पेशवे दरबारात दर वर्षी तीन सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात. या पैकी पहिले दोन उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि दसरा. याशिवाय अतिशय मोठ्या स्वरूपात व धूमधडाक्यात साजरा केला जाणारा तिसरा महत्वाचा सण म्हणजे होळी. फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला सुरू होणारा हा महोत्सव पुढचे पाच दिवस अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात असे. दरबारात साजर्या होणार्या या सणात, प्रत्यक्ष पेशवे सरकार, अतिशय रुचीने व आनंदाने भाग घेत असल्याने पुण्याच्या सर्वच नागरिकांचा आनंद द्विगुणित होत असे व तेही अतिशय उल्हासाने आपापल्या घरी हा सण उत्साहाने साजरा करत. थोड्याच दिवसांनी येणार्या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हा सण आहे असे मानले जात असे. सर्व दर्जाच्या आणि वयाच्या लोकांना हा सण मोकळेपणे आणि मर्जीनुसार साजरा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याने निरनिराळ्या प्रकारांनी लोक स्वत:ची करमणूक करून घेत.
या उत्सवाच्या दरम्यान, पेशव्यांच्या शनिवार वाड्यात, अनेक नृत्य, गायन व संगीताच्या मैफिली होत असत आणि पुण्यातील नागरिक या कार्यक्रमांना भरपूर दादही देत असत. भवाई गुजराथी आणि वेंकट नरसी हे त्या कालातील दोन प्रसिद्ध गायक होते. आतासारखी संपूर्ण नाटके तेंव्हा होत नसत. परंतु काही नट छोटे छोटे विनोदी प्रसंग पेशव्यांच्या समोर सादर करीत व चांगली बिदागी मिळवीत. इ.स 1785 मधल्या पेशव्यांच्या दैनंदिनीत, श्री. बाललिंग नाईक आणि लक्ष्मण गुरव या सुपे येथील दोन नटांना, दशावताराचे चांगले सोंग काढल्याबद्दल रुपये 30/- व पोषाख अशी बिदागी दिल्याची नोंद सापडते.
हा उत्सव पाचव्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी समाप्त होत असे. या दिवशी केशर व पलाश फुले या पासून तयार केलेले रंग, पिचकार्या व मातीची भांडी यांचा वापर करून, एकमेकावर मोक़ळेपणाने टाकण्यात येत असत. स्वत: पेशवे सरकार हिराबाग येथील सुख महालात रंग खेळत. यावेळी शिंदे, भोंसले, होळकर वगैरे सारखे सरदार व सेनाप्रमुख यांना पेशव्यांचे खास आमंत्रण असे.
ग्वाल्हेरच्या शिंदे दरबारात असलेल्या ब्रिटिश रेसिडेंटचे शरीर रक्षक मेजर ब्रॉउटन हे एका अशा रंगपंचमीला हजर होते. त्यांनी या प्रसंगाचे मोठे सुंदर वर्णन लिहून ठेवले आहे. ते म्हणतात की
” असा प्रसंग मी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधी अनुभवला नव्हता आणि पुन्हा कधी अनुभवीन असे वाटत नाही. कल्पना करा की तुमच्या समोर सोने आणि चांदी यांच्या झिरमिळ्यांनी सजलेले अतिशय रंगीबेरंगी कपडे परिधान केलेल्या अनेक नृत्यांगनांचे समुह नाच करत जात आहेत. या नृत्यांगनांचे अंग व कपडे गुलालाने माखलेले आहेत व सभोवतालून होणार्या रंगाच्या पिचकार्यांनी त्यांचे सर्व कपडे भिजलेले असून त्यातून पाणी ठिपकत आहे.या नृत्यांगनाच्या चारी बाजूस, डफ, तुणतुणी, तुतार्या, सारंगी सारख्या अनेक वाद्यांचा कोलाहल चालू आहे व या वाद्यांच्या तालावर त्या नृत्यांगना खास होळीसाठी रचलेली गाणी म्हणत आहेत. मधूनच पेशवे सरकार आपल्या पिचकारीतून या नृत्यांगनांच्या अंगावर रंग उडवतात. या वेळी या नृत्यांगनांचे चित्कार व बाकी बाजूंना उभे असलेले इतर सर्व लोकांचा जल्लोश व टाळ्या वाजवणे यामुळे सर्व वातावरण मोठे आल्हाददायक व प्रसन्न बनले आहे. गुलाल उडवणार्यांचे हास्य व ज्यांच्या अंगावर तो गुलाल उडवला जातो आहे त्यांच्या न उडवण्याबद्दलच्या विनवण्या ऐकू येत आहेत. या प्रसंगाचे जर कोणी चित्र काढले तर त्याला फक्त गुलाबी आणि पिवळ्या रंगातच हे चित्र काढावे लागेल. हा प्रसंग इतका असामान्य आणि अफलातून आहे की माझ्याजवळ त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत.”
उत्तर पेशवाईत पुढेपुढे म्हणजे दुसर्या बाजीरावाच्या कालखंडात, या होळीच्या महोत्सवाची गुणवत्ता कमी होत गेली व त्याला अनौचित्यपूर्ण, बीभत्स व अश्लील असे स्वरूप प्राप्त होऊ लागले. या कालखंडात, पेशवाई राज्याची राजधानी पुणे हे हळूहळू एक नीतिमूल्यांचा र्हास व लोप पावत असलेले असे एक decadent आणि degenerating शहर होत चालले होते. त्या पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या या होळी उत्सवाचेही स्वरूप बीभत्स व अश्लील झाले असले तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
27 फेब्रुवारी 2010
(लेखात घातलेल्या चित्रांचा होली उत्सवाशी तसा काही संबंध नाही, तत्कालीन पुण्याची ही तैलचित्रे आहेत.)
![019WDZ000003549U00016000[SVC2]](http://chandrashekhara.files.wordpress.com/2010/02/019wdz000003549u00016000svc2.jpg?w=750)
![019WDZ000001055U00020000[SVC2]](http://chandrashekhara.files.wordpress.com/2010/02/019wdz000001055u00020000svc2.jpg?w=750)
![019WDZ000003549U00020000[SVC2]](http://chandrashekhara.files.wordpress.com/2010/02/019wdz000003549u00020000svc2.jpg?w=750)
![019WDZ000003549U00019000[SVC2]](http://chandrashekhara.files.wordpress.com/2010/02/019wdz000003549u00019000svc2.jpg?w=750)





दुसर्या बाजीरावाच्या कालखंडात … पेशव्यांच्या या होळी उत्सवाचेही स्वरूप बीभत्स व अश्लील झाले असले तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
—-
तसे पाहिल्यास देवालयाचे पावित्र्य नष्ट करू शकणार्या पंडेगिरी वगैरे गोष्टी त्याला चिकटू शकतात, टिळकांचा गणेशोत्सवही पुढे उबग आणणारे रूप घेऊ शकतो. पण यामागच्या मूळ कल्पना उदात्त आहेत; उलट होळीचे स्वरूपच बीभत्सतेला आणि अश्लीलतेला वाव देणारे आहे.
दुसर्या बाजीरावाला शिव्या देण्याची आपल्याला सवयच आहे, पण मेजर ब्राउटन यांनी त्या काळची होळी पाहिली असती, तर त्यांना बहुतेक आनन्दच झाला असता. आणि त्यांना जी त्याआधीची होळी आवडली तिच्यापासून दूर राहणारे लोकही असणारच.
आज़ही तीच अवस्था आहे. दोन वर्षांपूर्वी स्टॅनफ़र्ड मधे झालेल्या होळीची मी ऐकलेली दोन वर्णने अशी : १) मी इतक्या विविध रंगाच्या साड्या एका ठिकाणी कधीच पाहिल्या नव्हत्या, आणि असा देखावाच अद्भुत होता. – ऑफ़ीसातली एक लॅटिन बाई. २) या आधुनिक भारतीय महिलांना कोणत्या रंगाचे कपए घालायचे याचा काही पोचच राहिलेला नाही. – एक भारतीय मित्र.
माझ्या मते हा सण संस्कृतीला काळिमा फासणारा आहे, आणि तो ज्याच्या डोक्यात आला तो माणूस द्रष्टा नव्हता, आणि कदाचित तो वाह्यातच असावा.
- नानिवडेकर
Posted by Naniwadekar | फेब्रुवारी 27, 2010, 5:37 pmनानिवडेकर
उत्तर पेशवाईत जेंव्हा होळी उत्सवाचे स्वरूप बीभत्स व अश्लील झाले त्याचे कारण दुसरा बाजीराव आहे असे मला म्हणायचे नाही. मी फक्त त्याचे नाव कालखंड निदर्शक म्हणून वापरले आहे. त्याच प्रमाणे सभ्यतेच्या आपल्या सध्याच्या संकल्पना वापरून 200 वर्षांपूर्वीची एखादी परंपरा judge करणे योग्य ठरेल असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे या ऐतिहासिक परंपरांकडे एक कुतुहुल म्हणूनच बघणे योग्य ठरावे.
Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 27, 2010, 8:38 pm> सभ्यतेच्या आपल्या सध्याच्या संकल्पना वापरून 200 वर्षांपूर्वीची एखादी परंपरा judge करणे योग्य ठरेल असे मला तरी वाटत नाही.
>—-
हे मला मान्य आहे. शिवाजीच्या काळी बहुपत्नीत्वाची पद्धत होती, त्याची कारणे असू शकतील. आज़ही स्त्रीगर्भाची जी मोठ्या प्रमाणात हत्या होते ती माझ्या आज़ूबाज़ूचे कोणी करत नाहीत. त्यांच्यातले अनेक ज़ण पहिली मुलगी झाल्यावरही दुसर्या अपत्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण माझ्या चष्म्यातून पाहुन मी आज़ही स्त्रीगर्भहत्येची सरसकट निन्दा करण्याऐवजी त्या विषयावर निष्कर्ष काढणे टाळतो. घरच्या स्त्रीच्या लग्नासाठी झेपणार नाही इतके कर्ज़ कुटुम्बानी इच्छेनी-अनिच्छेनी काढलेले लोक घरात स्त्री-जन्म नको म्हणतात, ते मी समज़ू शकतो. पण रंगांचा खेळच बालिश आणि आंबटशौकीन लोकांच्या पथ्यावर पडणारा आहे. आज़ही आहे, आणि तेव्हाही होता असा माझा समज़ आहे. माझा एक ‘हा होळी खेळणार नाही’ अशा स्वभावाचा एक मित्र एकदा माझ्याकडे टपकला. तो मला रंग लावणार नाही, हे आश्वासन घेतल्यावरच मी दार उघडलं. आणि माझा त्याच्यावर विश्वास नसता तर बाहेरच्या बाहेरच हाकलला असता. मग त्यानी त्याच्या होळी खेळण्याचं कारण सांगितलं. ज्या मित्रांच्या सेक्सी बायकांच्या गालांसाठी त्याचे हात इतर ३६४ दिवस शिवशिवत त्या वासनापूर्तीचा हा राजरोस दिवस होता. हे कारण मला मान्य आहे. (पण तरीही मी होळी खेळत नाही.) त्या मित्रानी माझ्याशी रंगीत बोलायला माझी काहीच हरकत नव्हती, पण त्यालाही एखाद्या माझ्यापेक्षा नीतीचे कडक निकष असणार्याचा आक्षेप असू शकेल.
Posted by Naniwadekar | फेब्रुवारी 28, 2010, 12:36 सकाळीछान महिती . नानिवडेकर म्हणतात त्यात बरेच तथ्य आहे.” रंगांचा खेळच बालिश आणि आंबटशौकीन लोकांच्या पथ्यावर पडणारा आहे. आज़ही आहे, आणि तेव्हाही होता असा माझा समज़ आहे.” असं ते म्हणतात ते बरोबर आहे. मला ही होली पेक्षा धुळ्वड किंवा रंगपंचमी हे सण अनेक भांडणांचं मूळ आहेअसे वाटते.
Posted by savadhan | मार्च 1, 2010, 2:44 pmdusara bajirao zala mahun tar pune vidya wa kaleche maherghartharale
Posted by avadhutsalunkhe | जून 3, 2010, 10:16 सकाळीनानिवडेकर
तुम्हाला होळीचा अर्थ समजला नाही आहे.होलिकोत्सव हा आपल्या हिंदू धर्माचा इक महत्वाचा सण आहे.तुम्हाला त्यचा अर्थच माहित नाही म्हणून तुम्ही ह्या सणाला बदनाम करत आहात.हा हे तुमचा म्हणणे बरोबर आहे कि काळा नुसार होळीचं स्वरूप बदललेले आहाय म्हणून काही सगळ्या समाजाला खराब म्हणणे योग्य नव्हे . कृपया हे लिंक बघावी.ह्यातून तुम्हाला होळीचा अर्थ समजेल
http://upakram.blogspot.com/2011/03/blog-post_19.html
Posted by Kuanl | मार्च 29, 2011, 3:30 pm