भारतातील राजस्थान हे राज्य, तिथल्या वाळवंटी हवामानाबद्दल प्रसिद्धच आहे. ग्रेट इंडियन डेझर्ट किंवा थरचे वाळवंट हे या राज्याचाच भाग असल्याने राज्याच्या इतर भागात सुद्धा अतिशय कमी पाउस, खुरटी झुडपे, उन्हाळ्यात धुळीची वादळे व अति उष्ण हवा तर हिवाळ्यात कडाक्याची थंडी यासारखी वाळवंटी प्रदेशाची वैशिष्ट्ये अनुभवता येतात.
उपग्रहाद्वारा केलेल्या सर्वेक्षणामधे असे आढळले आहे की राजस्थानमधली भूगर्भ जल पातळी वर्षाला एक फूट या प्रमाणात खाली खाली जात चालली आहे. याचा परिणाम साहजिकच हवामानावर होतो आहे. त्यातच या वर्षी पडलेल्या मॉन्सूनच्या पावसाने सरासरीची तीन चतुर्थांश पातळी जेमतेम गाठली आहे व तो अवेळी पडला आहे. याचा परिणाम साहजिकच पिकांच्यावर झाला आहे. बहुतेक ठिकाणी फक्त 5 ते 10 टक्के पीक हातात येईल असे शेतकर्यांना वाटते आहे.
जोधपूर हे राजस्थानमधले एक शहर. थरच्या वाळवंटाला लागूनच जोधपूर जिल्हा आहे. या शहराची सूर्य नगर (Sun City) म्हणून प्रसिद्धी आहे. अतिशय सुंदर महाल, किल्ला वगैरे वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणांमुळे, येथे प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. जोधपूरच्या भौगोलिक स्थानामुळे येथे वाळवंटी हवामान व पाण्याचे दुर्भिक्ष असणार अशी कोणाचीही अपेक्षा असणार.

प्रत्यक्षात जोधपूरमधली भूगर्भजल पातळी, वर्षाला साडेचार ते पाच फूट या प्रमाणात, सतत वाढतच चालली आहे. जोधपूरमधल्या कुंजबिहारी मंदिरात सर्वत्र संगमवरी फरशा बसवलेल्या आहेत. या फरश्यांच्या दोन ते तीन इंच वरपर्यंत सतत पाणी असते. फरश्यांच्या मधल्या भेगांच्यातून सतत पाण्याची छोटी कारंजी उडत असतात. ज्या घरांना तळघरे आहेत तेथे रोज इतके पाणी साठते की ते पंप लावूनच काढून टाकावे लागते.

जोधपूरमधे पाण्याची एवढी सुबत्ता पूर्वी कधीच नव्हती. शहरवासीय अशी एक दंतकथा सांगतात की इ.स. 1459 मधे तिथल्या महाराजाने, जेंव्हा मेहेरनगड किल्याचे भूमीपूजन केले होते तेंव्हा त्या ठिकाणी वस्तीला असलेल्या एका गोसाव्याला हुसकवून लावले होते. संतप्त होऊन या गोसाव्याने “ तुझ्या राज्यात नेहमीच दुष्काळ राहील” असा शाप राजाला दिला होता. शापवाणीने म्हणा किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे म्हणा जोधपूरमधे पाण्याचे नेहमीच दुर्भिक्ष राहलेले आहे. आजूबाजूच्या प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असताना जोधपूरमधे मात्र आज पाण्याची सुबत्ता कशी? हा एक संशोधनाचा विषय झाला आहे.
![]()
जोधपूरच्या जय नारायण व्यास विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. भवानीशंकर पालीवाल यांच्या मताप्रमाणे, पाण्याच्या या सुबत्तेची दोन प्रमुख कारणे आहेत. प्रथम कारण म्हणजे इ.स. 1997 साली, भारत सरकारने बांधलेल्या राजस्थान कालव्याचे, जोधपूरपर्यंत पोचलेले पाणी. या कालव्यामुळे, पंजाब मधील नद्यांचे पाणी, राजस्थानकडे वळवण्यात आलेले आहे. या कालव्याच्या जवळ शेती असणारे शेतकरी, हे पाणी आपल्या शेतीसाठी वापरतात. त्यामुळे त्यांचा भूगर्भजलाचा उपसाच बंदच झाला आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जोधपूर हे शहर एखाद्या बशीसारख्या खोलगट भूप्रदेशावर वसलेले आहे. त्यामुळे आजूबाजूचे भूगर्भजल जोधपूरच्या शहरी भागाकडे भूगर्भाखालून वहात येते. हे पाणी दुसरा मार्ग नसल्याने जमिनीच्या वर येते आहे.
![]()
आता या पाण्याचे करायचे तरी काय असा प्रश्न येथील शासनापुढे आहे. शहरांतील बागांना जास्त पाणी पुरवठा केला जात आहे तर नळ टाकून शहरातील जादा पाणी पंप करून आजूबाजूच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या शेतीकडे पाठवावे असाही विचार आहे. या योजना जेंव्हा कार्यवाहीत येतील तेंव्हा येतील, सध्या मात्र वाळवंटाच्या मधे गंगा असा अनुभव जोधपूरवासीयाना येतो आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करणारे हेच लोक आता पाण्याचा मुबलक वापर करताना दिसतात.
26 ऑक्टोबर 2009





The central government should have thought more deeply before releasing water in the rajasthan canal.In fact they should have constructed a number of outgoing canals from the water sources in jodhpur and properly cemented the base of the rajasthan canal so that the water may not be absorbed in the ground which mostly consists of sand deposits
Posted by krishnakumar | नोव्हेंबर 6, 2009, 6:43 pm