परवाच घडलेली एक गोष्ट! मी बाहेरून घरी येत असताना, कोपर्यावर एक फळ विक्रेत्याचा स्टॉल दिसला. त्याने समोरच्या बाजूला ठेवलेली द्राक्षे मला जरा बरी वाटली. थोडी द्राक्षे खरेदी करावी म्हणून जरा थांबलो. आणखी दोन तीन मध्यमवयीन बायका स्टॉलपाशी उभ्या होत्या व शेजारी एक अत्याधुनिक तरुणी अर्धवट तिच्या स्कूटरवर बसलेली, अर्धवट उभी अशी होती. लेटेस्ट फॅशनचा ड्रेस, उंच टाचेचे बूट, केस अर्थातच मोकळे सोडलेले, कपाळावर मोठ्या आकाराचा काळ्या काचेचा चष्मा अशा स्वरूपातली ही मॉडर्न तरुणी, सतत, हातात धरलेल्या तिच्या मोबाइल फोनवरून, कोणाशीतरी बोलत होती. वयाने अंमळ ज्येष्ठच असलेला तो फळ विक्रेता त्या मध्यमवयीन बायकांचा हिशोब करत असावा. अचानक ती तरुणी जरा मोठ्यानेच खेकसली. ” ए हे चाळीस रुपये घे पाहू लवकर, शंभर रुपये सुटे नाहीत म्हणून माझा किती वेळ घालवणार आहेस?” आणि ती परत मोबाईलवर बोलण्यात गुंग झाली. फळवाल्याने तिला दोन मिनिटे थांबण्याची विनंती केली. ती तरुणी मोबाईल फोनवर बोलण्यात परत गुंगल्याने तिच्या कानावर ते पडले नसावे. अशीच काही मिनिटे गेली. मॅडमचा कॉल संपलेला दिसला. कारण त्यांनी मान उचलून परत फळवाल्याकडे पाहिले आणि त्या अतिशय भडकल्या ” ए तुला समजत नाही का? हे चाळीस रुपये घ्यायचे ते. माझे शंभर परत दे आणि हे चाळीस घे. साधे सुटे पैसे ठेवता येत नाही तुम्हाला! कुठून ही मंडळी येतात देव जाणे!” फळवाल्याचा चेहरा बदललेला मला दिसला. एकतर या तरूण पोरीने आपल्याला अरे जारेने पुकारावे हे त्याला रुचले नव्हते. त्यातून तो बेअक्कल असल्याचे तिने जवळ जवळ बोलूनच दाखवले होते. त्याने चाळीस रुपये घेतले व ती तरुणी स्कूटर चालू करून निघून गेली. फळविक्रेत्याचा पारा आता मात्र चढलेला दिसला. तो त्या तरूणीबद्दल अपशब्द काढू लागला. तेवढ्यात एका मध्यमवर्गीय महिलेने त्याला थांबवले. ” त्या मुलीला कोणाशी कसे वागायचे? वयाचा आदर कसा ठेवायचा? हे कळत नाही हे दिसतेच आहे. तुम्ही कशाला आपल्या वयाचा मान, अपशब्द उच्चारून घालवता आहात?” फळविक्रेत्याला हे पटले असावे तो नंतर काही बोलला नाही.
दुसरी एक घडलेली गोष्ट. माझे एक ज्येष्ठ नागरिक मित्र व त्यांच्या पत्नी हे मुख्य रस्त्याच्या पदपथावरून चालत होते. या रस्त्याला एक गल्ली येउन मिळत असल्याने ती गल्ली क्रॉस करणे या दोघांना आवश्यकच होते. ही गल्ली वन वे असल्याने उजव्या बाजूने ट्रॅफिक येणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे डावीकडे बघत हे दोघे ती गल्ली क्रॉस करत होते. अचानक ब्रेक करकचून दाबल्याचा आवाज आला आणि एक मोठी स्टेशन वॅगन किंवा ज्याला अलीकडे SUV म्हणतात अशी गाडी त्यांच्या शेजारीच कर्कश हॉर्न वाजवत उभी राहली. हे दोघे अक्षरश” भितीने कापू लागले. गाडी चालवणारी व्यक्ती पांढरा शुभ्र झब्बा, पायजमा डोळ्याला काळा गॉगल, तोंडात पान व भरभक्कम शरीर अशी दिसत होती. ” ए थेरड्या दिसत नाही का?” अशी दरडावणी ऐकल्यावर आमच्या मित्रांनी घाबरत घाबरतच त्या व्यक्तीला हा वन वे असल्याचे दर्शवून दिले. त्यावर त्या व्यक्तीची रिऍक्शन काय असावी? ” ए तुला थेरड्याला काय करायचे आहे? तू आपला सूट. नाहीतर धक्का खाशील आणि डायरेक्ट वैकुंठाला जावे लागेल.” (पुण्यातल्या स्मशानाचे नाव वैकुंठ आहे.)
मला अलीकडे पुष्कळदा असे वाटते की आपल्या आजूबाजूला दिसणार्या हे सगळे एवढे आधुनिक तरुण व तरुणी, फक्त दिसायलाच आधुनिक झाले आहेत. त्यांची मने अशिक्षित व असंस्कृतच राहिली आहेत. कोणत्याही सुसंस्कृत समाजात रहायचे असले तर सभ्यतेची एक काहीतरी मूलभूत पातळी प्रत्येकाने राखणे आवश्यक असते. तीच जर राखली गेली नाही तर झोपडपट्टीत रहाणारे, व फक्त जंगलाचे नियम पाळणारे लोक व हे आधुनिक सुशिक्षित यात फरक काय तो राहिला? भारतात एवढ्या सुधारणा होत आहेत. शहरांतले लोक किमान तरी शिकलेले असतात. त्यांचे उत्पन्न सुद्धा बर्यापैकी असते. तरीही ही वृत्ती आपल्याकडे का फोफावत जाते आहे?
मला याची दोन कारणे दिसतात. व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनाच आता बदलत चालल्या आहेत. मी माझ्यापुरते, फार तर माझ्या कुटुंबापुरते बघणार. मी ज्या समाजात रहातो आहे त्याच्याकडे माझे काही दायित्व आहे हेच मुळी मला मान्य नाही, अशी काहीशी वृत्ती आता शहरी भागात तरी रुजत चालली आहे. दुसरे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात असलेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे माणसे जास्त जास्त आत्मकेंद्री बनत आहेत.
काहीही असो! हा होणारा बदल काही फारसा स्वागतार्ह आहे असे मला तरी वाटत नाही. हे असेच चालू राहिले तर थोड्याच कालात आपण सगळे होणार आहोत, माणूस नावाची बेटे., या एका महानगरात राहणारी.
28 फेब्रुवारी 2010





> तीच जर राखली गेली नाही तर झोपडपट्टीत रहाणारे, व फक्त जंगलाचे नियम पाळणारे लोक व हे आधुनिक सुशिक्षित यात फरक काय तो राहिला?
>——
झोपडपट्टीत रहाणारे लोक फक्त जंगलाचे नियम पाळतात, असा प्रकार नाही. त्यांच्यातही कमी शिकलेले पण सुसंस्कृत आणि नीतीवान लोक असतात. ‘पंजाबी लोग लाथों के भूत हैं, वह बातों की नहीं मानते’ अशा अर्थाचे उद्गार के पी एस गिल यांनी काढले होते. सर्वच भारतीयांबद्दल तो प्रकार आता अनुभवायला मिळतो.
Posted by Naniwadekar | फेब्रुवारी 28, 2010, 9:03 pmनानिवडेकर
झोपडपट्टीत राहणारे सर्व लोक असंस्कृत असतात असे मी कधीच म्हणणार नाही. बहुतेक वेळा हे लोक तथाकथित सुशिक्षित लोकांपेक्षा जास्त सुसंस्कृतरित्या वागतात. परंतु काही थोडे टक्के झोपडपट्टीवासिय हे जंगलाचा कायदा पाळणारे असतात. मी त्यांच्याबद्दल म्हणतो आहे.
Posted by chandrashekhara | मार्च 1, 2010, 9:41 सकाळीवाचून अस्वस्थ वाटले.
त्या मुलीला तिथल्या तिथे समज का दिली नाहीत?
बाकी पांढरे बगळे, त्यांच्या खास एसयुव्ही (फोर्ड एंडेव्हर वगैरे), त्यांचे वर्तन उन्मत्त आणि उद्धटच असते. तो एक स्थायीभावच झाला आहे.
Posted by सौरभ | मार्च 1, 2010, 9:37 सकाळी