अलंकाराचे वेड माणसाला प्रथम पासूनच आहे. मोहेंजोदाडो, हडप्पा यासारख्या ठिकाणी ( इ.स.पूर्व 4000) किंवा मेहरगड (इ.स. पूर्व 6000) या ठिकाणच्या उत्खननात सुद्धा स्त्री-पुरुषांच्या वापरात असलेले अलंकार सापडले आहेत. अलंकार बनवण्यात जरी अनेक धातू, मणी दगड वापरले गेलेले असले तरी या कालापासून आजपर्यंत, अलंकार बनवताना, प्राधान्य हे सुवर्ण किंवा रुपे या धातूंना आणि मोती किंवा रत्ने यांनाच दिले जाते आहे.
गणपतीच्या आरतीतल्या वर्णनाप्रमाणे, अगदी नखशिखान्त अलंकारांनी मढवून घ्यायचे ठरवले (वसंतसेना ही प्रसिद्ध गणिका असे अलंकार घालत असे असे म्हटले जाते.) तरी वापरून वापरून किती सोने अंगावर घेणार? फारतर एखादा किलोग्रॅम! पण जेंव्हा एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या वैभवाचे व ज्या सत्तेमुळे ते वैभव आलेले असते त्या सत्तेचे प्रदर्शन करायचे असते तेंव्हा मग असे सत्ताधीश अलंकाराशिवाय रोजच्या उपयोगातल्या वस्तूही सोन्या-रुप्याच्या, रत्नखचित बांधणीच्या बनवून घेत असत. सोन्याच्या बनवलेल्या व रत्नखचित अशा तलवारीच्या मुठी, रोजच्या वापरातली भांडी कुंडी , खुर्च्या, सिंहासने, शयन-मंचक, जे काय शक्य आहे त्याला सोन्याने मढवून त्यावर रत्ने बसवू जाऊ लागली.
धनवान, सत्ताधीश अशा प्रकारच्या वस्तू बनवून घेत आहेत हे म्हटल्यावर साहजिकच सुवर्णकार , कारागीर यांनी अशा सुवर्ण-रत्नजडित वस्तू बनवण्याचे कौशल्य प्राप्त करून घेतले. अशा सुवर्ण-रत्नजडित वस्तू बनवण्याची परंपराच भारतात निर्माण झाली. ही परंपरा पार मोहेंजोदाडो- हडप्पा कालापासून सुरू झालेली असल्याने निदान 5000 वर्षे तरी जुनी आहे.
आजच्या युगात, आंतर्राष्टीय बाजारात, सुवर्ण व रत्नजडित अलंकार सुद्धा ब्रॅन्डेड झाले आहेत. ‘कार्तिए‘ सारख्या मोठमोठ्या ब्रॅन्डेड कंपन्या, (यात घड्याळे बनवणार्या बर्याचशा कंपन्या आहेत. ) स्वत:च्या ब्रॅन्डचे दागिने, रत्नजडित घड्याळे, पेन, चष्मे या सारख्या वस्तू आंतर्राष्ट्रीय बाजारात विकत असतात. हा ट्रेंड आता भारतीय बाजारपेठेत सुद्धा येऊ लागला आहे. या क्षेत्रातली भारतातली एक अग्रगण्य कंपनी म्हणजे टायटन! ही कंपनी घड्याळे तर बनवतेच पण त्या वरोबर तनिष्क या ब्रॅन्ड खाली दागिनेही बनवते. या तनिष्क कंपनीला भारतीय सुवर्णकार व रत्नकारांची ही 5000 वर्षाची परंपरा जगाच्या समोर आणावी असे वाटले. यासाठी तनिष्क कंपनीने गोल्ड प्लस हा एक ब्रॅन्ड निर्माण केला आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. भास्कर भट यांच्या मताने सुवर्ण व रत्नालंकार हे अगदी सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या आयुष्याचा सुद्धा एक महत्वाचा भागच आहेत.
सर्वसामान्य भारतीयाच्या आयुष्याचा एक भाग असलेली ही सुवर्णालंकार परंपरा जगासमोर आणण्यासाठी म्हणून या कंपनीने, टाटा उद्योग समुहाने सर्वसामान्य माणसासाठी म्हणून बनवलेल्या नॅनो मोटरकारची या प्रेझेन्टेशनसाठी निवड केली आणि ही नॅनो मोटरगाडीच सुवर्ण व रत्ने यांनी जडवण्याचे ठरवले. ही रत्ने जड्वताना पारंपारिक भारतीय डिझाइन व पद्धती त्यांनी वापरल्या आहेत. जगातील सर्वात स्वस्त अशी ही गाडी 88 किलोग्रॅम वजनाच्या सोन्याच्या व 15 किलोग्रॅम वजनाच्या चांदीच्या पत्र्याने मढवली गेली आहे. यावर 10000 रत्ने बसवलेली आहेत. या रत्नखचित नॅनोची किंमत आता किती आहे हे तनिष्क कंपनी सांगत नसली तरी 1.40 लाख रुपये मूळ किंमतीच्या या गाडीची किंमत आता 22 कोटी रुपये तरी झाली असावी असे जाणकारांचे म्हणणे आहे.
तनिष्क कंपनीचा ही गाडी विकण्याचा विचार सध्या तरी अजिबातच नाही. निरनिराळ्या शहरांतील तनिष्क शो रूम्स या गाडीचे प्रदर्शन विक्री वाढीसाठी ही कंपनी करणार आहे.
भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत असे म्हणतात. मुघल बादशहांचे सिंहासन सुवर्णापासून बनवलेले व त्यावर रत्ने जडवलेले असे होते असे म्हणतात. आपल्याला हा सोन्याचा धूर किंवा हे सिंहासन दिसणे शक्य वाटत नाही. त्या ऐवजी ही गोल्ड प्लस नॅनोच प्रत्यक्ष किंवा चित्रात बघून समाधान मानले पाहिजे.
24 सप्टेंबर 2011








sunder lekh
Posted by anil | सप्टेंबर 26, 2011, 12:45 pm