
काही वर्षांपूर्वी मी व माझी पत्नी तमिळनाडू मध्ये पर्यटनासाठी गेलो होतो. आमच्या प्रवासात आम्हाला कांजीवरम हे गाव लागणार असल्याने तेथील प्रसिद्ध साड्या खरेदी करायच्या असा आमचा (म्हणजे माझ्या पत्नीचा), बेत साहजिकच होता. तेथे पोचल्यावर आम्ही एका दुकानात गेलो. साड्या बघितल्या. पण तिथल्या साड्यांच्या किंमती बघून आम्ही थक्क झालो. प्रवासात असताना जास्त रोख रक्कम घेऊन फिरण्याचा अनावश्यक धोका मी सहसा पत्करत नाही. त्यामुळे तिथल्या साड्या घेता येतील एवढी रोख रक्कम माझ्याकडे नव्हती व त्या दुकानदाराने क्रेडिट कार्ड स्वीकारण्यास संपूर्ण नकार दिल्याने आम्हाला काहीच खरेदी न करता बाहेर पडावे लागले होते.
काही महिन्यांपूर्वी मी इरकल या गावी गेलो होतो. हे गाव पण इरकली साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मागच्या अनुभवाने शहाणा होऊन भीतभीतच आम्ही साड्यांच्या किंमती विचारल्या. पण असे लक्षात आले की इरकल मध्ये सर्वांच्या खिशाला परवडतील अशी साड्यांची रेंज उपलब्ध आहे. अगदी सात आठशे रुपयापासून इरकली साड्या मिळू शकतात. त्यामुळे इरकल मध्ये माझ्या पत्नीला खरेदी करता आली. इरकल गावातील व्यापारी जे व्यावसायिक शहाणपण दाखवतात ते कांजीवरम मधले व्यापारी का दाखवू शकत नाहीत हे एक कोडेच माझ्या मनात राहिले.
पण नुकताच या प्रकरणाचा खुलासा मला झाला. 2005 सालापासून, कांजीवरम साड्या या भौगोलिक निर्देशक ओळखपत्र (Geographical Indication label) या नियमाच्या खाली मोडू लागल्या आहेत. या निर्देशकाचा थोडक्यात असा अर्थ होतो की कांचीपुरम या स्थानाजवळ विणल्या गेलेल्या व ज्या साडीतील जरीमध्ये कमीतकमी 57% चांदी व 0.6% सोने आहे अशाच साडीला कांजीवरम साडी या नावाने ओळखता येईल. या प्रकारचा निर्देशक दार्जीलिंग चहा, कश्मिरमधली पश्मिना शाल किंवा तिरूपतीचे लाडू या सारख्या इतर काही उपभोग्य वस्तूंनाही लावण्यात आलेला आहे. या उत्पादनांच्या भौगोलिक उत्पादन स्थानांचे महत्व टिकून रहावे व उटीला बनलेल्या चहाला दार्जीलिंग चहा म्हटले जाऊ नये किंवा इरकल मधे विणल्या गेलेल्या साडीला कांजीवरम म्हटले जाऊ नये म्हणून हे पाऊल शासनाने उचलले आहे. यामुळे ग्राहकाला अपेक्षित तो दर्जा मिळेल असा प्रयत्न आहे.
हा निर्देशक उत्पादनाची गुणवत्ता टिकवण्यासाठी उपयुक्त आहे वगैरे सर्व ठीक आहे परंतु सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 30000 रुपये व चांदीचा भाव किलोला 55000 रुपये वगैरे पोचल्यावर या साड्या विणणेच मोठे कठिण होत चालले आहे. 1 वर्षापूर्वी 240 ग्रॅम जर तयार करायला 6000 रुपये खर्च येत असे. हा खर्च आज 15000 रुपये येतो आहे. त्यामुळे या साडी उत्पादकांचे सर्व गणित बिघडूनच गेले आहे. कांजीवरम साड्यांच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की खरेदीदार कांजीवरम साडी घ्यायला नाखूष आहेत. यामुळे कांजीवरमचा धंदा तमिळ नाडू मधील इतर गावांकडे जाऊ लागला आहे. कांचीपुरम मधला वस्त्रोद्योग काही लहान सहान नाही. 20000 माग आणि 50000 कामगार यांच्या सहाय्याने कांचीपुरम मध्ये वर्षाला 5 लाख साड्यांचे उत्पादन होते. एक साडी विणायला 8 ते 15 दिवस लागू शकतात.
या परिस्थितीवर तोडगा म्हणून सरकार आता जरीमधील चांदी व सोने यांचे प्रमाण 40% व 0.5 % एवढ्यापर्यंत कमी करण्याच्या विचारात आहे. यामुळे कांचीपुरम मधल्या साडी उद्योगाला थोडा तरी उपयोग होईल असे सरकारला वाटते आहे.
कांचीपुरम मधले साडी उत्पादक मात्र हे भौगोलिक निर्देशक ओळखपत्र रद्दच करावे या मताचे आहेत. त्यांच्या मताने जर धंदाच होणार नसेल तर गुणवत्ता ओळखपत्र निरुपयोगीच आहे. इतकल मधल्या उत्पादकांनी जी लवचिकता उत्पादनांच्या किंमतीत आणली आहे तीच लवचिकता आणण्याची कांचीपुरमच्या उत्पादकांना गरज आहे. नाहीतर त्यांचे भविष्य जरा कठिणच दिसते आहे. 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातला पैठणी उद्योग जसा मृतवत झाला होता तसेच कांचीवरम साडीचे होण्याची बरीच शक्यता वाटते.
28 डिसेंबर 2011






चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.