गाडीच्या छतावरील प्रवास थांबविण्यासाठी कॉंक्रीटचे गोळे; Concrete balls prevent rooftop travel

काही वर्षांपूर्वी बॉलीवूडच्या एका हिंदी सिनेमात असलेले ” छैंया छैंया ” हे गाणे खूप गाजले होते. या गाण्याचे चित्रीकरण रेल्वेच्या डब्यांमधे केले गेले होते हे वाचकांना नक्कीच आठवेल. या गाण्यातील नाचाचा काही भाग उघड्या मालवाहक डब्यात तर काही डब्यांच्या छतावर दाखवला गेला होता. रेल्वेच्या डब्यावरून प्रवास करण्याची पद्धत आपल्याकडे काही नवीन नाही. बिहार, राजस्थान सारख्या ठिकाणी गाड्यांची सेवा अगदी अल्प संख्येने आणि प्रवासी जास्त असल्याने अनेक लोक डब्याच्या छपरावरून अजुनही प्रवास करतात. महाराष्ट्रात सुद्धा अगदी अलीकडे पर्यंत, बार्शीहून पंढरपूरला जाणार्‍या बार्शी लाइट रेल्वेच्या डब्यांच्य टपावरून लोक प्रवास करतच असत. अर्थात ही गाडी इतकी हळूहळू जात असे की असा प्रवास धोकादायक असला तरी अशक्य कोटीतील नव्हता.
इंडोनेशिया देशामध्ये असलेले रेल्वेचे जाळे असेच सध्याच्या प्रवाशांच्या संख्येला अपुरे पडते आहे. इंडोनेशिया स्वतंत्र होण्याच्या आधी डच लोकांनी बांधलेल्या या रेल्वे मार्गांची देखभाल पाहिजे त्या दर्जाची होत नसल्याने, त्यावरून धावू शकणार्‍या गाड्या आजच्या प्रवाशांच्या संख्येला पुरत नाहीत. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता मधे रोज ये-जा करणार्‍या प्रवाशांचीच संख्या 4 लाखावर आहे. या लोकांना उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्यांची संख्या अपुरी आहे व त्या बर्‍याच वेळा उशीराने धावत असल्याने गर्दी अधिकच वाढते. या प्रचंड गर्दीमुळे बरेच प्रवासी रेल्वे डब्याच्या छपरावरून प्रवास करणेच पसंत करतात. इंडोनेशिया मधल्या रेल्वेची तिकिटे काही खूप महाग नाहीत. परंतु बर्‍याच गरीबांना हे दरही परवडत नाहीत व तिकिटे न काढता प्रवास करणारे हे लोक सुद्धा डब्यांच्या छपरावरून प्रवास करणे पसंत करतात.
गाडीच्या छतावरून प्रवास किती धोकादायक आहे हे होणार्‍या अपघातांच्या संख्येने लगेच लक्षात येते. 2008 मध्ये छतावरून प्रवास करणारे 53 लोक मृत्यूमुखी पडले होते तर 2011 मध्ये ही संख्या 11 होती. यातले बहुतेक जण वरून जाणार्‍या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने मरण पावले आहेत तर काही लोक खाली घसरून पडल्याने प्राणाला मुकले आहेत. इंडोनेशियन रेल्वे सुरक्षा अधिकारी प्रवाशांनी असा प्रवास करू नये म्हणून जंग जंग पछाडताना दिसत आहेत. प्रथम त्यांनी गाड्यांच्या टपावर रंग लावणे. ऑइल टाकणे या सारखे साधे उपाय करून बघितले. या नंतर लोकप्रिय कलाकारांना सुरक्षा विषयक गाणी म्हणून लोकांना टपावरून प्रवास करण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्नही या अधिकार्‍यांनी करून बघितला. या कोणत्याच उपायाला छतावरून प्रवास करणारे प्रवासी न बधल्याने शेवटी टपावर काटेरी तारा पसरवण्यात आल्या. त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. असा प्रवास करणार्‍यांना इंडोनेशियात तुरूंगवासाची शिक्षा आहे पण त्याचाही उपयोग होत नाही. या प्रश्नाने आता अतिशय गंभीर रूप धारण केल्याने आता इंडोनेशियन रेल्वे अधिकार्‍यांनी शेवटचा जमालगोटा उपाय अंमलात आणण्याचे ठरवले आहे.
रेल्वे डब्याच्या छपरापासून काही इंच अंतरावर येतील असे साखळीला अडकवलेले कॉंक्रीटचे गोळे आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर व क्रॉसिंग्जजवळ एका लोखंडी सांगाड्यावर टांगण्यात येणार आहेत. छतावरून प्रवास करणॆ त्यामुळे शक्यच होणार नाही. जकार्ता जवळच्या एका स्टेशनवर असे कॉंक्रीटचे गोळे अडकवलेला पहिला सांगाडा उभारण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास असे सांगाडे सर्व महत्वाची स्टेशन्स व क्रॉसिंग्ज जवळ उभारण्यात येतील.
हे कॉंक्रीटचे गोळे उभारण्याचा रेल्वे अधिकार्‍यांचा निर्णय बर्‍याच प्रवाशांना आवडलेला नाही. त्यांना अशी आशा आहे की थोड्याच दिवसात हा प्रयोग बंद होईल व पूर्वीसारखेच त्यांना छतावरून प्रवास करणे शक्य होईल.
20 जानेवारी 2012