉप, साठी शिष्यवृत्या देणार आहे. interdisciplinary research वर या सर्व कार्याचा भर राहील. जागतिक दर्जाचा इतका प्रसिद्ध शास्त्रज्ञ संस्थाप्रमुख म्हणून मिळाल्याने येल विद्यापीठाचे लोक अर्थातच आनंदी आहेत.

आपला ठसा जागतिक स्तरावर उमटवण्यासाठी तेरी विद्यापीठाने आता जगातील अनेक विद्यापीठांबरोबर सहकार्याचे करार केले आहेत यात Yale, North Carolina State, Michigan State and Brandeis विद्यापीठे आहेत. तसेच् Free University of Berlin, the University of New South Wales, Australia यांच्या बरोबरही करार झाले आहेत. ही सर्व आंतर्राष्ट्रीय विद्यापीठे, तेरी विद्यापीठाबरोबर अभ्यासक्रम तयार करणे आणि भारतातील विकास कार्य याबद्दलच्या माहितीचे आदान प्रदान करत असतात.

तेरी विद्यापीठातून बाहेर पडलेले पदवीधर भारतात व बाहेर आपला चांगलाच ठसा उमटवतील याबाबत शंका वाटत नाही.

20 डिसेंबर 2009

जय गंगे भागिरथी !

Posted नोव्हेंबर 26, 2009 by chandrashekhara
Categories: Environment-पर्यावरण

Tags: , , , , , , , ,

गंगा नदीला भारतीय संस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजल हे अतिशय पवित्र मानले जाते. माणसाच्या अखेरच्या क्षणी, त्याच्या मुखामधे गंगाजलाचे थेंब टाकण्याची प्रथा आहे. गंगेमधे स्नान करण्याने माणसाची सर्व पापे धुवून निघतात असे म्हणतात. उत्तर भारतातील लोक तर गंगेला, गंगामैय्या म्हणजे आईच मानतात. कदाचित युगानुयुगे सर्वांची पापे धूत असताना, गंगामैय्याने बहुदा ती स्वत:कडेच ठेवली असावीत. आता मात्र तिला या पापांचा भार असह्य झालेला दिसतो आहे कारण गंगा नदीचे अस्तित्व राहणार आहे की नाही याचाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

वाराणसी शहरात, गंगेच्या घाटावर लोकांची क्रिया-कर्मे उरकणारे अनेक भटजी आहेत. हे लोक गंगेच्या होणार्‍या अध:पतनाला रोजचे साक्षीदार आहेत. त्यांच्यापैकी काही जण आता मानू लागले आहेत की गंगेचे पाणी आता स्नान करण्यास सुद्धा योग्य राहिलेले नाही. ‘स्वच्छ गंगा अभियानयांची स्वत:ची प्रयोगशाळा आहे त्यात ते गंगेचे पाणी रोज तपासतात. या संस्थेत काम करणार्‍या शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे गंगेचे पाणी दिवसेंदिवस जास्त जास्त खराब होत चालले आहे. पाणी अस्वच्छ होण्याचे प्रमुख कारण हे आहे की मानवी सांडपाणी व मलमूत्र गंगेत काहीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. हे जर थांबले नाही तर थोड्याच कालात गंगा मृत नदी होईल व तिचे पाणी कोणाच्याच उपयोगाला येणार नाही.

1986मधे भारत सरकारने गंगा स्वच्छ करण्याची एक मोहिम हातात घेतली होती. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या मोहिमेचा फारसा काहीच उपयोग न होता नदीचे पाणी जास्त जास्त खराबच होते आहे. हा प्रकल्प अतिशय वाईट पद्धतीने राबवला गेला आहे व सर्वदूर पसरलेल्या भ्रष्टाचाराने या प्रकल्पाचे अपयश नक्की केले आहे. आता परत, भारत सरकारने पुढच्या दहा वर्षात कोट्यावधी रुपये खर्च करून, 2020 पर्यंत गंगाजल शुद्धीकरणाची नवी योजना आखली आहे. यासाठी एक राष्ट्रीय गंगा नदी व खोरे प्राधीकरणस्थापन केले आहे.

गंगेच्या पात्रात, प्रक्रिया न केलेले, कोणतीही औद्योगिक सांडपाणी व मानवी सांडपाणी सोडण्यास आता परवानगी दिली जाणार नाही. पण अशी शक्यता वाटते की गंगेसाठी कदाचित ही शेवटचीच संधी असेल. गंगेचे पाणी जरी पवित्र मानले गेले असले तरी कोट्यावधी भारतीय ते पाणी घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व मच्छीमारीसाठी सुद्धा वापरतात. या मच्छीमारांच्या मताने, गंगेचे पाणी कमी कमी होत चालले आहे. त्यात प्रदुषण फार आहे व मासे कमीच मिळू लागले आहेत. व त्यामुळे या मच्छीमारांना आपले उपजीविकेचे साधनच धोक्यात आल्यासारखे वाटते आहे.

नदीच्या पाण्याच्या होणार्‍या हानी बद्दल लोकांत जागरुकता यावी म्हणून पर्यावरण हा विषय वाराणसी मधल्या सर्व शाळांत आता कंपल्सरी शिकवला जातो. शाळेचे विद्यार्थी नदीच्या पात्राचा आता अभ्यास करतात. त्यांच्या मताने सुद्धा पाणी कमी होत चालले आहे. पात्रात दिसणार्‍या बेटांची संख्या वाढतच चालली आहे. पाण्यात राहणार्‍या प्रजातींची संख्याही कमी कमी होत चालली आहे.

गंगेचे पात्र असेच प्रदूषित होत राहिले तर वाराणसीमधे कठिण परिस्थिती येऊ शकते. गंगेचे पाणी भारतीय जनमानसाशी एवढे जुळलेले आहे की पुढच्या काळात जर गंगेत स्नान करता येणे शक्य झाले नाही तर प्रचंड जन प्रक्षोभ होण्याचीही शक्यता आहे.

गंगाजल शुद्धीकरणाचा प्रकल्प म्हणूनच महत्वाचा बनला आहे. जर गंगा नदी भारतीयांच्या उपयोगाची राहिली नाही तर हजारो वर्षे पूर्वीपासून चालत आलेली जीवनाची एक परंपराच नष्ट होईल यात शंकाच नाही.

25 नोव्हेंबर 2009

सहारा वाळवंटातील सुसर

Posted नोव्हेंबर 23, 2009 by chandrashekhara
Categories: History इतिहास

Tags: , , , , , , ,

माझी खात्री आहे की वरील मथळा वाचून तुम्ही नक्की बुचकळ्यात पडले असणार. माझी तब्येत बरी आहे ना? अशी शंका सुद्धा कदाचित काही जणांना आली असेल. पण सहारा वाळवंटात सापडलेल्या सुसरीची बातमी 100% खरी आहे. ही सुसर फक्त अनेक कोटी वर्षांपूर्वीची आहे व ती आता जीवाश्म स्वरूपातच अस्तित्वात आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथील पुरातन जीवाश्मांचे दोन अभ्यासक, पॉल सेरेनो आणि लान्स लार्सन यांना नायजर देशातल्या Gadoufaoua या भागात हे जीवाश्म आढळून आले आहेत. पृथ्वीच्या इतिहासातल्या क्रेटेशस (Cretaceous ) या युगातले असून साडेसहा ते साडेचौदा कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. या कालात पृथ्वीवरील खंडे एकमेकाच्या जास्त जवळ होती. हवा उबदार होती. व पावसाचे प्रमाणही जास्त होते. या कारणानी आफ्रिका खंडामधे हिरव्यागार परिसरातून वहाणार्‍या विशाल नद्या होत्या. आता सहारा वाळवंट आहे तो भाग दलदलीच्या स्वरूपात होता. त्यामुळेच महाकाय सुसरीसारखे प्राणी तिथे वास्तव्य करून होते.

पॉल सेरेनो आणि लान्स लार्सन यांना सुसरीच्या सहा प्रजाती या ठिकाणी सापडल्या असून त्यांच्या जबड्यांच्या आकारावरून या सुसरींना डुक्करसुसर, उंदीरसुसर, कुत्रासुसर, बदकसुसर, धिरडेसुसर व सर्वात मोठी असलेली सुपरसुसर (BoarCroc, RatCroc, DogCroc, DuckCroc, PancakeCroc and supercroc) अशी नावे या संशोधकांनी दिली आहेत. या संशोधकांना या ठिकाणी सापडलेल्या जीवाश्मांत सुसरींची अंडी, कवट्या, हाडे, पाठीचे कणे, जबडे याची जीवाश्मे सापडली आहेत. या संशोधकांनी या जीवाश्मांचा एक्स-रे, सी.टी स्कॅन सारख्या साधनांनी अभ्यास करून आपले संशोधन केले आहे.


सुसरीच्या या सहा प्रजातींचे खाद्य निरनिराळे होते. त्यांची जीवनपद्धती अलग होती. असे दिसते की या सहा प्रजातींनी सर्व पर्यावरण आपापसात वाटून घेतले होते. या सुसरींपैकी सर्वात विशाल होती सुपरक्रॉक.. ही सुसर चाळीस फूट लांब होती व तिचे वजन 8000 किलोच्या आसपास होते. या सुसरीचा जबडाच सहा फूट लांब होता व त्यात शंभर तरी शक्तीमान दात होते. ही सुसर मासे तर खात होतीच पण लहान डायनॉसॉरसनाही खात असावी.

डुक्करसुसर व धिरडेसुसरी 20 फुटापर्यंत लांब होत्या तर सर्वात लहान सुसरीच्या जबड्याची लांबी फक्त तीन इंच होती. यातल्या काही प्रजाती दोन पायावर ताठ उभ्या राहू शकत होत्या व आपल्या ताकदवान कवटीने भक्षाला जोरदार धडक देऊ शकत होत्या. या प्रजाती आधुनिक सुसरीसारख्या दिसत नसल्या तरी काहींचा जबडा उत्तर भारतात आढळणार्‍या घडियल या सुसरीसारखा आहे.

सध्या आपण पृथ्वीच्या पर्यावरणात, भू ताप वृद्धीमुळे जो किरकोळ बदल होत आहे त्यामुळे घाबरून गेलो आहोत. पण पृथ्वीचा इतिहास बघितला तर याहून अत्यंत भयंकर बदल पृथ्वीच्या पाठीवर अनेक वेळा घडले आहेत. या प्रत्येक बदलाच्या वेळी जीवसृष्टी नामशेष झाली असली तरी सुसरीसारखे काही प्राणी या सर्व बदलांच्यातून तावून सुलाखून बाहेर पडले आहेत व म्हणूनच अजून आपले अस्तित्व अजून टिकवून आहेत.

23 नोव्हेंबर 2009

विषबाधा

Posted नोव्हेंबर 19, 2009 by chandrashekhara
Categories: Environment-पर्यावरण

Tags: , , , , , ,

नैसर्गिक जलस्त्रोत व दरडोई पाण्याची असलेली उपलब्धता या बाबतीत जगातील कोणता देश सर्वात श्रीमंत असेल तर तो म्हणजे बांगला देश. ब्रह्मपुत्रा नदी व तिला येऊन मिळणार्‍या पद्मा वगैरे सारख्या इतर नद्या, आपली जलसंपत्ती बांगला देशात अक्षरश: ओतत असतात. या शिवाय वर्षातले सहा ते आठ महिने वरुणराज आपली कृपादृष्टी या देशाकडे वळवतोच.

असे असले तरी हे एवढे पाणी या देशाला सोसतच नाही. नद्यांना सारखे पूर येतात. समुद्री तुफानांच्यामुळे किनार्‍यालगतचे भाग खार्‍या पाण्याने जलमय होतात. आणि चहुकडे पाणीच पाणी असताना बांगला देशातील गरीबांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतत भेडसावतो असे सांगितले तर खरे सुद्धा वाटणार नाही. पण ही सत्य परिस्थिती आहे. नद्यांना सतत येणार्‍या पुरापासून शेती, गावे यांचे संरक्षण व्हावे म्हणून जागोजाग संरक्षक तलाव बांधण्यात आलेले आहेत. या हजारो तलावांपैकी खूपसे तलाव आंर्तराष्ट्रीय मदत संस्थांच्या मार्फतही बांधले गेलेले आहेत. नद्यांना आला की पुराचे पाणी या तलावां त साठवले जाते व ते शेतीत, गावांच्यात शिरत नाही.

गेल्या काही वर्षांपासून या तलावाचे पाणी पिणार्‍या नागरिकांना, अनेक विचित्र आजारांनी सतावते आहे. तीव्र स्वरूपाच्या पोटातील वेदना, अतिसार, ओकार्‍या व हातापायात असह्य पेटके या सारखे त्रास या पाण्याचे सेवन करणार्‍यांच्यात आढळून आले आहेत. जास्त प्रमाणात पाणी जर पोटात गेले तर काही जण मृत्युमुखी पडल्याचेही आढळले आहे. तसेच या भागात रहाणार्‍या नागरिकांमधे मुत्राशय, मुत्रपिंड, फुफ्फुसे व त्वचेच्या कर्करोगांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

या आजारांचे कारण शोधण्यासाठी या तलावांच्या पाण्याचे जेंव्हा पृथ:करण करण्यात आले तेंव्हा या पाण्यात आर्सेनिक या धातूचे प्रमाण 50 मायक्रोग्रॅम प्रति लिटर या हानी न पोचवणार्‍या पातळीपेक्षा बरेच जास्त आहे असे आढळून आले. या चाचणीमुळे असे म्हणता येते आहे की बांगला देशच्या नागरिकांवर हा एक प्रकारचा विषप्रयोगच होत आहे.

या विषबाधेचे स्वरूप इतके विस्तारले आहे की सध्याच्या अंदाजाप्रमाणे बांगला देशच्या 14 कोटी लोकसंख्येपैकी अडीच कोटी लोकसंख्येला ही विषबाधा होणे संभवनीय आहे. जगाच्या इतिहासात एवढ्या विस्तृत प्रमाणात विषबाधा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या विषबाधेचे कारण शोधणार्‍या शास्त्रज्ञांना, आता या तलावांच्यात, प्रमाणाबाहेर असलेल्या आर्सेनिकच्या हजेरीचे, खरे कारण सापडले आहे. 1970 सालापर्यंत बांगला देशी शेतकरी व ग्रामीण हे अशा प्रकारच्या तलावांचे पाणीच फक्त पीत असत. या पाण्यात रोगराई पसरवणारे बॅक्टेरिया असल्यामुळे हे पाणी पिण्याऐवजी बोअरवेलचे पाणी लोकांनी प्यावे अशी सूचना UNICEFF WHOने केली व त्यांच्याच मदतीने 80 लाखांहून आधिक बोअरवेल 1970 नंतर खोदण्यात आल्या.

या बोअरवेलच, आर्सेनिकच्या विषबाधेचे खरे कारण असल्याचे आता आढळून आले आहे. कोणत्याही जमिनीत, आर्सेनिक हा धातू, 2 मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम, या प्रमाणापर्यंत असतोच. हे आर्सेनिक प्राणवायुसारख्या इतर मौलांबरोबर संयुगे तयार करते. नद्यांचे वाहणारे पाणी ही आर्सेनिकची संयुगे पाण्याबरोबर वहात नेतात व शेवटी गाळाबरोबर नदीच्या मुखापाशी जमवत जातात. बांगलादेशमधल्या नद्या कोट्यावधी वर्षे हेच करत असल्याने, तिथल्या जमिनीत ही आर्सेनिकची संयुगे साठत आली आहेत. बोअरवेलमधून जमिनीखालील पाण्याचा उपसा सुरू झाला की हे आर्सेनिक मिश्रित पाणी जमिनीबाहेर येते व शेवटी वहात जाऊन या तलावांच्यात साठत जाते. सध्या या तलावात असलेले आर्सेनिकचे अतिप्रमाण हे अनेक वर्षांच्या बोअरवेल पाण्याच्या उपसामुळे झालेले आहे.

ही विषबाधा टाळण्यासाठी आता विविध प्रकारचे फिल्टर वापरण्यात येऊ लागले आहे. पण बांगला देशाच्या गरीबांना मात्र हे विषमिश्रित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्यायच सध्या उपलब्ध नाही ही सत्य परिस्थिती आहे.

18 नोव्हेंबर 2009

भारतीय औषध कंपन्यांना सुगीचे दिवस

Posted नोव्हेंबर 15, 2009 by chandrashekhara
Categories: Health- आरोग्य

Tags: , , , , ,

2003 साली, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रेसिडेंट बुश यांनी, जागतिक स्तरावर पसरत चाललेल्या एड्स या रोगाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक आंर्तराष्ट्रीय कार्यक्रम घोषित केला होता. ज्या कायद्याच्या अंर्तगत हा कार्यक्रम राबवण्यात येणार होता त्या कायद्याला United States Leadership Against Global HIV/AIDS, Tuberculosis, and Malaria Act of 2003 असे नाव देण्यात आले. याच कायद्याला पेपफार (PEPFAR) या संक्षिप्त नावानेही संबोधण्यात येते. 30 जुलै 2008 या दिवशी या कायद्याला Tom Lantos and Henry J. Hyde United States Global Leadership Against HIV/AIDS, Tuberculosis, and Malaria Reauthorization Act of 2008 असे नाव देण्यात आले व जुना कायदा सुधारित स्वरूपात लागू झाला. या कायद्यानुसार, पुढच्या 5 वर्षात, 48 बिलियन यू.एस. डॉलर्स या रोगांच्या निर्मूलनासाठी, जगभर खर्च करण्यास अमेरिकन सरकारला संमती दिली गेली आहे.

अमेरिकन सरकारने, इतर देशांच्या सहकार्याने, या कार्यक्रमाद्वारे 2013 सालापर्यंत खालील उद्दिष्टे गाठण्याचे ठरवले आहे. 30 लाख रुग्णांवर उपचार, 1.2 कोटी लोकांचा रोगाची लागण होण्यापासून बचाव, यात 5 लाख अनाथ व गरीब मुले असणार आहेत. या कार्यक्रमासाठी, Botswana, Cote d’Ivoire, Ethiopia, Guyana, Haiti, Kenya, Mozambique, Namibia, Nigeria, Rwanda, South Africa, Tanzania, Uganda, Vietnam and Zambia. हे 15 देश निवडण्यात आले असून तिथल्या रोगपीडीत लोकांवर उपचार सुरू झाले आहेत. तसेच या देशांतील रुग्णसेवेसाठी, हा पेपफार कार्यक्रम, 140000 आरोग्य सेवकांनाही शिक्षण देणार आहे.

आतापर्यंतचा अनुभव असा होता की अशा प्रकारच्या आंर्तराष्ट्रीय कार्यक्रमात, खरा फायदा कोणाचा होत असला तर तो बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांचा. त्यांचा औषधांचा खप, अशा कार्यक्रमांच्यातून बराच वाढतो. या औषधांचे पैसे अमेरिकन सरकार देते व त्यावर या औषध कंपन्या भरपूर नफा कमवतात. परंतु मे 2007 मधे प्रेसिडेंट बुश यांनी एक अध्यादेश जाहीर केला. या अध्यादेशाप्रमाणे, पेपफार कार्यक्रमाला 30 मिलियन यू.एस. डॉलर्स जास्त देण्यात आले व महत्वाचे म्हणजे प्रथमच बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या ब्रॅन्डेड औषधाबरोबरच त्याच औषधांच्या मूळ फॉर्म्युल्याप्रमाणे बनवलेल्या जेनेरिक औषधांच्या खरेदीला अणि वापराला संपूर्ण परवानगी देण्यात आली. जेनेरिक औषधे ब्रॅन्डेड औषधांच्यापेक्षा नेहमीच बरीच स्वस्त असतात व यांच्या वापरामुळे बर्‍याच जास्त रुग्णांना सेवा देणे शक्य होणार होते. अमेरिकेच्या FDAकडून जेनेरिक औषधे मान्यताप्राप्त करून घेण्याची अट या अध्यादेशात होती.

गेल्या दोन वर्षांमधे FDAने 100 अशा औषधांना( anti-retroviral drug) मान्यता दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 100 औषधांत तब्बल 95 औषधे भारतीय औषध कंपन्यांनी बनवलेली आहेत. अरबिंदो फार्मा आघाडीवर असून त्यांची 34 फॉर्म्युलेशन्स मान्य झाली आहेत. सिपला व मॅट्रिक्स लॅबोरेटरीची अमेरिकन शाखा यांना 15 मान्यता मिळाल्या आहेत. स्ट्राईड, एमक्युअर व हेटेरो या कंपन्यांची 5 ते 15 औषधे मान्य झाली आहेत.

antiaids drugs

अरबिंदो फार्माच्या संचालकांच्या मते त्यांची कंपनी ही औषधे ब्रॅन्डेड औषधांच्या एक तृतियांश किंमतीलाच विकत असल्याने पेपफार कितीतरी जास्त रुग्णांना आता सेवा देऊ शकत आहे. सिपला या कंपनीच्या मते त्यांना पेपफार कडून दर वर्षी 20 ते 25 मिलियन य़ू.एस. डॉलर्सचे उत्पन्न मिळते आहे.

भारतीय कंपन्यांच्या औषधांना मान्यता दिल्यामुळे पेपफार कितीतरी मोठ्या प्रमाणात आता या 16 देशातील रुग्णांना मोफत औषधयोजना करू शकते आहे. यातली बहुतेक सर्व औषधे भारतीय कंपन्यांच्याकडून खरेदी केली जात असल्याने भारतीय औषध कंपन्यांच्या नफ्यात भरघोस वाढ झाली आहे.

सर्वांना लाभदायक अशीच ही व्यवस्था असली तरी भारतीय औषध कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत यात शंकाच नाही

14 नोव्हेंबर 2009

एक झोपाळलेले शहर- पॅरिस!

Posted नोव्हेंबर 12, 2009 by chandrashekhara
Categories: अनुभव Experiences

Tags: , , ,

एकोणिसशे साठच्या दशकात, कॅरी ग्रॅन्ट व ऑड्री हेपबर्न यांच्या प्रमुख भूमिका असलेला शराड (Charade) हा चित्रपट खूप लोकांना आठवत असेल. या चित्रपटामधले पॅरिसचे चित्रीकरण माझ्या मनातून अजुनही पुसले गेलेले नाही. तसेच नंतर याच दशकात आलेला एक बॉलीवूडचा चित्रपट, ‘ऍन इव्हीनिंग इन पॅरिसहा सुद्धा अतिशय लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात पॅरिसमधली संध्याकाळ व रात्र यांचे उत्कृष्ट चित्रीकरण होते. या दोन्ही चित्रपटांनी पॅरिस शहर व विशेषेकरून तिथल्या संध्याकाळी व रात्री, यांच्याबद्दल काहीतरी रंगेल व धुंद अशी छबी प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. त्या कालात, परदेश प्रवास हा भारतीयांसाठीतरी दुर्लभच होता असे म्हणले तरी चालेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर पॅरिसला जाण्याची संधी मिळणारा प्रवासी लकी म्हणूनच गणला जाई. साहजिकच अशी संधी मिळालेला कोणीही पॅरिसला जाणारा प्रवासी मनात काहीतरी अपेक्षा ठेवूनच जात असे व पॅरिस त्याच्या अपेक्षा बहुतांशी पूर्ण करत असे.

The-Moulin-Rouge-in-Paris-001

मौला रूज किंवा ल्युडो मधले मन थक्क करणारे नाच, जादूचे प्रयोग, सतत वहात रहाणारी वारुणी व मन उल्हसित करणारे संगीत यांच्या आठवणींनी पॅरिसमधली संध्याकाळ जगभर अजरामजर केलेली आहे. शॉन नदीमधली रात्रीची बोटीतून केलेली सफर, लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात झगमगणारा शॉजे एलिजे हा राजरस्ता व त्याच्यावरचा फेरफटका हे सगळे या अनुभवाचाच भाग आहे. तो प्रवासी आयुष्यात परत पॅरिसला कदाचित जाणारही नाही पण तिथली ती संध्याकाळ तो आयुष्य़भर विसरणारही नाही हे ही खचित.

परंतु पॅरिसची ही रंगेल छबी आता नष्ट होण्याच्या मार्गावर असून हे शहर आता निद्रादेवीची युरोपातली राजधानी होत चालले आहे असे इथल्या संगीत व्यावसायिकांना वाटते आहे. ही मंडळी आता इथल्या सांस्कृतिक मंत्री महोदयांकडे एक अर्ज दाखल करणार आहेत. या अर्जावर गायक, डिस्क जॉकीज, संगीतकार व संगीताचे जलसे जिथे भरतात अशा जागांचे मालक या सर्वांच्या सह्या आहेत. आतापर्यंत 9500 लोकांनी या अर्जावर सह्या केल्या आहेत.

पॅरिसच्या, नाइट क्लब्स, डिस्कोज किंवा पब्स असलेल्या अनेक भागांच्यातून आता लोक राहू लागले आहेत. या लोकांना साहजिकच रात्री शांतता हवी असते. त्यामुळे आवाजावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी संगीतचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी बाबेर रस्त्यावर आवाज प्रदुषण झाल्याचे आढळले तर बराच दंड आता करण्यात येऊ लागला आहे. एक असा हॉल La Flèche d’Or. याच्यावर काही दिवसांपूर्वी सहा महिन्यासाठी बंदी घालण्यात आली. La Locomotive, या हॉलचे भवितव्य अनिश्चित आहे तर प्रसिद्ध बीटल्स व रोलिंग स्टो न्स चे कार्यक्रम जेथे होत ते The Pigalle venue आता कर्जात बुडलेले आहे. या सर्व ठिकाणी साउन्ड प्रूफिंग करण्याची गरज भासते आहे व ते फारच खर्चिक असल्याने या हॉल्सना ते करणे शक्य होत नाहीये.

सर्व सार्वजनिक जागी आता धूम्रपान बंदी करण्यात आलेली आहे. यामुळे प्रेक्षक रात्री बाहेर रस्त्यावर येऊन धूम्रपान करतात व आजूबाजूंच्या लोकांना त्याचा त्रास होतो. या गडबडीची जबाबदारी जिथे कार्यक्रम चालू असतो त्या संयोजकांवर टाकण्यात येते व त्यांना दंड होतो. पॅरिसच्या नाइटलाईफची अशी मुस्कटदाबी झाल्याने येथले सर्वोत्कृष्ट कलाकार बाहेर जाऊ लागले आहेत असे या संगीत व्यवसायींना वाटते आहे.

पॅरिस आता एक मृत शहर झाले आहे.” असे काहीसे अतिरेकी विचार काही मंडळी मांडत असली तरी पॅरीसमधले प्रसिद्ध नाइट क्लब्स अजून पूर्वीसारखीच गर्दी खेचत आहेत असे तिथल्या स्थानिक प्रशासनाला वाटते. हे शहर आता जास्त शांत आणि रहाण्यास जास्त चांगले बनले आहे असेही त्यांना वाटते.

10 नोव्हेंबर 2009

स्वच्छतागृहांचे राजदूत

Posted नोव्हेंबर 9, 2009 by chandrashekhara
Categories: Health- आरोग्य

Tags: , , , , , , , , , , ,

सुलभ इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेचे नाव बहुतेक सगळ्यांनी ऐकलेले असेल. शहरांच्या गरीब वस्त्यांत व ग्रामीण भागात, स्वच्छतागृहांचा प्रसार व प्रचार कसा वाढेल याचा प्रयत्न ही संस्था करत असते. या संस्थेचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक यांना, अतिशय कमी खर्चाचे व पर्यावरणास हानी न पोचवणारे स्वच्छतागृह तयार केल्याबद्दल, या वर्षीचे स्टॉकहोम वॉटरबक्षिस नुकतेच मिळाले. श्री. पाठक यांनी हे कार्य जेंव्हा सुरू केले तेंव्हा स्वच्छतागृहांबद्दल साधे बोलणे सुद्धा हीनपणाचे लक्षण मानले जात असे. असे असताना सुद्धा श्री. पाठक यांनी आपले काम नेटानेच चालू ठेवले व ग्रामीण व गरीब शहरी स्त्रियांना मोठाच दिलासा मिळवून दिला. श्री पाठक यांना या कार्याबद्दल आदराने स्वच्छतागृहांचे राजदूतम्हणून संबोधले तरी चालण्यासारखे आहे इतकी त्यांची या कार्यामागे निष्ठा व तळमळ आहे.

भारतासारख्या देशात या प्रकारचे कार्य, एक सामाजिक चळवळ म्हणूनच चालवणे आवश्यक असले तरी ज्या देशाच्या नसानसातून फक्त व्यापारी रक्त वाहत आहे अशा अमेरिकेसारख्या देशात, जेंव्हा अशा प्रकारच्या कार्याची गरज भासू लागते तेंव्हा अशा स्वच्छतागृह राजदूतांची पगारी नेमणूकच करण्याशिवाय इलाज नाही हे लक्षात येते.

स्वच्छतागृहात वापर करण्याचे टॉयलेट पेपर बनवणार्‍या चारमिनया कंपनीने, नुकतीच न्यूयॉर्क शहराच्या मधवर्ती भागात असलेल्या टाईम्स स्क्वेअरया चौकाजवळ, नवीन स्वच्छतागृहे चालू केली आहेत. न्यूयॉर्कच्या या भागात, प्रवाशांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते व सोईस्कर पडतील अशी स्वच्छतागृहे जवळपास नसल्याने त्यांची नेहमीच अडचण होते. ही गोष्ट लक्षात घेऊन ही स्वच्छतागृहे चालू करण्यात आली आहेत. सहा आठवड्यांपूर्वी चालू केलेल्या या स्वच्छतागृहांना किमान 5 लाख लोक तरी एका वर्षभरात भेट देतील अशी या कंपनीची अपेक्षा आहे.

toilettes

या स्वच्छतागृहांची पुरेशी माहिती लोकांना नसल्याने या स्वच्छतागृहांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये असे वाटल्याने, या कंपनीने आता 5 जणांची भरभक्कम पगारावर, स्वच्छतागृह राजदूत म्हणून नेमणूक करावयाची ठरवले आहे. या राजदूतांचे कॉन्ट्रॅक्ट फक्त 6 आठवड्यांचे असणार असून व त्या साठी त्यांना 10000 यू.एस. डॉलर्स एवढा मोबदला ही कंपनी देणार आहे.

अमेरिकेत नोकर्‍यांची सध्या प्रचंड वानवा असल्याने शेकडो तरूणतरूणींनी या कामासाठी अर्ज केले आहेत. या राजदूतांचे काम, टाईम्स स्क्वेअरमधल्या गर्दीत मिसळून, लोकांना या टॉयलेट्सचे महत्व समजवून सांगणे हे रहाणार आहे. या शिवाय फेसबूक किंवा ट्विटर सारख्या वेब साइट्स वर जाऊन या राजदूतांनी स्वच्छतागृहांचे महत्व लोकांना पटवावे अशीही कंपनीची अपेक्षा आहे. कंपनीने संभाव्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते तेंव्हा काही उमेदवार पहाटे 4 वाजताच हजर झाले. एवढ्या लवकर का आलात म्हणून विचारणा केली असता माझे स्वच्छतागृहांशी किती जवळचे संबंध आहेत हे परिक्षकांना कळावे म्हणूम मी पहाटे आलोअसे मासलेवाईक उत्तर एका उमेदवाराने दिले. नोकरीसाठी आलेल्या उमेदवारात सध्या काम नसलेले नट-नट्या, विद्यार्थी व धंदेवाईकही होते. शिक्षणासाठी फीची व धंद्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी आपण हे काम करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतीसाठी काही उमेदवार टॉयलेट पेपरचे ड्रेसेस घालून आले होते. “मी निवडला गेलो तर मी माझ्या टॉयलेटला चिकटून व त्याच्याशी एकनिष्ठ राहीनअसेही एका उमेदवाराने सांगितले.

ही नोकरी सहा आठवड्यांपुरती मर्यादित आहे. ‘चारमिन‘  या  कंपनीने या स्वच्छतागृहांसाठी 150 लोकांना, सहाय्यक म्हणून नोकरीवर ठेवलेलेच आहे. हे राजदूत या व्यतिरिक्त काम करणार आहेत. अमेरिकेत सध्या 10 टक्के लोक बेकारच आहेत. सहा आठवड्यांनंतर हे राजदूत परत बेकारच होणार आहेत. त्यांच्या या अभिनव अनुभवामुळे त्यांना भारतात सुलभ इंटरनॅशनलसारख्या कंपनीत कायम नोकरी नक्कीच मिळू शकेल यात शंकाच नाही.

9 नोव्हेंबर 2009

विस्थापित गाढवे

Posted नोव्हेंबर 6, 2009 by chandrashekhara
Categories: ताज्या घडामोडी Current Affairs

Tags: , , , , , , ,

तीस चाळीस वर्षांपूर्वी, पुण्याच्या रस्त्यांवरून जाताना एक दृष्य अगदी नेहमी दिसे. रस्त्यावरून जाताना , पुढे खूप धुरळा उडलेला अचानक दिसायला लागायचा. सायकलवरून खाली उतरून बाजूला गप्प उभे रहाण्याशिवाय गत्यंतरच नसायचे. हळूहळू, पाठीवर माती किंवा मुरुम लादलेली चाळीस पन्नास गाढवे व त्यंच्या मागून है हैयो चा पुकारा करत येणारे वडार दिसू लागत. अर्ध्या एक मिनिटात ही वरात पुढे गेली की कपड्यांवरची धूळ झटकत झटकत मार्गक्रमण करता येई. आता माती किंवा वाळूची वाहतुक करण्यासाठी ट्रक किंवा टेंम्पो आले आणि गाढवे रस्त्यावरून दिसेनाशीच झाली.

India_11_04_09_Donkeys

पुण्याच्या रस्त्यांवरून ती गाढवे जरी अदृष्य झालेली असली तरी त्यांचे भाऊबंद अजूनही भारताच्या राजधानीच्या म्हणजे दिल्लीच्या रस्त्यांवरून विटा, वाळू यासारखे बांधकाम साहित्य इकडून तिकडे नेताना बर्‍याच वेळा दिसतात. दिल्लीमधे पाडलेल्या जुन्या इमारतीचे बांधकाम साहित्य, नवीन बांधकामात पुष्कळ ठिकाणी, म्हणजे मुख्यत्वे करून गरीब वस्तींच्यामधे वापरले जाते. या साहित्याची ने आण करण्यासाठी गाढवे हे वाहतुक माध्यम, सर्वात स्वस्त असल्याने बरेच लोकप्रिय आहे. जुन्या दिल्लीच्या बाहेरच्या भागात, जवाहरलाल नेहरू मार्गाच्या आसपास कधीही फेरफटका मारला तरी भिंतीच्या सावलीला उभी असलेली गाढवे व वर्दीची वाट बघत असलेले त्यांचे कुडता-पायजमा व डोक्याला घट्ट टोपी घातलेले त्यांचे मालक हे हमखास दिसतातच. हे लोक व त्यांचे आजे पणजे याच भागात हा धंदा गेली चारशे वर्षे तरी करत असावेत. अजूनही दीड दोनशे गाढवांचे तबेले या भागात आहेतच.

नवी दिल्लीमधे पुढच्या ऑक्टोबर महिन्यात एकोणिसाव्या आंर्तराष्ट्रीय कॉमनवेल्थ खेळांचे आयोजन केले जाणार आहे. त्या निमित्त, दिल्लीचा काया पालट करण्याचा मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावित बदलांमुळे दिल्लीच्या गाढववाल्यांच्यावर मात्र संक्रांत येऊ घातली आहे. या भागात काही नवीन रस्ते बांधण्यात येणार असल्याने या गाढववाल्यांना येथून हुसकावून देण्यात येणार आहे व हा परिसर एकदम स्वच्छ करण्यात येणार आहे. हे गाढववाले व त्यांची गाढवे यांना यमुना नदीच्या पार घालवण्यात येणार असल्याने त्यांच्यात अतिशय अस्वस्थता आहे. गाढवांचा वापर मुख्यत्वे गरीब भागातल्या बांधकामांच्यात केला जातो. हे गाढववाले यमुनापार झाले तर त्यांचा कामधंदा बसणार आहे व दुसरे कोणतेच काम त्यांनी कधीच केलेले नसल्याने दिल्लीच्या बेकार गरीबांच्या संख्येत फक्त भर पडणार आहे.

सध्या दिल्लीच्या सरकारपुढे ऑलिंपिक खेळांसाठी तयार झालेल्या बिजिंग शहराचा आदर्श आहे. बिजिंगमधे केल्या गेलेल्या शहर सुधारणांमधे, मानवी हाल अपेष्टा यांना काही किंमत असते असा विचार सुद्धा तिथल्या कम्युनिस्ट सरकारने कधीच केलेला नाही. लेखणीच्या एका फटकार्‍याने, हजारो लोक तिथे विस्थापित होतात व देशोधडीला लागतात. त्यांना कुठेतरी जागा देण्यात येते व जीवन कसबसे जगावे लागते. या विस्थापितांच्या हाल अपेष्टांचे सोयर-सुतकही तिथल्या सरकारला नसावे असे वाटते.

भारतातली परिस्थिती खूपच निराळी आहे. स्थानिक लोकांना नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादणे हे येथे इतक्या सहजा सहजी शक्य होत नाही. अशा परिस्थितीत जर या गाढववाल्यांवरच्या संकटाचा फायदा जर कोणत्या दुसर्‍या राजकीय पक्षाने करून घेतला तर त्यात नवल वाटू नये. शहरात सुधारणा करायच्या म्हणजे त्या शहराच्या सर्व परंपरा नष्ट करावयाच्या असे ठरवले तर ते योग्य होणार नाही. त्यामुळे दिल्लीच्या गाढववाल्यांना पर्यायी रोजगाराचे साधन उपलब्ध करून न देता त्यांचे विस्थापन करणे कितपत जमेल याची शंकाच वाटते.

6 नोव्हेंबर 2008

सर्वसाधारण माणूस व आर्थिक मंदी

Posted नोव्हेंबर 2, 2009 by chandrashekhara
Categories: अनुभव Experiences

Tags: , , , , ,

गेले वर्षभर, सर्व प्रसार माध्यमांच्यातून, आपण जागतिक मंदीबद्दल सतत ऐकत आलो आहोत. या मंदीचा सर्व राष्ट्रांच्यावर कसा दुष्परिणाम झाला आहे, याबद्दल, मोठमोठे उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी आपल्याला वारंवार सांगताना दिसतात. विशेषत: प्रगत राष्ट्रांच्यात काम करणार्‍या अनेकांच्या या मंदीमुळे नोकर्‍या गेल्या आहेत. अनेक कंपन्यांची विक्री कमी झाली आहे. अमेरिकेतील काही बॅन्का बुडल्या आहेत. हे सगळे जरी माहिती असले तरी ही अर्थिक मंदी सगळ्यांसाठीच खरोखरच इतकी वाईट आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. कोणत्याही नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या घटनेलाही असल्या पाहिजेत असे मला तरी वाटते.

CB022158

आता वैयक्तिक माझ्यापुरते बोलायचे झाले तर मला तरी या जागतिक मंदीमुळे काहीही तोटा न होता फायदाच झाला आहे. मागच्या वर्षी पेट्रोलच्या किंमती चांगल्याच घसरल्या. आता आता पर्यंत वस्तूंच्या किंमती बर्‍यापैकी स्थिर होत्या. शेअरच्या किंमती खूप पडल्यामुळे काही चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात खरेदी करण्याची सुसंधी चालून आली. मार्च एप्रिल महिन्यपर्यंत बॅन्कांनी ठेवीवरचे व्याज दर बरेच वाढवले होते. एकूणच कोणत्याही गोष्टीचा बाजारात साठा नाही असे न घडता सर्व गोष्टी हव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत्या.

मलेशियामधल्या सिनोव्हेट(Synovate) या पाहणी करणार्‍या कंपनीने, नुकतीच एक जागतिक पाहणी याच बाबतीत केली. या कंपनीने 16 निरनिराळ्या मार्केट्स मधल्या तब्बल 11400 लोकांची मते लक्षात घेऊन ही पाहणी केली. या सर्वांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला 1000 अमेरिकन डॉलर्स दिले तर तुम्ही ते कसे खर्च कराल? या पाहणीच्या निष्कर्षांप्रमाणे, असे लक्षात आले आहे की जगातल्या सर्व देशातल्या लोकांच्या पैशांच्या वापराबद्दलच्या प्रवृत्तीत, मोठा क्रांतीकारक बदल मागच्या एका वर्षात घडून आला आहे. 25% लोक या आर्थिक मंदीला एक इष्टापतीच मानतात. त्यांच्या मते या आर्थिक मंदीमुळे त्यांना पैशाचे व त्याची बचत करण्याचे महत्व आधिक चांगल्या रितीने कळू लागले आहे. मलेशियामधले तर 80 % लोक याच मताचे आहेत.

अमेरिकन लोक पैसे खर्च करण्याच्या बाबतीत अत्यंत उधळे म्हणून स्मजले जातात. पण आता 35% अमेरिकन आपण हे 1000 डॉलर कर्जफेडीसाठी वापरू असे म्हणतात तर 23% हे पैसे सरळ बॅन्केत ठेवू असे म्हणतात. 21% टक्के लोक आवश्यक गरजांसाठी हे पैसे खर्च करतील तर फक्त 7% अमेरिकन पैसे उधळण्यास तयार आहेत. जागतिक पातळीवर पैसे बॅन्केत ठेवणार्‍यांची टक्केवारी 28% आहे तर कर्ज फेडून टाकू असे म्हणणार्‍यांची टक्केवारी 17%

या पाहणीतले 58% लोक आपण पैसे पूर्वीसारखे कधीच खर्च करणार नाही असे म्हणतात तर 42% लोकांना आपली बचत वाढवण्याची इच्छा आहे. स्थावर मालमत्तेच्या किंमती जरी मागच्या वर्षी कोसळल्या असल्या तरी त्यातली गुंतवणूक कमी करण्याची फारशी कोणाची इच्छा दिसत नाही.

stock-markets

या पाहणीमधे भारतामधल्या तब्बल 1024 लोकांचा समावेश केलेला होता. या संस्थेचे भारतातले मुख्य मिस्टर मिक गार्डन यांच्या मते भारतातले लोक त्यांना न परवडणार्‍या गोष्टी कधीच खरेदी करत नाहीत. भारतीय कोणत्याही अनावश्यक गोष्टीची खरेदी त्यांच्या बचतीमधून सहसा करत नाहीत. अडचणीसाठी भारतीयांकडे नेहमीच बचत रक्कम असते. त्याला ते कधीच हात लावत नाहीत. या कारणामुळेच, बहुदा या पहाणीत, बहुतेक (62%) भारतीयांनी आपल्याकडे अतिरिक्त रोख रक्कम नसल्याने, आपण हे पैसे अडीअडचणीसाठी ठेवून देऊ म्हणून सांगितले असावे.

वाईटातून चांगले निघते ते असे.

2 नोव्हेंबर 2009

आमटी – भात

Posted ऑक्टोबर 30, 2009 by chandrashekhara
Categories: Health- आरोग्य

Tags: , , , ,

कुठल्याही सच्च्या मराठी माणसाला, जेवणातला कोणता पदार्थ खरा खुरा मनापासून आवडत असेल तर तो म्हणजे तुरीच्या डाळीची खमंग फोडणी घालून केलेली आमटी. अशी आमटी मस्त भुरके मारून भाकरी बरोबर खावी किंवा आंबे मोहर तांदुळाच्या भातावर ओतून, आमटी-भात खावा. या आमटी भाताची सर सुद्धा कोणत्याही पक्वान्नाला येणार नाही. प्रत्येक सुगरण सुगृहिणीच्या हाताच्या आमटीला निराळीच सर असते. कोणी मसाला सढळ हाताने घालतात तर कोणाच्या आमटीला आंबट-गोड चव असते. आमटीत प्रकार सुद्धा किती असावेत? पातळ आमटी, घट्ट फोडणीचे वरण, मुळ्याचे काप किंवा पालक घातलेली आमटी. प्रत्येक आमटीची चव निराळी, ढंग निराळा.

tti

असे जरी असले तरी सगळ्या प्रकारच्या आमट्यांच्यात एक मसाल्याचा पदार्थ हा असतोच असतो. मसाला, लाल तिखट, जिरे, हिंग सगळे वैकल्पिक असते पण हळदीची चिमूटभर तरी पूड ही प्रत्येक प्रकारच्या आमटीत असतेच असते. हळदीचे अनेक गुण आयुर्वेदात सांगितलेले आहेत. हळद जंतूनाशक असते. हळद सांधेदुखी (arthritis) किंवा स्मृतीभ्रंश (dementia.) सारख्या रोगांवर उपयोगी असते असे म्हणतात. इंग्लंडमधले डॉक्टर शॅरन मॅककेना (Dr Sharon McKenna)व कॉर्क़ कॅ न्सर संशोधन केंन्द्रातले (Cork Cancer Research Centre ) त्यांचे सहकारी, यांनी हळदीचा एक नवाच गुणधर्म शोधून काढला आहे.

हळदीमधे असलेला कर्क्युमिन (curcumin) या मूल पदार्थचा एक नवीनच गुणधर्म शोधून काढण्यात या संशोधकांना यश मिळाले आहे. प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात या डॉक्टरांना असे आढळून आले की कर्क्युमिन हा पदार्थ अन्ननलिकेच्या कर्करोगी पेशींना 24 तासात नष्ट करतो. या पदार्थाच्या तावडीत सापडलेल्या कर्क पेशी स्वत:च स्वत:ला नष्ट करणे सुरू करतात.

गेल्या तीस वर्षात अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण जवळ जवळ दुप्पट झाले आहे. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की समाजातील वाढता लठ्ठपणा, मद्यपींची वाढती संख्या या सारख्या गोष्टी या कर्करोगाच्या प्रसाराला कारणीभूत आहेत. मृत्युला कारणीभूत होणार्‍या कर्करोगांच्यामधे, हा कर्करोग सहाव्या क्रमांकावर आहे असे मानतात. त्यामुळेच या संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे.

recipes-dals-n-curries-rajma-roti

आमटी भात भुरकताना त्या आमटीतली हळद किती औषधी आहे हे समजल्यामुळे डावभर आमटी आधिक वाढून घ्यायला काहीच हरकत दिसत नाहीये.

30 ऑक्टोबर 2009