तिबेटमधल्या नद्यांच्यावर चिनी सरकार बांधत असलेली धरणे हा एक अतिशय ज्वलंत असा वादाचा मुद्दा बनला आहे. गेले वर्षभर या बाबत अनेक लेख व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेले Downstream देश या बाबतीत साहजिकच अतिशय साशंक व जागरूक आहेत. पाणी हा किती महत्वाचा व ज्वलंत प्रश्न होत चालला आहे याचा यावरून अंदाज बांधता येतो. सिंधू नदीचे बहुतांशी पाणी ज्या नदीतून मिळत असे ती Senge Khabab नदी चीनने धरण बांधून अडवली आहे व त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारे पाणी साहजिकच कमी झाले आहे. लाओस व थायलंड या देशांच्या सीमेवरून वाहणार्या मेकॉन्ग या नदीवर अनेक धरणे बांधत आहे व उन्हाळ्याच्या दिवसात या नदीतून वाहणार्या पाण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे या देशांचे म्हणणे आहे. ब्रम्हदेशाकडे जाणार्या सालवीन नदीचे पाणी चीनने मोठ्या प्रमाणात अडवले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी जेंव्हा भारतीय वृत्तपत्रांच्यातून, ब्रम्हपुत्रा नदीवर धरण बांधून चीन या नदीचे पाणी अडवणार आहे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या तेंव्हा साहजिकच चीनविरुद्ध असंतोषाची लाट उठली. गेले वर्षभर या बाबतीत अनेक उलट्या सुलट्या बातम्या आल्या. प्रथम चीनने आपण असा कोणताही प्रकल्प हातात घेतला नसल्याचे सांगितले. या नंतर नुकतेच या धरणाचे काम सुरू झाल्याची बातमी आली व पुन्हा एकदा गदारोळ झाला. या वेळेस लोकसभेतही हा प्रश्न विचारला गेला व भारतीय परराष्ट्रमंत्र्यांना हे मान्य करावे लागले की चीन असे धरण बांधत असला तरी त्यामुळे भारत व बांगलादेश यांना मिळणार्या पाण्यावर काहीही फरक पडणार नाही.
चीनची एकूण विश्वासार्हता बघता यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. सुदैवाने आता अतिशय बारीक सारीक बारकावे दाखवले जातील अशी, उपग्रहाने घेतलेली छायाचित्रे उपलब्ध असल्याने खरी परिस्थिती काय आहे हे कोणासही जाणून घेणे सहज शक्य आहे. या धरणाबाबतची पहिली अधिकृत बातमी Chinadaily.com या संकेतस्थळाने 2009च्या एप्रिल महिन्यात प्रसृत केली. या बातमीप्रमाणे Gezhouba या एका मोठ्या बांधकामाचा व्यवसाय करणार्या चिनी कंपनीला या धरणाचे कंत्राट मिळाले असून या कंत्राटाची किंमत 1.14 बिलियन युआन एवढी आहे. हा प्रकल्प 2015 मधे पूर्ण होणार आहे.हे धरण 116 मीटर उंच होणार असून या धरणातील पाणीसाठा 86.6 मिलियन क्युबिक मीटर्स एवढा राहणार असून हा साठा ब्रम्हपुत्रा नदी साधारण 24 तासातच एवढे पाणी वाहून नेते. या धरणातून बाहेर सोडल्या जाणार्या पाण्यावर 510 MWवीजनिर्मिती केली जाणार असून ती ल्हासा शहराला पुरवली जाणार आहे. या धरणाच्या जलाशयाच्या खाली Zangmu, Tangmai व Dagu ही खेडेगावे बुडणार असून त्यातल्या खेडूतांना दुसरीकडे जागा देण्यात येणार आहे. यातल्या झांगमू या खेड्याचे तिबेटी नाव DZAM असे आहे व हे गाव 92.522996 आणि 19.141999 या अक्षांश,रेखांशावर आहे.
आपल्या वर्तमानपत्रांच्यात या विषयावर बरीच चर्चा होत असली तरी हे धरण कोठे होते आहे व ते कसे होणार आहे याची काहीच माहीती आपल्या माध्यमांना नाही. प्रत्यक्षात चिनी माध्यमे या धरणाची सर्व डिटेल्स देत असून ते झाल्यावर कसे दिसेल याची चित्रेही छापत आहेत. धरणाचा पूर्वेकडचा 1/3 भाग बांधून झाला असून आता कॉफर धरणे बांधून नदीचा प्रवाह वळवला जाईल व बाकी धरण पूर्ण केलेजाईल असे दिसते.
या सर्व माहीतीवरून एक गोष्ट स्पष्ट होते आहे. झांगमू येथील धरण फक्त वीजनिर्मितीसाठी असून ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अडवणे किंवा ते दुसरीकडे नेणे हे या ठिकाणी अत्यंत खर्चिक काम आहे. त्यामुळे म्हणा किंवा भारत व बांगलादेश यांच्या सतर्कतेमुळे म्हणा चीनचा, ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी वळवण्याचा बेत सध्या तरी दिसत नाही.
झांगमू किंवा टांगमाई धरणानंतर पुढचे धरण थोडे पूर्वेला Jiacha गावापासून 5 किलोमीटर अंतरावर होणार आहे. या धरणातून 320 MW वीजनिर्मिती होणार आहे. या दोन्ही धरणांच्यात फक्त 12 किलोमीटर अंतर असणार आहे. यानंतर याच भागात याच पद्धतीची आणखी 3 धरणे बांधण्याचा चीनचा विचार आहे.
भारत किंवा बांगलादेश यांच्याकडे जाणारे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवण्याचा विचार चीन करत असेल असे सध्या तरी वाटत नाही परंतु भविष्यात ब्रम्हपुत्रा जिथे अरुणाचल प्रदेशात शिरते त्याच्या जवळपास एक प्रचंड धरण बांधून ब्रम्हपुत्रेचे पाणी फिरवण्याचा विचार चीन करणारच नाही हे खात्रीने सांगता येत नाही. चीनच्या बाबतीत अथक सतर्कता बाळगणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरावे.
18 ऑगस्ट 2010









जसा भारत-पाकिस्तान पाणी-वाटप करार आहे तासा भारत-चीन काही करार आहे का? आणि चीनने इतर देशांशीही या विषयावर काही करार केले आहेत का?
Posted by Nikhil Sheth | ऑगस्ट 18, 2010, 8:07 pmनिखिल
चीन आणि भारत यात कोणताही पाणी वाटप करार नाही. ब्रह्मपुत्रा ,सिंधू आणि सतलज या नद्यांच्यात निरनिराळ्या ऋतुंमधे किती पाणी आहे (Hydrological data) ही माहीती आदान प्रदान करण्याचा फक्त करार भारत चीन मधे आहे. चीनने इतर कोणत्याही देशाबरोबर पाणी वाटपाचा करार केलेला नाही त्यामुळेच तो मनमानी करत असतो.
Posted by chandrashekhara | ऑगस्ट 18, 2010, 8:15 pmह्या विषयाबद्दल फार काही माहित नाही..पण आपल्या य पोस्टमुळे कुतूहल चावळले…वं आता माहिती शोधण्यास सुरवात करत आहे….धन्यवाद!!!
Posted by झम्प्या झपाटलेला | ऑगस्ट 19, 2010, 1:37 pm