
एखाद्या शुक्रवारी जर तेरा तारीख आली तर तो दिवस अत्यंत अशुभ असल्याचे एक धर्मपंथीय मानतात. जानेवारी 2012 या महिन्याची 13 तारीख अशीच एका शुक्रवारी आली आहे. मात्र भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस अशुभ वगैरे न ठरता अत्यंत शुभ असा ठरला आहे असेच म्हणावे लागते आहे. गेली 10 ते पंधरा वर्षे भारतातील अनेक लोकांनी जे एक स्वप्न डोळ्यासमोर ठेवले होते ते या दिवशी साकार झाले आहे. 13 जानेवारी 2011 ते 13 जानेवारी 2012 या वर्षभरात, संपूर्ण भारतामध्ये, लहान मुलांना होणार्या पोलिओ या रोगाची लागण झाल्याची एकही केस उघडकीस आलेली नाही. लहान मुलांचे संपूर्ण भवितव्य नासाडून टाकणार्या अशा या रोगाचे, भारतातून पूर्णपणे उच्चाटन होणार अशी स्पष्ट चिन्हे आता दिसू लागली आहेत. फक्त 2 वर्षांपूर्वी (2009 साली) जगात सर्वात जास्त पोलिओच्या केसेस (741) भारतात झाल्या होत्या. याच्या पुढच्या वर्षी हा आकडा 42 पर्यंत खाली आला. मागच्या वर्षी या रोगाची फक्त 1 केस भारतात आढळून आली होती. जगात, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच देशात आता पोलिओची लागण झाल्याचे आढळून येते. यात मागच्या वर्षापर्यंत भारताबरोबर पाकिस्तान, अफगाणिस्तान व नायजेरिया हे देश होते. (मागच्या वर्षी चीन मध्ये 8 ते 10 वर्षांनंतर अचानक 14 किंवा 15 केसेस झाल्याचे आढळून आले होते.) भारताने आता या देशांची साथ सोडली असल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमुख मार्गारेट चान यांनी भारताची सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचे म्हटले आहे. तर बिल गेट्स यांनी पोलिओ उच्चाटनाच्या जागतिक लढाईमधील हा एक मोठा टप्पा असल्याचे म्हटले आहे. युनिसेफ संस्थेचे प्रमुख ऍन्थनी लेक यांनी भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
भारतात मिळालेल्या या यशात मध्यवर्ती व राज्य सरकारे यांचे प्रयत्न कारणीभूत आहेतच पण याच बरोबर, रोटरी इंटरनॅशनल या संस्थेने केलेले प्रयत्न तितकेच कारणीभूत आहेत. रोटरी इंटरनॅशनल या संस्थेने, 1985 मध्ये प्रथम पोलिओ उच्चाटनाचा प्रकल्प हातात घेतला. 1988 मध्ये रोटरी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे या प्रयत्नात भागीदार बनले. गेली 26 वर्षे भारतातील असंख्य रोटरी सभासद, नॅशनल इम्युनायझेशन किंवा राष्ट्रीय लसीकरण दिवसांना लाखो बालकांना पोलिओ लस देण्याचे काम करत आले आहेत. आतापर्यंत लाखो किंवा कोटी बालकांना रोटरीच्या माध्यमातून ही लस देण्यात आली आहे असे रोटरीचे आंतराष्ट्रीय अधक्ष कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले आहे. रोटरीने ही मोहीम हातात घेतली तेंव्हा जगभरात मिळून साडेतीन लाख बालके प्रतिवर्ष या रोगाची शिकार होत होती. हा आकडा 2011 मध्ये सबंध जगासाठी 604 वर आला आहे.
भारताची पोलिओ फ्री देश म्हणून कधी गणना होईल असे विचारले असता, काही महिन्यातच आरोग्य विभाग करत असलेल्या काही चाचण्या पूर्ण झाल्या की अशी घोषणा केली जाऊ शकेल असे मार्गारेट चान यांनी सांगितले आहे.
आता भारतापुढे खरे आव्हान आहे ते सीमेबाहेरून येऊ शकणार्या पोलिओ केसेसचे. पाकिस्तानी सीमेवर या साठी पंजाब मध्ये लसीकरण केंद्रे सर्व बॉर्डर पोस्ट्स वर स्थापन केलेली आहेत. चीन मध्ये जो अचानक पोलिओचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी आढळून आला होता तो पाकिस्तान मधूनच आला होता हे तिथल्या आरोग्य अधिकार्यांच्या लक्षात आले असल्याने भारताने हे पाऊल उचलले आहे. त्याच प्रमाणे आणखी काही वर्षे तरी भारतातील योग्य त्या वयोगटातील सर्व बालकांना लस देण्याचे काम चालू ठेवावे लागणारच आहे. या महाभयंकर रोगापासून भावी पिढ्यांना मुक्तता द्यायची असेल तर भारताला आणखी काही वर्षे तरी पोलिओ बद्दल तेवढीच जागरुकता दाखवणे आवश्यक ठरणार आहे.
13 जानेवारी 2012





चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.