स्थळ - तिबेटच्या पूर्व भागातील मारखम (Markham)हे गाव
तारीख - 16 मे 2009
कोणत्याही प्रकारची हिंसात्मक कारवाई करण्याची इच्छा नसलेला, पाचशेच्या वर संख्येचा, खेडूतांचा एक निशस्त्र जमाव, मारखम या गावाजवळ असलेल्या झोंगकाई आणि कंपनी(Jhongkai & Co.) यांच्या मालकीच्या खाणीकडे जाणार्या एकुलत्या एक रस्त्यावर जमा झाला आहे. या खाणीतून निर्माण होणार्या प्रदुषणामुळे या खेडूतांचे सर्व आयुष्यच बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. पाणी विषारी झाले आहे. जनावरांचे खूर झिजू लागले आहेत. दोन वर्षात 26 माणसे व 2460 जनावरे यमसदनाला गेली आहेत. या खेडूतांनी केलेल्या शेकडो अर्ज विनंत्यांना वाटाण्याच्या अक्षता अधिकार्यांनी लावलेल्या आहेत. यामुळे अतिशय चिडलेले हे खेडूत आता हातात हात घालून रस्त्यावर ठाण मांडतात. अपेक्षेप्रमाणे चिनी अधिकारी या जमावाला उधळून देण्यासाठी सशत्र पोलिस पाठवतात. हे खेडूत रस्त्यावरून उठण्यास संपूर्ण नकार देतात. अधिकारी शेवटची सूचना देतात. खेडूत उठले नाहीत तर पोलिस गोळीबार करतील म्हणून. खेडूतांच्या चेहर्यावर अतिशय करारी आणि “जिंकू किंवा मरू” हा भाव. ते रत्यावरून उठण्यास नकार देतात.
आता पोलिस मोठ्या कोड्यात पडले आहेत. त्यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत. गोळीबार करून 500 तिबेटी खेडूतांची निर्घृण हत्या करणे किंवा खाणीचे कामकाज बंद करणे. पहिला पर्याय निवडणे म्हणजे चीनची आंतर्राष्ट्रीय प्रतिमा संपूर्ण मिटवणे आहे हे चिनी अधिकार्यांना चांगलेच माहीत आहे. ते मुकाट्याने व नाईलाजाने दुसरा पर्याय निवडतात. खाणीचे कामकाज बंद केल्याची घोषणा होते. एक शब्द न बोलता किंवा काहीही हिंसात्मक कारवाई न करता हे तिबेटी खेडूत त्यांच्यासाठी असलेली ही जीवन मरणाची लढाई जिंकतात.
हा काही कोणत्या नाटक किंवा सिनेमातला सीन नाही. तिबेटमधे मागच्या वर्षी प्रत्यक्षात घडलेली ही घटना आहे. हे वर्णन वाचल्यावर मला आपण 2009 सालामधल्या एका घटनेचे वर्णन वाचतो आहे का 1906 या सालामधले हेच क्षणभर कळेनासे झाले. 11 सप्टेंबर 1906 ला दक्षिण आफ्रिकेमधील ट्रान्सवाल या राज्यात असाच प्रसंग घडला होता. त्या प्रसंगात चिनी अधिकार्यांऐवजी समोर होता जनरल स्मट्स आणि आंदोलकांचे पुढारी होते एक भारतीय वकील, मोहनदास करमचंद गांधी. त्या ठिकाणीही जनरल स्मट्सने संपूर्ण माघार घेतली होती व लोक प्रक्षोभ दाखवण्याचे सत्याग्रह हे नवीन शस्त्र गांधीजींनी प्रथम वापरले होते.
तिबेटी लोकांचा सशस्त्र प्रतिकार 1960च्या आसपास चिनी सैन्याने मोडून काढल्यानंतर तिबेटी लोकांचा प्रतिकार संपल्यासारखेच होते. 2008 मधे परत एकदा तिबेटी लोकांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु चीनच्या शक्तीमान सैन्यापुढे त्यांचे काही चालले नाही व त्यांना शरणागती पत्करावी लागली. या पार्श्वभूमीवर 2009 मधे तिबेटी नववर्षदिन किंवा लोसर(Losar) साजरा न करण्याचे तिबेटी जनतेने ठरवले. एस.एम.एस., मेल आणि मौखिक स्वरूपात हा निर्धार सगळीकडे पसरला. अधिकृतरीत्या नववर्षदिनानिमित्त रोषणाई, दारूकाम सर्व करण्यात आले पण त्यात तिबेटी जनतेने भागच घेतला नाही. ते घरीच बसून राहिले. या लोसरच्या निमित्ताने तिबेटी जनतेला सत्याग्रहाचे अमोघ शस्त्रच आता सापडले आहे.
दलाई लामांचा जन्म बुधवारी झालेला आहे. आता दर बुधवारी तिबेटी लोक ल्हाकर(Lhakar) पाळू लागले आहेत. या ल्हाकरमधे तिबेटी लोक आपली पारंपारिक वस्त्रे परिधान करतात. फक्त तिबेटी भाषेत बोलतात.त्यांचे धार्मिक विधी करतात. फक्त तिबेटी उपहारगृहात जातात व तिबेटी माल खरेदी करतात. कार्डझे व नाबा (Kardze and Ngaba) सारख्या गावात तर चिनी मालावर बहिष्कार टाकला जाऊ लागला आहे. येथील अनेक चिनी व्यापार्यांनी आपला गाशा गुंडाळायला सुरवात केली आहे.
तिबेटी लोकांच्या या शांततापूर्ण सत्याग्रहाचे फलित काय हे आज जरी सांगणे कठीण असले तरी महात्माजींना खरा खुरा वारस या तिबेटी सत्याग्रहींच्या स्वरूपात लाभला आहे हे मात्र नक्की.
12 फेब्रुवारी 2010







Good information
Posted by raghupati | फेब्रुवारी 12, 2010, 4:54 pmहे माझ्या वाचनात आलेच नाही. उत्तम माहिती, धन्यवाद.
Posted by bhaanasa | फेब्रुवारी 12, 2010, 8:24 pmbhaanasa
ही माहिती कोणत्याही माध्यमाने दिलेलीच नाही. जालावर शोध घेतल्यावर काही तिबेटसंबंधी संकेतस्थलांवर ही माहिती उपलब्ध आहे. मी तिथूनच संकलित केली आहे.
Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 12, 2010, 8:32 pmUttam mahiti va lekh.
Posted by Jitendra Gokhale | फेब्रुवारी 13, 2010, 2:49 pmमाला वाटत नाही. चीनि दगडाला कधीही पाज़र पुटेल. राहिली गोष्ट या गाँधीगीरीची ब्रिटिश आणि चीन यात जमीन आसमानचा फर्क आहे. यात पण ब्रिटिश ना लोकशाईचा शोध दुसरे महायुद्ध नंतर लागला जेव्हा ते स्वता युधात पोळउन निघाले
Posted by राजन | फेब्रुवारी 15, 2010, 11:33 pm