तामिळनाडूमधले वेल्लोर शहर, पुण्यासारखेच शिक्षण क्षेत्राचे माहेरघर, म्हणून ओळखले जाते. इथल्या शिक्षणसंस्था नवनवीन क्षेत्रात काहीतरी पावले सतत टाकत असतात. काही वर्षांपूर्वी, तिथल्या वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इन्जिनीयरिंग कॉलेजने चीनमधल्या वुहान विद्यापीठाबरोबर एक करार केला. या करारानुसार वुहान विद्यापीठ, वेल्लोरला चिनी विद्यार्थी पदवीवर्गांसाठी पाठवते. पुढच्या शिक्षणवर्षासाठी 700 चिनी विद्यार्थ्यांना वेल्लोरच्या कॉलेजात प्रवेश देण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी, चीनहून आलेली ‘चेन जिंग’ व तिच्या काही मित्र मैत्रिणींनी, जेंव्हा वेल्लोरच्या कॉलेजात प्रवेश घेतला होता तेंव्हा त्या कॉलेजचा मेस, सामिष भोजन आठवड्यातून फक्त दोनदाच देतो हे ऐकून धक्काच बसला होता कारण त्याना तर मांसाहारी जेवण रोज सकाळ संध्याकाळ जेवण्याची सवय होती. त्यांनी आपली अडचण कॉलेजच्या अधिकार्यांच्या कानावर घातली. थोड्याच दिवसात कॉलेजच्या मेसमधे चिकन,बीफ,पोर्क, फिश या सारखे मांसाहारी जेवण रोज मिळण्याची व्यवस्था झाली. वेलोरच्या शिक्षणसंस्थांचा, या परदेशी विद्यार्थ्यांच्याबद्दल असा लवचिक दृष्टीकोन असल्यानेच इतक्या मोठ्या संख्येने चिनी विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. बहुसंख्य चिनी विद्यार्थी, भारतात संगणक विज्ञान व इंग्लिश या विषयांत पदवी मिळवण्यासाठी भारतात येतात. वेलोरच्या उदाहरणावरून हे स्पष्ट दिसून येते की योग्य व्ह्यूहात्मक धोरणे व परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागत मनापासून करण्याची तयारी या दोन गोष्टीना इथल्या शिक्षणसंस्था तयार असल्या तर त्या स्वत:चे कॅम्पस, आंर्तराष्ट्रीय सहज करू शकतात.

चीनचे भारतातील राजदूत वेल्लोरमधे चिनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना
चिनी विद्यार्थी भारतात मोठ्या संख्येने येऊ घातले आहेत याला कारणीभूत, श्री. सत्यमूर्ती हे जन्माने भारतीय, पण चीनमधे 27 वषे वास्तव्य करून असलेले, गृहस्थ आहेत. चिनी सरकारने प्रोत्साहन देऊन सुरू केलेल्या, ‘सिनो-इंडियन एज्युकेशन ऍन्ड टेक्नॉलॉजी अलायन्स’ या निमसरकारी संस्थेचे ते प्रमुख आहेत. त्यांच्या माहितीप्रमाणे 2010 साली किमान 5000 तरी चिनी विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी येतील.
काही वर्षांपूर्वी हे सगळे शक्यच झाले नसते. एकतर भारतातील कॉलेजे, परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास फारशी उत्सुक नसतच आणि दिलाच तर इथल्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेता येत असले तरच यावे असाही सल्ला त्यांना दिला जाई. ही परिस्थिती बदलत चालली आहे याला, श्री.मनमोहनसिंह यांनी पुढाकार घेऊन शिक्षण क्षेत्राच्या जागतिकीकरणाची आखलेली योजना, बरीच कारणीभूत आहे. या योजनेनुसार भारत, माहिती आणि ज्ञान याचे एक जागतिक केंद्र व्हावे असा सरकारचा मानस आहे.
वेल्लोरसारख्या थोड्या संस्था या बाबतीत पुढाकार घेऊन आहेत. मुख्य अडचण या संस्थांच्यात परदेशी विद्यार्थ्यांसाठी जागाच उपलब्ध नसण्याची आहे. भारतीय विद्यार्थ्यांनाच पुरेशा जागा उपलब्ध नाहीत.

पुणे विद्यापीठाने पण या बाबतीत पुढाकार घेतलेला दिसतो. पदवीपरिक्षा आणि कमी कालाचे कोर्सेस धरून, पुण्यात 102 देशातले, 15000 तरी परदेशी विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ जास्त शुल्क घेते व त्या उत्पन्नापासून जास्त जागा उपलब्ध होऊ शकतात.
बाकी सगळ्या क्षेत्रांप्रमाणे इथेही चीन आपल्या खूपच पुढे गेला आहे. भारतातील विद्यापीठे 22000 परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. चीनमधे हीच संख्या निदान दोन लाख तरी आहे. या बाबतीत पद्धतशीर प्रयत्न करून परदेशी विद्यार्थ्यांमधे मार्केटिंग केले जाते. आपली विद्यापीठे या बाबतीत फारच उदासीन असतात. दुसरी एक अडचण म्हणजे या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार विद्यापीठांकडे नसून सरकारकडे आहेत.
या मे महिन्यात युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनने सर्व विद्यापीठांना आंर्तराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्रे उघण्यास सांगितले आहे. त्यांत विद्यार्थ्यांना बॅन्क खाते उघडणे, रहाण्यासाठी जागा मिळवून देणे या सारखी मदत होईल.
परदेशी विद्यार्थ्यांकडून मिळणार्या शुल्कावर, शिक्षण संस्थांमधे बर्याच सुधारणा करणे शक्य असते ऑस्ट्रेलिया सारखे देश असे करत आहेत. अनेक देशातील विद्यार्थी भारतात येऊन शिक्षण घेण्यास उत्सुक असतात. गरज आहे ती शिक्षण संस्थांनी व्ह्युहात्मक धोरणे आखून आपल्या संस्थेचे परदेशात मार्केटिंग करण्याची.
1 सेप्टेंबर 2009





Pune University is ‘na ubhe gaat na adve gaat’
UoP paraprantiya dhandandgyansathi ooghadlele padvi che dukan ahe..
punyatlya itar (deemed) unversities mahad garib ahet.
Posted by Harshad Joshi | सप्टेंबर 1, 2009, 1:41 pm