9 जानेवारी 2012 च्या सकाळी, तिरुपती विमानतळाचे एअरपोर्ट डेप्युटी मॅनेजर श्री जनार्थन बरेच चिंताक्रांत दिसत होते. त्यांच्यासमोर एक प्रचंड मोठी अडचण आ वासून उभी होती. सकाळी 7 वाजता ड्युटीवर अपेक्षित असलेले त्यांचे एअर ट्रॅफिक कन्ट्रोलर, अजुनही कामावर उगवले नव्हते आणि विमानतळाचा कन्ट्रोल टॉवर निर्मनुष्य होता. तिरुपती विमानतळावर दिवसभरात फक्त 7 उड्डाणेच येतात पण तिरुमला देवस्थानम कडे येणार्या यात्रेकरूंसाठी हा विमानतळ सर्वात जवळचा विमानतळ असल्याने त्याचे कार्य व्यवस्थितपणे चालू असणे महत्वाचे होते. तिरुमाला देवस्थानम हे भाविकांसाठी आणि त्यातल्या त्यात दक्षिण भारतीय भाविकांसाठी अतिशय महत्वाचे असलेले देवस्थान म्हणून समजले जाते.
श्री. जनार्थन यांच्या काळजीत आणखी भर घालणारी एक गोष्ट घडली होती. जेट एअरलाइन्सचे 9W2761 हे उड्डाण करणारे विमान, हैदराबाद विमानतळावरून या आधीच निघाले होते व ते विमान आणखी दीड तासात तिरुपती विमानतळावर पोचणार होते. श्री. जनार्थन यांनी आपल्या फोनवरून एटीसीला गडबडीने फोन लावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एटीसी आपल्याला ड्युटीवर जायचे आहे हे म्हणे चक्क विसरला होता. पण त्याने आपण ताबडतोब घरून निघत आहोत व शक्य तितक्या लवकर विमानतळावर पोचू असे वचन श्री. जनार्थन यांना दिले होते.
तिरुपती विमानतळावर, विमाने उतरवण्यासाठी वापरलेले जाणारे रडार बसवलेले नाहीये व एटीसीने दिलेल्या तोंडी माहितीनुसारच विमान चालक विमान खाली उतरवतात. विमान खाली उतरवताना, विमान चालक आपल्या दृष्टीवरच फक्त अवलंबून असल्याने, निदान 40 मिनिटे तरी आधी त्यांना ही सर्व माहिती एटीसी कडून हवी असते. श्री. जनार्थन यांना कल्पना होती की थोड्याच वेळात जेट एअरलाइन्सच्या विमानाच्या वैमानिकांना ही माहिती रेडिओ वरून हवी असणार आहे व त्या वेळेपर्यंत त्यांचा एटीसी विमानतळावर पोचणे शक्यच नाही.
श्री. जनार्थन यांनी भर्रकन थोडा विचार केला व त्यांनी विमानतळावरच्या अग्निशामक दलाचे श्री.पाशा यांना आपल्याला मदत करण्याची विनंती केली. श्री. पाशा मोडके तोडके इंग्रजी बोलतात पण त्याच इंग्रजीत त्यांनी वैमानिकांना हवी असलेली माहिती कन्ट्रोल टॉवर मधील रेडिओवरून जेट एअरलाइन्सच्या वैमानिकांन दिली. 40 मिनिटानंतर जेंव्हा जेट एअरलाइन्सचे विमान तिरुपती विमानतळावर आले तेंव्हा एटीसी येऊन कंट्रोल टोवरमधील आपल्या खुर्चीत बसलेला होता. त्याने नेहमीप्रमाणे विमान सुरक्षित रित्या विमानतळावर उतरवले.
श्री. जनार्थन यांनी एक मोठी अडचण सोडवली होती खरी! पण आता त्यांना व श्री. पाशा यांना एटीसीचे काम कोणाच्या परवानगीने त्यांनी हातात घेतले? याबद्दलच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे विभागीय निर्देशक, यांनी सांगितले आहे की श्री. पाशा यांचा हेतू जरी चांगला असला तरी ते प्रशिक्षित नसल्याने त्यांनी एटीसीचे काम हातात घ्यायला नको होते. नुसत्या चांगल्या हेतुने कामे होत नाहीत.
या असल्या गोष्टी फक्त भारतातच घडू शकतात असे मला वाटते.
4 फेब्रुवारी 2012





चौकशीचे साग्रसंगीत नाटक केले नाही तर उद्या उठसूट कोणीही कंट्रोल टॉवर ताब्यात घेऊ पाहिल…
Posted by ए.टी.सी. | फेब्रुवारी 4, 2012, 6:19 pmएटीसी -
तुम्ही म्हणता ते खरे आहे.
Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 5, 2012, 6:23 सकाळी