1990च्या दशकात झालेल्या हरित क्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असे म्हटले तरी ते फारसे वावगे ठरू नये. या वाढीव कृषी उत्पादनामधे, उत्तर हिंदुस्थानातील राजधानी दिल्ली जवळचा भाग, पंजाब, राजस्थान व हरियाणा या राज्यातील शेतकर्यांचा खूपच मोठा वाटा आहे. अंदाजे 4,38,000 वर्ग किलोमीटर आकाराच्या या भूभागाला, सिंधु नदीचा पठारी प्रदेश अशी भौगोलिक संज्ञा आहे. या भागातील शेतकरी मुख्यत्वे बार्ली, तांदूळ व गहू ही पिके येथे घेतात. या भागात बारा महिने वहाणार्या मोठ्या नद्या असल्याने भूगर्भजल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे आणि इथले शेतकरी याच भूगर्भातील पाण्याचा मुख्यत्वे वापर करून ही पिके घेतात.

अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने, GRACE या जोडी उपग्रहांच्या सहाय्याने, पृथ्वीवरील जलस्त्रोतांचा एक अभ्यास नुकताच केला. या संशोधनाचे निष्कर्ष, ‘नासा’ मधील शास्त्रज्ञांनी नुकतेच ‘सायंटिफिक अमेरिकन’ या मासिकात प्रसिद्ध केले आहेत. या निष्कर्षांप्रमाणे सिंधु नदीच्या पठारी प्रदेशात असलेले भूगर्भातील जलस्त्रोत, इ.स. 2002 ते 2008 या कालखंडात, अंदाजे 109 घन किलोमीटर एवढ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. या जलस्त्रोतांचा एकूण अंदाज करता येत नसल्याने, ते संपूर्णपणे नष्ट केंव्हा होतील ते सांगणे जरी कठिण असले तरी केलेल्या निरिक्षणांप्रमाणे या सर्व भागातील भूगर्भजल पातळी सरासरी प्रति वर्ष एक फूट तरी खाली जात आहे. ‘वर्ल्ड बॅंकेच्या’ एका अभ्यासाप्रमाणे या भागात अंदाजे 63 घन किलोमीटर भूगर्भजल तरी प्रत्येक वर्षी जमिनीतून उपसले जाते. भारत सरकारच्याच अभ्यासाप्रमाणे या भागातील नद्या, फक्त 45 घन किलोमीटर एवढेच पाणी परत भूगर्भात भरू शकतात.
या पाण्याच्या वापरामुळेच भारतातले धान्य उत्पादन, वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या प्रमाणात वाढत गेले आहे. 1970 ते 1999 या कालखंडात भारतातली पिकांखाली असलेली बागाईत जमीन तिपटीने वाढून 330 लाख हेक्टर्स एवढी झाली आहे. या जमीनीसाठी भूगर्भजलाचा बेसुमार वापर झाल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्याच्या परिस्थितीत, भूगर्भजलाचा वापर नियंत्रित करणे शक्य दिसत नाही. या भागापैकी अंदाजे 38000 वर्ग किलोमीटर जमीनीवर तरी, शेतकरी तांदुळासारखी पाणी विपुल प्रमाणात लागणारी पिके घेत आहेत. या पिकांसाठी खाचरे पाण्याने भरून ठेवावी लागतात. या पिकाऐवजी पाण्याचा सुनियंत्रित वापर करून दुसरी पिके शेतकर्यांनी घेतली तरी सुद्धा परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे शक्य होईल.

‘नासा’चा हा अभ्यास, ही एक प्रकारची धोक्याची घंटाच समजता येईल. जर पाण्याचे सुनियंत्रण केले आणि उपलब्ध पाण्याप्रमाणे पिके घेतली तर काही कालानंतर येणारे मोठे संकट पूर्णपणे टाळता येईल असे दिसते आहे.
15 ऑगस्ट 2009





चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.