2007 सालचा नोबल शांतता पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या, पृथ्वीवरील हवामान बदलाच्या संबंधित, एका आंतर्राष्ट्रीय पॅनेलला दिला गेला होता. हा पुरस्कार, या पॅनेलच्या वतीने, अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती अल-गोअर आणि एक प्रसिद्ध भारतीय संशोधक श्री. राजेंद्र के. पचौरी या दोघांनी स्वीकारला होता . श्री. पचौरी हे हवामान बदल, भू ताप वृद्धी, पर्यावरण, प्रदूषण आणि उर्जा बचत या विषयांमधले जागतिक स्तराचे तज्ञ आहेत.
या राजेंद्र पचौरींनी, दहा वर्षापूर्वी, ‘आपले नैसर्गिक स्त्रोत नष्ट होऊ न देता विकास‘ कसा करता येईल? (Sustainable Development)’ या मूलभूत बैठकीवर आधारलेले, एक नवीन विद्यापीठ आपण स्थापन करणार आहोत अशी घोषणा केली होती. साहजिकच जगातील या विषयांसंबंधीच्या तज्ञांचे लक्ष, त्यांच्या या प्रकल्पाकडे लागले होते. आज हे विद्यापीठ नावारूपाला येऊ लागले आहे. अनेक औद्योगिक प्रकल्पांमधले कार्यकारी अधिकारी व शिक्षणतज्ञ यांनी ज्या पद्धतीने हे विद्यापीठ, पर्यावरण, प्रदुषण, गरिबी निर्मूलन या संबंधीच्या विषयांचे शिक्षण देत आहे आणि हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने संशोधन करत आहे त्या बद्दल वाखाणणी केली आहे.
राजेन्द्र पचौरींची ही संस्था, तेरी विद्यापीठ (TERI University) या नावाने ओळखली जाते. नवी दिल्ली मधल्या वसंत कुंज या विभागात या विद्यापीठाची वास्तू उभी राहिली आहे.ही वास्तू, आधुनिक स्थापत्यशास्त्राच्या मदतीने, कमीत कमी उर्जा वापरली जाईल अशी बांधलेली किंवा हरित इमारत (Green Building) म्हणता येईल अशी आहे. असे जरी असले तरी शिक्षण व संशोधन यासाठी लागणार्या सर्व आधुनिक सुविधांची सोय येथे केलेली आहे. ज्ञानार्जन व संशोधन यासाठी आवश्यक असे वातावरण निर्माण होईल याची या वास्तूमधे खास काळजी घेण्यात आली आहे. सूर्य उर्जेचा वापर, जमिनीखाली असलेल्या व ज्यातून हवा खेळती राहील अशा एका भुयाराचा, इमारतीमधले तपमान योग्य राखण्यासाठीचा उपयोग, या सारख्या अगदी नवीन तंत्रज्ञानांचा उपयोग या वास्तूच्या आराखड्यात करण्यात आलेला आहे. या वास्तूमधे सर्वसाधारण इमारतींपेक्षा 40% तरी कमी उर्जा व 25% कमी पिण्याचे पाणी वापरले जाते. सांडपाण्याचा उपयोग सिंचनासाठी केला जातो. पावसाचे पाणी सुद्धा वापरले जाते.
तेरी विद्यापीठाला, श्री पचौरी यांनी 1974 मधे स्थापन केलेल्या Energy and Resources Institute, या पर्यावरण विचार कोषाचे (environmental think tank) सहकार्य मिळते. या मदतीमुळे हे विद्यापीठ, पर्यावरण, प्रदुषण व गरिबी निर्मूलन सारख्या विषयातले प्रश्न सोडवण्यासाठीचे प्रकल्प हातात घेऊ शकते व त्यासाठी आवश्यक बौद्धिक पात्रता असलेले संशोधकही विद्यापीठाला उपलब्ध होतात.
नैसर्गिक स्त्रोत प्रबंधन, स्त्रोत नष्ट न होऊ देता विकासकार्य, जल स्त्रोत प्रबंधन आणि सार्वजनिक धोरणे अशा प्रकारच्या सात शाखांमधल्या पद्व्युत्तर पदव्यांसाठी (Master’s) हे विद्यापीठ शिक्षणक्रम उपलब्ध करून देते. याशिवाय हे विद्यापीठ या सर्व विषयांमधे डॉक्टरेट करण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रवेश देते.सर्वसाधारणपणे दर चार विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते. सर्व शिक्षणक्रम हे सामाजिक शास्त्र व प्रत्यक्ष शास्त्र विषय यांचे मिश्रण असते. एक वर्षाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रातील प्रकल्प घेऊन तो पूर्ण करणे आवश्यक असते. हे प्रकल्प, हरित वायु उत्सर्जन कमी करणे, गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रणाली निर्माण करणे व गावे किंवा खेडेगावे निर्माण करत असलेल्या कचर्याचे व्यवस्थापन यासारख्या प्रश्नांमधले असतात. व यावर काम करताना पर्यावरणाला हानी न पोचणार नाही अशा प्रणाली निर्माण करणे आवश्यक असते. या संस्थेचे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी नेहमीच तयार असल्याने औद्योगिक कंपन्या त्यांना नोकरीवर ठेवण्यास लगेच तयार असतात.
विद्यापीठाच्या या कार्यामुळे प्रभावित होऊन, अमेरिकेतील प्रसिद्ध ‘येल‘(Yale) युनिव्हर्सिटीने जेंव्हा या वर्षीच्या मार्च महिन्यात, Climate and Energy Institute प्रस्थापित करावयाचे ठरवले तेंव्हा या इन्स्टिट्यूटसाठी प्रमुख म्हणून राजेंद्र पचौरीना पाचारण केले. येलमधले शंभराहून जास्त संशोधक, अभियंते ही नवीन संस्था सुरू करण्याच्या मागे आहेत. ही संस्था पर्यावरण ते सार्वजनिक धोरणे या सारख्या विषयात संशोधन करण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम, तसेच कॉंफरन्सेस, वर्कशॉप, साठी शिष्यवृत्या देणार आहे. interdisciplinary research वर या सर्व कार्याचा भर राहील. जागतिक दर्जाचा इतका प्रसिद्ध शास्त्रज्ञ संस्थाप्रमुख म्हणून मिळाल्याने येल विद्यापीठाचे लोक अर्थातच आनंदी आहेत.
आपला ठसा जागतिक स्तरावर उमटवण्यासाठी तेरी विद्यापीठाने आता जगातील अनेक विद्यापीठांबरोबर सहकार्याचे करार केले आहेत यात Yale, North Carolina State, Michigan State and Brandeis विद्यापीठे आहेत. तसेच् Free University of Berlin, the University of New South Wales, Australia यांच्या बरोबरही करार झाले आहेत. ही सर्व आंतर्राष्ट्रीय विद्यापीठे, तेरी विद्यापीठाबरोबर अभ्यासक्रम तयार करणे आणि भारतातील विकास कार्य याबद्दलच्या माहितीचे आदान प्रदान करत असतात.
तेरी विद्यापीठातून बाहेर पडलेले पदवीधर भारतात व बाहेर आपला चांगलाच ठसा उमटवतील याबाबत शंका वाटत नाही.
20 डिसेंबर 2009
























