प्रदुषण(Pollution) आणि भूताप वृद्धी (Global warming) हे आधुनिक जगाच्या मागे लागलेले राहु व केतु आहेत असे म्हटले तरी चालेल. आधुनिक राहणीच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी त्याच्यामुळे प्रदुषण आणि भूताप यांच्यात वाढ ही होतच रहाते. मागील शतकाच्या मध्यापर्यंत, पृथ्वीच्या पाठीवरच्या नैसर्गिक चक्रात, अशा तर्हेने निर्माण होणारे प्रदुषण व भूताप वृद्धी ही शोषली जाऊन समतोल नेहमीच राखला जात होता. काही पाश्चिमात्य राष्ट्रे (उदा. अमेरिका युरोप) मागील शतकाच्या सुरवातीपासूनच, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या उर्जास्त्रोतांचा बराचसा भाग आपल्या उपयोगासाठीच गिळंकृत करत असत. यामुळे प्रदुषण आणि भूताप निर्माण करण्यात त्यांचा मोठा हातभार असे. इतर सर्व राष्ट्रे गरीब होती व त्यामुळे त्यांचे या उर्जास्त्रोतांचे शोषण अगदी कमी होते. पाश्चिमात्य राष्ट्रांनी निर्माण केलेले प्रदुषण व भूताप, पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध असलेले नैसर्गिक उपाय, शोषून घेत व एकूण प्रदुषण व भूताप सुनियमित रहात असे.

आता परिस्थिती अशी आहे की पाश्चिमात्य श्रीमंत देशांच्या बरोबर अविकसित देशांनीही पृथ्वीवरील उर्जास्त्रोत मोठ्या प्रमाणावर वापरण्यास सुरवात केली आहे. यामुळे पृथ्वीवरील एकूण प्रदुषण व भूताप यांच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन या दोन्ही गोष्टीत भरमसाट वाढ होऊन एकूण परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. जोपर्यंत या श्रीमंत राष्ट्रांना याची काहीच तोशिश लागत नव्हती तोपर्यंत त्यांना काळजी करण्यासारखे काहीच नव्हते. या राष्ट्रांना झळ बसणे सुरू झाल्याबरोबर, पृथ्वीवरचे एकूण प्रदुषण आणि भूताप नियमित केला पाहिजे याची जाणीव त्यांना होऊ लागली.
प्रदुषण व भूताप कमी करण्याचा पृथ्वीच्या पाठीवरचा सगळ्यात उत्तम नैसर्गिक उपाय म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशात असलेली वर्षाअरण्ये (Rainforests). या जंगलांच्यात, जमिनीवरील मोठी अरण्ये आणि समुद्र व जमीन यांच्या सीमारेषेवरची मॅनग्रूव्ह अरण्ये हे दोन प्रकार येतात. पृथ्वीच्या वातावरणातल्या कर्बद्विप्राणिल वायूचे शोषण करून प्राणवायू हवेत सोडणे, जमिनीची आणि समुद्रकिनार्यांची धूप थांबवणे आणि भूताप कमी करणे या साठी ही वर्षाअरण्ये मोठाच हातभार लावत असत. ही वर्षाअरण्ये, त्यातील झाडांमुळे, मानवाचा एक महत्वाचा उर्जास्त्रोत नेहमीच राहिला आहे व आधिनिक मानवाची भूक प्रचंड असल्याने दुर्दैवाने हा उर्जास्त्रोत नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे. याचाच परिणाम प्रदुषण व भूताप यांच्या अनियंत्रित वाढीत झाला आहे.
या गंभीर परिस्थितीवर कशी मात करता येईल याचा सर्वच राष्ट्रे विचार करत आहेत. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ Peter Eisenberge आणि Graciela Chichilnisky यांनी BASF, कॉर्निंग वगैरे सारख्या कंपन्याबरोबर संशोधन करून एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे, हवेतील कर्बद्विप्राणिल वायू शोषून घेणे शक्य झाले आहे. निरनिराळे कारखाने, औष्णिक उर्जाकेन्द्रे यामधे कर्बद्विप्राणिलवायूच्या गाळण्या(Filters) बसवतात, त्यातला हा प्रकार नाही.हे तंत्रज्ञान वापरून विकसित केलेली उपकरणे, हवेत सोडल्या जाणार्या कर्बद्विप्राणिल वायूचे प्रमाण कमी न करता, प्रत्यक्ष शोषण करून, हवेतील या वायूचे प्रमाण ही उपकरणे कमी करतात. ही उपकरणे निरनिराळ्या स्वरूपात दिसतात. काही एखाद्या दूरादर्श किंवा दुर्बिणीसारखी दिसतात तर काही एखाद्या पातळ पडद्यासारखी. असतात. या सर्व उपकरणांचे कार्य असते एकच, हवेतील कर्बद्विप्राणिल वायूचे शोषण करून घेणे.

सध्याच्या परिस्थितीत हवेच्या 10 लाख मॉलोक्यूल्समधे 390 कर्बद्विप्राणिलवायूचे मॉलोक्यूल्स असतात. हे प्रमाण 350च्या तरी खाली जाणे आवश्यक आहे. यासाठी ही उपकरणे अतिशय उपयुक्त ठरतील असा विश्वास संशोधकांना वाटतो आहे. या उपकरणांमधील एक अडचण अशी आहे की ही चालवण्यासाठी काही प्रमाणात उर्जा लागते. ही उर्जा सूर्य किंवा वायूउर्जेमार्फत मिळवणे शक्य आहे.

भारतासारख्या मोठ्या राष्ट्रांनी, जर ही उपकरणे मोठ्या प्रमाणावर बसवली तर त्यांना कार्बन क्रेडिट्स मिळवून, ही उपकरणे बसवणे व चालवण यासाठीचा सर्व खर्च श्रीमंत राष्ट्रांकडून ‘क्योटो प्रोटोकॉल’ मार्फत वसूल करता येईल.
7 ऑक्टोबर 2009





चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.