विश्वास नाही ना बसत! परंतु हा सल्ला आहे फक्त सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या वरिष्ठ नागरिकांसाठी. दुर्दैवाने, बाकीच्या वयोगटांसाठी मात्र, वजन कमी ठेवा हाच सल्ला डॉक्टर तुम्हाला देतील. कोणालाही असे वाटणे स्वाभाविकच आहे नाही का? की सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांच्यात असे काय विशेष आहे की त्यांनी मात्र थोडेसे लठ्ठ राहिलेलेच चांगले आहे. ऑस्ट्रेलिया मधे झालेल्या एका संशोधनामधून हे अनुमान काढले गेले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधल्या संशोधक डॉक्टरांनी नुकताच एक अभ्यास पूर्ण केला. या अभ्यासाचा विषय असा होता की वरिष्ठ नागरिकांसाठी असा कोणता बॉडी मास इंडेक्स (BMI) आदर्श ठरवता येईल ? की जो राखल्यास या लोकांची आर्युमर्यादा वाढू शकेल. या अभ्यासार्तंगत, या संशोधक गटाने गेल्या दहा वर्षात, मृत्युसमयी सत्तर ते पंचाहत्तर वय असलेले जे वरिष्ठ नागरिक कालवश झाले, त्यांचा BMI मृत्युसमयी काय होता याचा डेटा संग्रहित केला. या शिवाय या संशोधक गटाने 9200 वरिष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांचा BMI आणि या लोकांना ह्रदयविकार, मधूमेह किंवा कॅन्सरसारखे विकार आहेत का? याचीही तपासणी केली. या संशोधनातून या डॉक्टर्सनी खालील अनुमाने काढली.
सत्तरीच्या आसपास असलेले जे नागरिक, थोडेसे लठ्ठच आहेत त्यांची आर्युमर्यादा सर्वात जास्त असण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचा BMI नॉर्मल रेंजमधे आहे, जे लोक लठ्ठंभारती (Obese) आहेत किंवा ज्यांचा BMI नॉर्मलपेक्षा कमी आहे अशा सर्व लोकांची आर्युमर्यादा, थोड्या लठ्ठ लोकांच्या मानाने, कमी असण्याची शक्यता आहे. या थोड्याशा लठ्ठ लोकांना, ह्रदयविकार, मधुमेह किंवा श्वसन विकार होण्याची शक्यता बरीच कमी आहे.
अर्थातच जे लोक लठ्ठंभारती आहेत त्यांना मृत्युचा धोका सर्वात आधिक असतो. त्याच्या खालोखाल नॉर्मलपेक्षा कमी BMI असलेल्या लोकांनाही हा धोका जास्त संभवतो. या शिवाय महत्वाची गोष्ट अशी की बैठे काम करणार्या लोकांना, मग वजन काहीही असो, हा धोका सर्वात जास्त संभवतो. अशा लोकांना, विशेषत: स्त्रियांना, हा धोका 25% तरी अधिक असतो. या संशोधन गटाचे प्रमुख Lead researcher, Professor Leon Flicker यांच्या मताप्रमाणे जे लोक निरोगी अवस्थेत सत्तरीच्या उंबरठ्यावर पोचतात, अशा लोकांच्या शरीरावर असलेल्या चरबीचे, धोके आणि फायदे यांचे गणित थोडे निराळेच असते. त्यामुळे या वयोगटाला आदर्श BMI कोणता याचे असलेले सध्याचे मानक बदलण्याची गरज आहे.
केंम्ब्रिज विद्यापीठाचे Professor Kay-Tee Khaw हे सुद्धा याच मताचे आहेत की या वयोगटात कुपोषण ही मोठी समस्या असल्याने ज्या लोकांच्या पोटाचा घेर थोडा मोठा असतो असे लोक जास्त आरोग्यमय जीवन जगतात. सत्तरीमधे जास्त वजन का फायदेशीर असते याचा खुलासा करताना ऑस्ट्रेलियामधल्या वरील संशोधक गटापैकी एका संशोधकाने सांगितले की म्हातारपणी चरबीच्या स्वरूपात शरीरावर असलेले पोषक द्रव्यांचे साठे, जर त्या व्यक्तीला आजारपण आले तर खूपच उपयुक्त ठरतात व ती व्यक्ती त्या आजारातून पूर्णपणे बाहेर येण्याची शक्यता बरीच वाढते.
तेंव्हा तुम्हा जर सत्तरीच्या उंबरठ्यावर असलात आणि तुमचे पोट जरा जास्तच मोठे दिसते आहे असे तुम्हाला वाटत असले तर काळजी करू नका हे वाढलेले पोट तुमच्या बॅन्क बॅलन्स सारखेच महत्वाचे आहे.
1 फेब्रुवारी 2010








चर्चा
Trackbacks/Pingbacks
Pingback: Tweets that mention गुटगुटीत रहा खूप जगा! « अक्षरधूळ(Akshardhool) -- Topsy.com - फेब्रुवारी 4, 2010