ज्येष्ठ नागरिकांना आपण मागे पडतो आहोत याची जाणीव करून देणारी आणखी एक बाब असते. ती म्हणजे ज्येष्ठांची आर्थिक दुर्बलता. अगदी कितीही उत्तम प्लॅनिंग करून निवृत्तीची सोय केलेली असली तरी ज्या दराने महागाई वाढते आहे त्या दराने ज्येष्ठांचे उत्पन्न वाढणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्यामुळे निवृत्त झाल्या झाल्या आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेले ज्येष्ठ सुद्धा निवृत्तीला एकदा दहा, पंधरा वर्षे लोटली की खर्च करताना प्रत्येक रुपयाचा विचार करताना दिसतात. भारतात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बहुतेक शहरांच्यात इतकी मोडकळीस आलेली आहे व व जी आहे त्यात इतकी प्रचंड गर्दी असते की ज्येष्ठांना यातून एकट्याने प्रवास करणे हे एक दिव्यच वाटते. आर्थिक सुबत्ता आता राहिलेली नसल्याने वाहन घेणे परवडत नाही. जुने वाहन असले तर रस्त्यावरच्या गर्द्रीमुळे ते चालवणे धोकादायक वाटते. रिक्षा किंवा टॅक्सी या सारखी भाड्याची वाहने परवडत नाहीत. या अशा अनेक कारणांच्यामुळे बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या निवासापासून फारसे दूर जातच नाहीत.
या सगळ्या गोष्टींना उपाय हा असा नाहीच आहे. या गोष्टी काहीही केले तरी पूर्वीसारख्या होणे केवळ अशक्य आहे हे ज्येष्ठ नागरिक मनोमन जाणतात व म्हणूनच भूतकालात रमणे हा एकच विरंगुळा त्यांना समोर दिसतो. पण हे असे स्वप्नरंजन करून व नवीन पिढी, नवीन युग यांच्यावर टीका करत राहून, ज्येष्ठांच्या आयुष्याची गुणवत्ता वाढणार आहे का? हा खरा मूलभूत प्रश्न आहे. जर ही गुणवत्ता वाढणार नसली तर ही टीका करून उपयोग तरी काय? हे लक्षात घेतले पाहिजे.
एक इंग्रजी म्हण आहे की रिकामे मन हे सैतानाचे घर असते. ज्येष्ठांना ही म्हण बरीच लागू पडते. त्यामुळेच प्रत्येक ज्येष्ठाने आपले मन आणि दिवस हा रिकामा ठेवता कामा नये असे मला वाटते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठांनी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी शक्यतो स्वत:च्या हाताने करणे आवश्यक असते. बर्याच महिला, ज्येष्ठत्व आले की स्वैपाकपाणी सोडून देतात. ज्या सोडत नाहीत त्यांचे आरोग्यही या स्वैपाकाच्या कामाने चांगले राहते व मनही रिकामे राहून अनावश्यक गोष्टींचा विचार करत बसत नाही. ज्या कामांना कोठेही प्रवास करण्याची गरज नसते, फारसा खर्च येत नाही, अशा अनेक कामांमधे, छंदामधे, मन रिझवणे शक्य असते. माझ्या एका मित्राची पत्नी मध्ये निवर्तली. दिवस कसा घालवायचा? असा प्रश्न त्याला पडत असेल का? असे मला नेहमी वाटायचे. मधे एकदा त्याने आपण स्वत: करत असलेल्या लाकडी कोरीव कामाचे नमुने आम्हाला दाखवले. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात बसलेला मोठा धक्का केवळ या एका छंदाच्या जोरावर त्याने पचवला आहे. माझ्या परिचयातले एक ज्येष्ठ तर दिवसभर निरनिराळ्या इस्पितळांच्यात जाऊन तिथल्या रुग्णांना धीर देण्याचे कार्य करत असतात.
असे सतत कार्य करणारे ज्येष्ठ मग इतर लोकांना हवेहवेसे वाटतात. त्यांचा सहवास हवासा वाटतो. त्यांचे आयुष्य मग वजाबाकीचे न बनता बेरजेचे गणित बनते.
18 सप्टेंबर 2011





good atrilcle , good lesson for all retired people
Posted by anil | सप्टेंबर 18, 2011, 4:47 pmफारच सुरेख.मला खूप खूप आवडले.असेच लिहीत रहा!!!
Posted by प्रमोद तांबे | सप्टेंबर 18, 2011, 7:16 pmप्रमोद तांबे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Posted by chandrashekhara | सप्टेंबर 19, 2011, 3:16 pmchan lihile aahe.
Posted by सुदर्शन | सप्टेंबर 20, 2011, 12:50 सकाळीसुदर्शन-
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Posted by chandrashekhara | सप्टेंबर 23, 2011, 12:05 सकाळी