पारतंत्र्याविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, भारतीय जनतेचे नेतृत्व करणार्या नेत्यांमध्ये, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्थान अतिशय आदरणीय व अत्यंत महत्वाचे होते हे या इतिहासाचा कोणीही अभ्यासक सहज सांगेल. या नेताजी सुभाषचंद्र बोसांनी, 1945 सालच्या जुलै महिन्यात, सिंगापूरला एक धावती भेट दिली होती. या भेटीतील एक महत्वाचा कार्यक्रम होता, आझाद हिंद सेना, सिंगापूर मध्ये बांधू इच्छित असलेल्या हुतात्मा स्मारकाची कोनशिला रचण्याचा समारंभ.! ब्रिटिश सेनेबरोबर मणिपूर, आसाम व ब्रम्हदेश या ठिकाणच्या जंगलात लढताना, आझाद हिंद सेनेच्या ज्या शूर सैनिकांनी हौतात्म्य पत्करले होते त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले जाणार होते.
या कोनशिला समारंभाच्या वेळी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांसमोर केलेल्या भाषणात नेताजी सुभाषचंद्रांनी सांगितले होते की
” तुम्ही केलेल्या असीम त्यागामुळे भारताच्या भावी पिढ्या गुलाम म्हणून जन्माला न येता भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून जन्माला येणार आहेत. या भावी पिढ्या तुमच्या नावाचे पूजन तर करतीलच पण सर्व जगाला हे ठामपणे सांगतील की आमचे हे पूर्वज मणिपूर, आसाम व ब्रम्हदेश येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. या लढाईत जरी त्यांना तात्पुरता पराभव पत्करण्यास लागला असला तरी या पराभवातूनच अखेरचा विजय आणि वैभव देशाला प्राप्त होऊ शकला आहे.”
आझाद हिंद सेनेची कल्पना मुळात कॅप्टन मोहन सिंग या सिंगापूरमधे जपान्यांच्या कैदेत असलेल्या एका भारतीय युद्धकैद्याची होती. 1942 सालामध्ये सिंगापूर मधल्या भारतीयांमध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल जागृती घडवून आणण्यासाठी ही सेना स्थापन करण्यात आली होती. सिंगापूरमधील ज़पानी अधिकार्यांना ही कल्पना आवडली कारण यामुळे सिंगापूरमधील भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल असलेल्या रोषाला खतपाणी मिळून सिंगापूरमधले भारतीय जपानी सैन्याच्या बाजूचे होतील अशी शक्यता त्यांना दिसली. या नंतर सिंगापूरमध्ये केल्या जाणार्या रेडिओ प्रक्षेपणामध्ये, जपानी सैनिकांनी भारतीयांसाठी खास संदेश देण्यास सुरूवात केली. सिंगापूरवरचे जपानी आक्रमण हे भारतीयांनी आक्रमण म्हणून न समजता त्यांना मिळालेले स्वातंत्र्य आहे असे समजावे असे हे संदेश सांगू लागले. परंतु थोड्याच दिवसात आझाद हिंद सेनेचे संयोजक व जपानी अधिकारी यात वितुष्ट आले व 1943 मध्येच ही कल्पना सोडून देण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्र बोसांना मात्र या आझाद हिंद सेनेच्या कल्पनेच्या मागचे महत्व ध्यानात आले व त्यांनी ‘माझ्या शत्रूचा शत्रू तो माझा मित्र‘ या उक्तीप्रमाणे जपान कडून सक्रीय सहाय्य अधिकृतपणे मागण्यास सुरूवात केली. या चळवळीमुळे सर्व एशिया मध्ये जपानी साम्राज्य स्थापन करण्याच्या जपानी हेतूला मदतच मिळेल हे लक्षात आल्याने जपानी सरकारने सुभाषचंद्र बोसांना सर्व मदत देण्याचे मान्य केले. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतातील एक प्रमुख नेते व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे आधीचे अध्यक्ष होते. अतिशय जहाल भाषणे करण्यात त्यांचा हातखंडा असल्याने, थोड्याच दिवसात त्यांनी आझाद हिंद सेनेला युद्धकैद्यांमध्ये मोठा पाठिंबा निर्माण केला व जपानी सहाय्याने आझाद हिंद सेना निर्माण झाली. थोडेफार शिक्षण घेतल्यावर, या सेनेला ब्रम्हदेशात पाठवण्यात आले. प्रथमत: उत्तम कामगिरी करून या सैन्याने इंफाळ पर्यंत चढाई करून भारतीय भूमीवरील इंफाळ ताब्यात घेतले. मात्र यानंतर ब्रिटिश सेनेपुढे त्यांची डाळ शिजली नाही व त्यांना माघार घ्यावी लागली. या नंतर थोड्याच दिवसात नेताजी सुभाषचंद्र बोस अकस्मात नाहीसे झाले. (त्यांचे विमान अपघातात निधन झाले असे जपानी लोकांचे म्हणणे आहे.) यानंतर आझाद हिंद सेनेचे धैर्य खचून ती नामशेष होण्याच्या मार्गाला लागली. मात्र ब्रम्हदेश, आसाम व मणिपूर तेथील लढायात हौताम्य प्राप्त झालेल्या सैनिंकाच्या आदरार्थ सिंगापूरमध्ये बांधलेले हुतात्मा स्मारक या आधीच बांधून पूर्ण झालेले होते. या स्मारकावर ‘इत्तिहाद‘, ‘इतमद‘ आणि ‘कुरबानी‘ हे तीन शब्द कोरलेले होते.
हे स्मारक बांधून पूर्ण झाल्यापासून दोन महिन्यातच ब्रिटिश फौजांनी जपानी फौजांकडून सिंगापूर परत ताब्यात घेतले. जपानी सैन्याने 15 ऑगस्ट 1945 या दिवशी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. यानंतर दक्षिण-पूर्वेमधील ब्रिटिश सैन्याचे प्रमुख लॉर्ड माऊंटबॅटन यांनी, आझाद हिंद सेनेचे हे स्मारक तोडून नष्ट करण्याची आज्ञा दिली.
सिंगापूर स्वतंत्र झाल्यानंतर बर्याच वर्षांनी म्हणजे 1995 मध्ये सिंगापूर सरकारला आझाद हिंद सेनेचे स्मारक हे सिंगापूरचा एक ऐतिहासिक वारसा असल्याने सिंगापूरच्या इतिहासाच्या दृष्टीने असलेले या स्मारकाचे महत्व लक्षात आले व एसप्लनेड पार्क मध्ये असलेल्या स्मारकाच्या मूळ स्थानावर या स्थानाच्या महत्वाला साजेसा व औचित्यपूर्ण असा एक ताम्रपट एका ग्रॅनाइटच्या शिलेवर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिळेच्या बाजूलाच, ब्रिटिशांनी महायुद्धात हौताम्य पत्करलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेले एक स्मारक आहे. या स्मारकात ब्रिटिश सैनिकांबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या भारतीय सैनिकांचाही समावेश आहे.
सिंगापूर सरकारने उभारलेल्या या ताम्रपटावर एका बाजूला ‘आझाद हिंद सेना‘ असे मोठ्या अक्षरात लिहिलेले असून दुसर्या बाजूस या सेनेचा संक्षिप्त इतिहास देण्यात आलेला आहे.
काही दिवसांपूर्वी थोड्या सिंगापूरी मंडळींच्या मनात, जपानी सेनेच्या बाजूने लढलेल्या आझाद हिंद सेनेच्या स्मारकाची ही स्मृतीशिला सिंगापूर विरोधी आहे असा संभ्रम निर्माण झाल्याने, एसप्लनेड पार्क सारख्या महत्वपूर्ण स्थानावर ही स्मृतीशिला ठेवू नये असे मत व्यक्त करण्यात आले होते. मात्र सिंगापूरच्या राष्ट्रीय वारसा मंडळाने खुलासा करून या वादावर पडदा टाकला आहे. या मंडळाने केलेल्या खुलाशाप्रमाणे असे दिसते.
” ही स्मृतीशिला आझाद हिंद सेनेचे स्मारक नसून 1995 मध्ये, दुसरे महायुद्ध संपल्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याने उभारलेले एक स्मृती चिन्ह आहे. या जागेवर ब्रिटिशांनी सिंगापूरचा परत ताबा घेतल्यावर फक्त दोन महिन्यातच नष्ट केलेले आझाद हिंद सेनेचे मूळ स्मारक होते एवढेच हे स्मृतीचिन्ह दर्शवते. जरी लाखो भारतीय सैनिक या युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढलेले असले तरी त्यातल्या मूठभर सैनिकांना भारतावरील पारतंत्र्याचे जोखड दूर करणे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे असे वाटत होते व यासाठी आझाद हिंद सेनेचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता. सिंगापूरच्या दृष्टीने या मूठ्भर सैनिकांच्या प्रयत्नाचे हे स्मारक हा सिंगापूरच्या इतिहासाचा एक भाग आहे व भावी पिढ्यांना हा इतिहास व वारसा समजावा म्हणून दुसर्या महायुद्धासंबंधीची अशी 14 स्मृतीचिन्हे सिंगापूरमध्ये उभारलेली असून त्यापैकीच हे एक आहे.”
सिंगापूरचे राष्ट्रीय वारसा मंडळ काहीही म्हणोत! सिंगापूरला भेट देणार्या माझ्यासारख्या हजारो भारतीयांसाठी, ही स्मृतीशिला, सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याची ओळख व आठवण करून देत असल्याने अत्यंत महत्वाची आहे.
21 फेब्रुवारी 2012













चंद्रशेखरजी
लेख वाचून एक गोष्ट आठवली ती म्हणने भारताला स्वातंत्र्य केव्हा व कसे द्यायचे ह्याच्या सुचना देउन ब्रिटीशांनी माउंटबॅटनला भारतात शेवटचा व्हाईसरॉय म्हणून पाठवले होते . माइंटबॅटने ने भारताला स्वातंत्र्य देतांना तारिख बरोबर १५ ऑगस्ट ही निवडली कारण त्याच दिवशी ब्रिटीशांनी जपान्यांचा पराभव केला होत व त्या मोहीमेचे नेतृत्व माउंटबॅटन कडे होते.
स्वातंत्र्याची मागणी करणार्या त्यावेळच्या आपल्या नेत्यांनी एखाद्या धार्मिक सणावर किंवा मुहूर्तावर . नाही काही तर निदान तो दिवस ( १५ ऑगस्ट ) टाळून तरी स्वातंत्र्य दिवस निवडायला हवा होता . एक प्रकारे १५ ऑगस्ट हा दिवस निवडून त्यांनी (ब्रिटीशांनी) आम्ही तुमच्यावर विजय मिळवला असेच दाखवून दिले नाही का ?
संदीप
Posted by संदीप देवकर | फेब्रुवारी 22, 2012, 3:39 pmसंदीप –
प्रतिसादासाठी धन्यवाद
Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 23, 2012, 6:30 सकाळी