काही वर्षांपूर्वी पर्यंत पुणे- मुंबई हा प्रवास बहुतेकजण रेल्वेनेच करत असत. एकतर तेंव्हा अतिजलद मार्ग नव्हता आणि दुसरे म्हणजे रेल्वेचा हा प्रवास मोठा आरामदायी आणि सुखकर असे. त्या वेळी वातानुकुलित डबे नसत. त्यामुळे प्रथम वर्ग किंवा दुसरा वर्ग या दोन्ही वर्गात खिडक्या उघड्या टाकून आत येणारा भसाभसा वारा अंगावर घ्यायला मोठी मजा येत असे. खंडाळा आणि कर्जत या दोन स्थानकांच्या मधे गाडी ब्रेक टेस्टींग साठी उभी रहात असे या ठिकाणी गाडी उभी राहिली की काळ्या सावळ्या पण रेखीव दिसणार्या व गुढग्यांच्यावर घट्ट नऊवारी लुगडे नेसलेल्या कातकरी मुली, करवंदे, जांभळे आणि पेरूसारखे दिसणारे जाम विकायला येत. यातले काहीतरी विकत घेऊन तोंड आंबटचिंबट केल्याशिवाय पुणे-मुंबई प्रवासाचे सार्थक होत नसे.
सरकारी माध्यमे आजकाल आपल्याला, भारताच्या कोनाकोपर्यापर्यंत, उत्तम वैद्यकीय सेवा कशी पोचलेली आहे हे सारखे कानी कपाळी ओरडून सांगत असतात. परंतु पुणे आणि मुंबई या दोन महानगरांच्यापासून फक्त सत्तर ऐंशी किलोमीटरवर स्थायिक असलेल्या या कातकरी मुलींना त्यांच्या समाजाला जडलेल्या गरिबी, अशिक्षिपणा आणि मागासलेपणाच्या रोगांमुळे, इतके दुर्भाग्यपूर्ण आयुष्य जगावे लागते आहे की हा समाज एकविसाव्या शतकातल्या भारतात जगतो आहे की तेराव्या किंवा चौदाव्या शतकातल्या असा प्रश्न मनासमोर उभा रहातो.
कातकरी समाज हा महाराष्ट्रातल्या ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतला आदिवासी समाज म्हणून ओळखला जातो. 1975 मधे भारत सरकारने या समाजाला, अशिक्षित, शेती न करता जंगलांच्यावर उपजीविका करणारा व लोकसंख्या न वाढणारा म्हणून मूल अदिवासी समाज असे घोषित केले. यामुळे अदिवासी कल्याण कायद्याच्या अंतर्गत हा समाज आला. असे असूनही हा समाज दुर्लक्षितच राहिला आहे. महाराष्ट्रात किमान सव्वा दोन लाख तरी कातकरी आजमितीला असावेत.
दोन समाजसेवी संस्था, यापैकी ‘मासूम‘ ही पुण्यातली संस्था आणि सातार्याची ‘श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ‘ ही संस्था, यांनी नुकतेच कातकरी समाजातील मुली आणि स्त्रिया यांच्याबद्दल एक सर्व्हे केला. या सर्व्हे मधून बाहेर आलेले चित्र अतिशय विदारक आणि मनाला अस्वस्थ करणारे आहे. या सर्व्हेची काही निरिक्षणे अशी आहेत.
- जन्माला आलेल्या मुलांपैकी एक तृतियांश मुले अर्भकावस्थेतच मृत्युमुखी पडतात.
- निरिक्षण केलेल्या 139 मातांपैकी 129 मातांचे निदान एक तरी अर्भक मृत्युमुखी पडलेले आहे.
- पुणे-मुंबई अति जलद मार्गाच्या जवळपास असलेल्या कातकरी विभागात एकही हॉस्पिटल नाही व 100% बाळंतपणे दाया पार पाडतात.
- मुलींची लग्ने नवव्या किंवा दहाव्या वर्षी होतात.
- पहिले मूल साधारण बाराव्या वर्षी होते. आईच इतकी कुपोषणग्रस्त असते ही जन्माला आलेले अर्भक जगण्याची शक्यताच अतिशय कमी असते.
परिस्थिती आता एवढी गंभीर होत चालली आहे की कातकरी समाजाची संख्या आता कमी होत चालली आहे. बहुतेक कातकरी मुली या कुपोषणामुळे पंडूरोगाची शिकार बनलेल्या आहेत. याचा परिणाम साहजिकच त्यांची गरोदरपणाची अवस्था व मातृत्व यावर होतो. हॉस्पिटल्स व प्रशिक्षित कर्मचार्यांचा पूर्णपणे अभाव असल्याने, अर्भकांच्या दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. एकूणच या कातकरी मुलींना आपले आरोग्य व रोगराई यासंबंधीचे ज्ञान, त्यांच्या अशिक्षितपणामुळे कमीच असते. त्यातच बाल विवाह व लगेचच मातृत्व या गोष्टीमुळे त्यांच्या आरोग्यावर इतके दुष्परिणाम होतात की बहुतेक कातकरी मुली या अतिशय खंगलेल्याच दिसतात.
या दोन संस्थांनी महाड व पोलादपूर या तालुक्यांच्यात स्त्रिया व मुले यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दोन प्रकल्प हातात घेतले आहेत. पण एकूणच प्रश्नाचा आवाका एवढा मोठा आहे की खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले तरच या कातकरी मुलींच्या आयुष्यात काहीतरी सुधारणा होऊ शकेल.
7 मार्च 2010







पुन्हा एकदा, अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद!
– अरुंधती
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
Posted by अरुंधती | मार्च 8, 2010, 12:35 सकाळी