इंडोनेशिया या देशाला प्रशान्त महासागराचा अग्नीपरिघ (Rim of Fire) म्हटले जाते कारण एखाद्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या व हजारावर बेटांनी मिळून बसलेल्या या देशात, एका वक्र रेषेवर, अनेक जागृत व निद्रिस्त ज्वालामुखीं आहेत. एखाद्या ज्वालामुखींची जागृती ही घटना, इंडोनेशिया साठी काही फार असामान्य घटना नाही तरीही 29 ऑगस्टच्या सकाळी सुमात्रा बेटाच्या उत्तरेस असलेल्या मेदान या शहराच्या जवळ असलेल्या सिनाबुन्ग या ज्वालामुखीचा उद्रेक ही एक चिंताजनक बाब आहे असे मत Indonesian Center for Volcanology and Geological Disaster Mitigation या संस्थेचे प्रमुख मिस्टर . सुरोनो यांनी व्यक्त केले आहे.
एखादे विमान डोक्यावरून जात असताना जसे आवाज येतात त्याच पद्धतीचे आवाज या ज्वालामुखीजवळ राहणार्या खेडूतांनी ऐकले. यानंतर एक मोठा स्फोट झाला व 1500 मीट्रर उंचीपर्यंत राख, वाळू व पाण्याची वाफ या ज्वालामुखीने बाहेर फेकली. त्यानंतर या डोंगराच्या टोकावर त्यांना ज्वाला व लाव्हा रस वहाताना दिसू लागला. सुमात्रा शासनाने 12000 पेक्षा जास्त खेडूतांना त्वरित त्यांच्या खेड्यातून हलवले असून त्यांना मास्क दिले आहेत. ज्वालामुखीच्या भोवतीच्या 6 किलोमीटरच्या परिघात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खेडूतांच्या निवेदनाप्रमाणे 30 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शेतांच्यावर या ज्वालामुखीने फेकलेली राख पडली आहे व त्यामुळे या शेतात असलेला भाजीपाला संपूर्ण नष्ट झाला आहे.
या ज्वालामुखीचा उद्रेक दोन कारणांसाठी चिंताजनक आहे. पहिले कारण म्हणजे सुमारे 400 वर्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक कोणतीही पूर्वसूचना न देता झाला आहे. काल झालेला उद्रेक जरी फारसा हानीकारक नसला तरी या विषयातील तज्ञांच्या मताप्रमाणे या ज्वालामुखीने काल बाहेर फेकलेली राख व लाव्हा हा त्याच्या पोटातून आलेला नसून चोंदलेले नाक साफ करावे तशी फक्त त्याच्या बाह्य भागात साठून राहिलेली राख असू शकते. या ज्वालामुखीबद्दल पूर्वीची काहीच माहिती नसल्याने, यानंतर तो काय करेल हे सांगणे मोठे अवघड आहे. कदाचित यानंतर मोठे उद्रेक होण्याची शक्यता आहेच.
यापेक्षा सर्वात मोठी काळजी तज्ञांना या ज्वालामुखीच्या स्थानामुळे वाटते आहे. हा ज्वालामुखी मानवाला ज्ञात असलेल्या सर्वात विशाल अशा टोबा ज्वालामुखीच्या विवरात तयार झालेल्या जलाशयापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की 73000 वर्षांपूवी झालेल्या टोबा ज्वालामुखाच्या स्फोटात जवळ जवळ सर्व मानवजात नष्ट झाली होती. भारतीय उपखंडातले तर सर्व सजीव नष्ट झाले होते.
टोबाच्या सानिध्यात असलेल्या या सिनाबुन्ग ज्वालामुखीच्या उद्रेकाला, म्हणूनच गंभीरतेने घेतले जात आहे. भारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. हा ज्वालामुखी पुढे काय करणार आहे का गप्प बसून राहणार आहे हे फक्त काल सांगू शकेल.
30 ऑगस्ट 2010











चर्चा
Trackbacks/Pingbacks
Pingback: Tweets that mention 400 वर्षे निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑगस्ट 30, 2010