भारताच्या ईशान्य कोपर्यातल्या ‘सात बहिणी‘ म्हणून ओळखल्या जाणार्या राज्यांपैकी एक राज्य म्हणजे मेघालय. अतिशय सुंदर वनश्रीने नटलेले हे राज्य, नेहमीच हिरवे गार असते. या मेघालयात, पश्चिम खासी टेकड्यांच्या भागात चेरापुंजी हे प्रसिद्ध गाव आहे. चेरापुंजी या गावाचे नाव एखादा शाळेत जाणारा मुलगा सुद्धा सांगू शकेल इतके ते प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव म्हणून चेरापुंजी ओळखले जाते. 1972 मधे जेंव्हा मेघालय या राज्याची स्थापना झाली तेंव्हा या राज्याला इथल्या हवामानामुळे ‘मेघांचे घर‘ असे अतिशय समर्पक नाव देण्यात आले. खरे म्हणजे हे नाव संपूर्ण राज्याला देण्यापेक्षा चेरापुंजी गावाला देणे जास्त सयुक्तिक ठरेल कारण सरासरीने या गावात वर्षभरात मिळून, तब्बल 1100 सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो. 1861साली चेरापुंजीला फक्त एका महिन्यात 2891 सें.मी. पाऊस पडला होता व हा आतापर्यंतच्या माहिती असलेल्या इतिहासातला उच्चांक आहे.
याच चेरापुंजीत गेल्या चार-पाच वर्षापासून पडणार्या पावसाचे प्रमाण 20 टक्के तरी घटले आहे असे इथले हवामान खात्याचे ऑफिस सांगते. सध्या इथे वर्षभरात 800 ते 900 सें.मी. एवढाच पाऊस पडतो आहे. चेरापुंजीला मिळालेला ‘जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव‘ हा किताब आता चेरापुंजीच्या जवळच असलेल्या मॉसिनराम (Mawsynram) या गावाकडे हस्तांतरित झाला आहे. या गावात मागच्या वर्षी 1200 सें.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला.
मेघालयात येणारे प्रवासी राजधानी शिलॉंग बरोबरच चेरापुंजीलाही भेट देतात. या प्रवाशांची खातिरदारी करण्यासाठी बर्याच स्थानिक लोकांना उद्योगधंदा मिळतो. यामुळे चेरापुंजीची 1961 मधे असलेली लोकसंख्या मूळ 7000 पासून 15 पटींनी तरी वाढली आहे. चेरापुंजी गावात पाणी साठवण्याची काहीच सोय नसल्याने हिवाळ्याच्या महिन्यांत एवढ्या लोकवस्तीला पाणी पुरेनासे झाले आहे व रोज सकाळी आजूबाजूच्या भागांमधून पाण्याचे टॅन्कर्स चेरापुंजीकडे येताना दिसतात. चेरापुंजीला येणारे बहुतेक प्रवासी इथला पाऊस बघण्यासाठी येत असल्याने त्यांच्या संख्येत घट होण्याची भिती आता स्थानिक लोकांना वाटू लागली आहे.
चेरापुंजीला नियमितपणे भेट देणार्या एका प्रवाशाच्या मते नव्वदीच्या दशकात चेरापुंजीला येण्याच्या प्रवासाची मजा काही औरच होती. रस्त्यावर उतरलेले दाट ढग व पाऊस यामुळे रस्ता दिसतच नसे व त्यातूनच मार्ग काढावा लागे. आता याच चेरापुंजीला हिवाळ्यात पाणी विकत घ्यायला लागते आहे. चेरापुंजीचे सरासरी तपमान 2 ते 3 डिग्री सेल्ससने वाढले आहे. अलीकडे पाऊस पडण्याचा पॅटर्नसुद्धा बदलला आहे. जेंव्हा पाऊस अपेक्षित असतो तेंव्हा तो पडत नाही व अनपेक्षितपणे पडतो. सगळीकडे न पडता पाऊस काही जागांच्यावरच काही वेळा पडू लागला आहे.
पाऊस कमी होण्यामागचे कारण तरी काय असावे? चेरापुंजीच्या आसपास घनदाट जंगले कधीच नव्हती आणि जी काय वनसृष्टी आहे ती स्थानिक लोकांच्यात अतिशय पवित्र समजली जात असल्याने लाकूडतोड करण्यास कोणी धजावत सुद्धा नाही. नवे उद्योग आल्यामुळे पाऊस कमी झाला आहे असे म्हणावे तर या भागात एक सिमेंट कारखाना सोडला तर बाकी उद्योग सुद्धा नाहीत.
स्थानिकांच्या मते भू ताप वृद्धी (Global Warming) एवढे एकच कारण चेरापुंजीमधल्या हवामानबदलासाठी असू शकते. कारण काहीही असो! पण कमी पाऊस, वाढलेले तपमान व त्यामुळे वर्षातील काही महिने अदृष्य़ होणारे चेरापुंजीचे प्रसिद्ध धबधबे हे सगळे येथे कमी प्रवासी येण्याला कारणीभूत होत आहेत हे नक्की.
22 डिसेंबर 2009










नमस्कार!
अतिशय उपयुक्त माहिती आहे. अभ्यास पूर्ण विवेचन आहे. माहिती व ब्लॉग खूपच छान.
Posted by anukshre | डिसेंबर 22, 2009, 1:59 pmAre khatarjama nahi “khatirdari”….
Khatarjama ha marathi shabda aahe jyacha arth aahe “Khatree”…
Khatirdari ha hindi shabda aahe, jyacha arth aahe “baddast”….
Posted by Aaditya | डिसेंबर 23, 2009, 1:12 सकाळीमी तुम्हाला टॅगलय . माझी आजची पोस्ट वाचा
Posted by anukshre | डिसेंबर 23, 2009, 10:19 सकाळी